मुंबई दि.०९: भारताला प्रगतीपथावर आणणाऱ्या देशातील महान उद्योगपतींपैकी एक, टाटा मोटर्सचे संस्थापक श्री. रतनजी टाटा यांनी आज ८६ व्या वर्षी ब्रीचकँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. धनाने आणि मनाने खरा श्रीमंत आणि संवेदनशील माणूस त्यानंतर एक उद्योगपती आज आपल्यातून कायमचा गेला. त्यांनी घालून दिलेला उद्योगांचा पाया भारताच्या प्रगतीसाठी मोलाचा ठरला. रतनजी टाटांचे भारतवासीयांवर आणि भारताप्रती असणारे निस्सीम प्रेम आपण कधीच विसरू शकणार नाही. आपल्या कर्तृत्वातून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला कायम शिखरावर ठेवणारा हा देवमाणूस आयुष्यभर नेहमी दुसऱ्यांचा विचार करीत जगला.
भारतीय उद्योग क्षेत्राचे पितामह आणि दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून नावलौकिक मिळवलेले टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतनजी टाटा यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. टाटा यांनी केवळ उद्योगविश्वातच नाही, तर समाजकार्यातही आपली छाप सोडली. समाजकार्याचा वसा कायम जपत त्यांनी समाजसेवा, शिक्षण, आरोग्य आणि अनेक क्षेत्रांत अद्वितीय योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवला, पण तरीही त्यांच्या साधेपणामुळे आणि विनम्रतेमुळे ते नेहमीच एक आदर्श व्यक्तिमत्व राहिले.
रतनजी टाटा यांच्या जाण्याने एक समाजसेवक उद्योगपती कायमचा हरपला. त्यांच्या कार्याने लाखो लोकांना प्रेरणा मिळाली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. रतनजी टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा