BREAKING NEWS
latest
epaper लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
epaper लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मुंबईत भारताच्या सर्वात मोठ्या प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ चे आयोजन!

भारताच्या सर्वात मोठ्या प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ चे आयोजन मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मध्ये करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य दिव्य अश्या प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ चे प्रदर्शन दिनांक २६ ते २८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०:३० ते सायंकाळी ०८:०० वाजेपर्यंत असणार आहे. या एक्स्पोचा महत्वाचा उद्देश "जीरो इज अवर हीरो" असा आहे. या थीम अंतर्गत घरांच्या विक्रीसाठी लागणारे स्टॅम्प ड्युटी आणि रेजिस्ट्रेटेशन शुल्क कशा प्रकारे निशुल्क करता येईल यावर लक्ष केंद्रित असणार आहे.

क्रेडाई-एमसीएचआई च्या 31 व्या आवृत्ती दरम्यान या एक्स्पो ची घोषणा करण्यात आली असून या मध्ये १०० हुन अधिक दिग्गज विकासक तसेच हजारोंच्या संख्येनं प्रॉपर्टीचे प्रदर्शन होणार असल्याचे कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले आहे.

दरम्यान एक्स्पो मध्ये येणाऱ्या सर्व व्हिसिटर्ससाठी मोफत रजिस्ट्रेशन सुविधा देण्यात आली आहे. 

खंबाळपाडा येथे शासकीय दाखले वाटप मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

डोंबिवली येथील खंबाळपाड्यातील भाजपचे माजी नगरसेवक साई शिवाजीदादा शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त खंबाळपाडा येथील त्यांच्या कार्यालयात मोफत शासकीय दाखले वाटप मेळाव्याचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. सुमारे ५०० लाभार्थ्यांनी या मेळाव्यात नोंदणी केली. विशेषतः 'आयुष्यमान भारत' (आभा) या आरोग्य कार्डासाठी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी करून घेतली. माजी नगरसेविका शिल्पाताई शेलार, साई शेलार,   डोंबिवली भाजपचे युवा नेते सिध्दार्थ शेलार, वाॅर्ड अध्यक्ष चिंतामण पाटील, समाजसेविका स्वरा साई शेलार यावेळी उपस्थित होते.


वास्तव्याचा दाखला, डोमेसाईल, जातीचा दाखला व आयुष्यमान भारत अशा दाखल्यांसाठी मोफत मेळाव्याचे आयोजन सकाळपासून करण्यात आले होते. कार्यशील नगरसेवक साई शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध समाज उपयोगी उपक्रम ठेवण्यात येतात. यावर्षी देखील मोफत शासकीय दाखले वाटप मेळाव्याचे आयोजन कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आयुष्यमान भारत' योजनेविषयी धडाकेबाज निर्णय घेतला आहे. त्याचा सुद्धा लाभ स्थानिक नागरिकांना व्हावा याकरिता या कार्डाची नोंदणी लाभार्थ्यांसाठी करण्यात आली. असे भाजपचे वॉर्ड अध्यक्ष चिंतामण पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. सर्व प्रकारच्या दाखल्यांसाठी लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या नोंदणीसाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले होते. दिलीप भंडारी, विनायक गायकवाड आणि इतर कार्यकर्ते यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी अपार मेहनत घेतली.


 

Nyay Ranbhumi - 10 July - 16 July 2023

'मुंबईतील आषाढी एकादशी परंपरा'


  प्रतिनिधी: अवधूत सावंत

महाराष्ट्र राज्य संतांची भुमी म्हणुन ओळखली जाते, तर मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून पंढपूरच्या पांडुरंगाचा सोहळा म्हणजेच आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या आषाढी एकादशी वारीची फार मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. पंढपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके सुरु आहे. देशासह जगभरातील लाखो भाविक पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. टाळ-मृदुंगाच्या  ठेक्यावर, ग्यानबा-तुकारामांच्या जयघोषात ‘विठुरायाचे’ नामस्मरण करीत वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात लीन होतात. मुंबईत विशेषतः मध्य मुंबईच्या गिरणगावात विठ्ठल मंदिरासह काही ठिकाणी गेली अनेक वर्षे आषाढी एकादशी जल्लोषात साजरी केली जाते. बदलत्या काळासोबत मुंबई बेटावरच्या रूढी व परंपरा अस्तंगत होत आहेत. वाड्यावस्त्यांची मुंबई गगनभेदी होत आकाशाला भिडत चालली आहे. मुंबईची जीवनशैली बदलली तरी काही महाराष्ट्रीयन परंपरा अजूनही टिकून आहेत. त्यातील एक म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेली श्री विठ्ठलाची मंदिरे आणि त्यात होणारे अखंड हरिनाम सप्ताह. १९८० नंतर मुंबईतील गिरण्या आणि कारखाने धडाधड बंद झाले. कष्टकरी मुंबईबाहेर फेकला गेला आणि त्याबरोबर गिरणगावातील चाळीचाळीतून उमटणाऱ्या आणि मंदिरातील भजनांच्या सुरावटी मंदावल्या.  मुंबईतील गिरण्या आणि कारखाने बंद पडल्यानंतर कष्टकरी मुंबईकर एक तर उपनगरात फेकला गेला किंवा आपल्या गावाकडे परतला. त्यामुळे मुंबईच्या चाळीचाळीत आणि छोट्या मोठ्या मंदिरातून ऐकू येणारे भजन, मंजुळ स्वर मंदावले. 

पूर्वी गिरणगावात बारश्यापासून ते लग्नाच्या सत्यनारायणाच्या पुजेपर्यंत त्यापुढे एखाद्या मृत्यूनंतर स्मशानापर्यंत ते उत्तरकार्याच्या दिवसापर्यंत भजन कीर्तन मोठ्या संख्येने होत असे. त्याची जागा आता बेंजो, डीजेच्या धांगडधिंगायने घेतली आहे. अशा परिस्थितीत मुंबईची भजन संस्कृती जगविण्यासाठी निष्ठेने जी थोडी मंडळी प्रयत्न करीत आहेत त्यांचे योगदान फार मोठे आहे. पारंपरिकतेची कास धरत काहीजण मुंबईचा हा ठेवा आपापल्या परीने जपत असल्याचे दिसून येत आहे. काळाच्या ओघात मुंबापुरीतील वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह क्षीण होत तर काही पडद्याआड जाऊ लागले आहेत.

मुंबई नगरीला ‘सोन्याची नगरी’ म्हटले जाते. पण त्यापेक्षा तिला मंदिराची नगरी म्हणणेच अधिक संयुक्तिक ठरेल. मुंबई नगरीत जवळ जवळ ४८१ पेक्षा अधिक मंदिरे आहेत. त्यापैकी सर्वात जास्त मंदिरे मारुतीची, त्याखालोखाल क्रमांक येतो शंकर मंदिरांचा तर देवींची मंदिरे हि पुरातन आहेत. विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची शंभर वर्षांहून अधिक वर्षे वारकरी परंपरा जोपासणारी अनेक मंदिर सुद्धा मुंबईत आहेत. प्रत्येक आषाढी एकादशीला टाळ मृदुंगाचा गजर आणि 'ग्यानबा-तुकाराम'च्या जयघोषात तल्लीन वारकरी हेच दृश्य मुंबईतल्या मंदिरांमध्येही पहायला मिळतं. श्री विठ्ठल रखुमाई दैवताचे भौगोलिक स्थान मुंबई शहरात कुठे आहे आणि त्याठिकाणी काय पारमार्थिक कार्यक्रम होतात याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे.

वडाळा - 

वडाळा बस डेपोजवळ, कात्रक रोडवरील श्री विठ्ठल मंदिर सर्वाना परिचित आहे. एकेकाळी या मिठागराच्या बेटावर व्यापारी असत. त्यातील एका व्यापाऱ्याला विठ्ठल-रखुमाई ची मूर्ती सापडली, त्यांनी ती पंढरपूरला संत तुकाराम महाराजांना दाखवली आणि त्यांनी मंदिर बांधण्यास सांगितले अशी आख्यायिका आहे. पुढे मुंबई विस्तारात गेली आणि या मंदिराचा लौकिक वाढू लागला. आषाढी एकादशीला सर्वदूर मुंबईतील हजारो भाविक भक्त दिंड्या-पताका घेऊन येथे येत असतात. मुंबईतील ज्या विठ्ठल भक्तांना पंढरपूर येथे जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी हे मंदिर एक ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून उभे आहे.

प्रभादेवी - 

प्रभादेवी गावासाठी कै. हरी दामाजी परळकर यांच्या स्मरणार्थ त्यांची सून श्रीमती ताराबाई परळकर यांनी हे मुरारी घाग मार्गावर श्री विठ्ठल रखुमाई मंदिर  सन १९०० मध्ये हे मंदिर बांधले. गुरुवर्य अर्जुन मामा साळुंखे, गुरुवर्य नारायणदादा घाडगे, गुरुवर्य रामदादा घाडगे अश्या चार पिढ्या परमार्थ करीत आहेत.  सन १९१५ च्या काळात हभप रामकृष्ण भावे महाराज मुंबईत  'जगाच्या कल्याणा' या ध्येयाने प्रेरित होऊन आले होते. रामभाऊ हे श्री विठ्ठलभक्त आणि सेवाधारी होते, हाकेच्या अंतरावरील बाळकृष्ण वासुदेव चाळीत असा सप्ताह उत्तमरीत्या पार पडल्याचे त्यांनी स्वतः अनुभवले होते. आपल्या आचार-विचाराव्दारे 'जग लावावे सत्पथी' हेच कार्य ठळकपणे करणाऱ्या भावे महाराजांना रामभाऊ नाईक भेटले आणि विनंती केली, आमच्या मंदिरात सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह सुरु करावा. त्यांनी या सुचनेचे स्वागत केले आणि मग सन १९२१ पासून गोकूळ अष्टमी निमित्त श्रावण शुद्ध चतुर्थीपासून पुढे सात दिवसांचा दुसरा अखंड हरिनाम सप्ताह प्रभादेवीत सुरु झाला. त्याच मंदिरात पुढे काही काळानंतर माघ शुद्ध दशमी पासून सात दिवसांचा तिसरा अखंड हरिनाम सप्ताह सुरु झाला. भावे महाराजांनंतर गुरुवर्य अर्जुनमामा साळुंखे आणि गुरुवर्य हभप नारायणदादा घाडगे यांनी गुरुपदाची गादी सांभाळत महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात गावोगावी श्री सद्गुरू भावे महाराज वारकरी समाजाचे पारमार्थिक कार्य अनेक अखंड हरिनाम सप्ताहाच्या मार्फत पोहोचवले आहे. सद्गुरू हभप श्री रामकृष्ण भावे महाराज यांनी उभारलेल्या धार्मिक चळवळीला म्हणजे मुंबई शहरातील अखंड हरीनाम सप्ताह सुरु करण्याला सन १९२३ मध्ये एकशे तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. सद्गुरू भावे महाराज ट्रस्टची श्रीक्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारात सुसज्ज धर्मशाळा असून विद्यमान गुरुवर्य हभप रामदादा घाडगे यांच्या गुरुपदाखाली हभप कृष्णामास्तर घाडगे यांच्या मार्गदर्शनाने मंदिरात अनेक भाविक भक्त वर्षभर पारंपरिक धार्मिक कार्यक्रम पार पाडीत असतात. आषाढी एकादशीला मुंबईतील अनेक भजनी मंडळी तसेच दादर ते वरळी पर्यंतचे हजारो वारकरी तसेच शालेय विद्यार्थी वेशभूषा दिंड्या घेऊन या पुरातन मंदिरात देवाच्या दर्शनाला येत असतात.

बांद्रा - 

सरकारी वसाहतीत १९७६ पासून अस्तित्वात असलेल्या या मंदिरात श्रीविठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती या काळ्या पाषाणातील तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती संगमरवरी स्वरूपात आहेत. संत मुक्ताबाईंची सुंदर तसबीर आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 'संत मुक्ताबाई  पुण्यतिथी समाधी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह' साजरा होत असतो. या मंदिरातील ४० वारकऱ्यांनी अनेक वर्षे 'आळंदी ते पंढरपूर' अशी पायी वारी केली आहे. आज ही वसाहत मोडकळीस आली आहे, बरेच भाविक भक्त विस्थापित झाले आहेत तरीही आषाढी एकादशीला निष्ठेने उत्सव धार्मिक पद्धतीने पार पाडीत आहेत.

सेंच्युरी मिल वसाहत हरीहर संत सेवा मंडळ -

वरळी येथील कामगार वसाहतीत प्रांगणात निवृत्ती महाराज समाधी पुण्यतिथी सोहाळ्यानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण १९६५ पासून आयोजित केले जाते. बिर्ला परिवार आणि रामप्रसादजी पोद्दार हे खरे या धार्मिक कार्यक्रमाचे आश्रयदाते होते. गिरणी कामगारांनी सुरु केलेल्या या सोहळ्यास वै हभप निवृत्ती महाराज देशमुख नागपूरकर यांनी व्यापक स्वरूप दिले. अकराशे अकरा वाचक बसविण्याचा संकल्प सोडला परंतु तो २१०० पर्यंत गेला. पारायणाचार्य वै पुंडलिक महाराज वेळूकर यांनी आयुष्यभर परायणाची धुरा वाहिली तर नानासाहेब कोठेकर यांनी कीर्तन संयोजनाची जबाबदारी सांभाळली. श्रीमद भगवद्गगीता पाठाची परंपरा हभप राणे गुरुजी यांनी तर भजन परंपरा भजनसम्राट वै हभप मारुतीबुवा बागडे यांनी केले. गेल्या ५९ वर्षात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, बाळासाहेब भारदे, वि.स.पागे यांनी व महाराष्ट्रातील उत्तमोत्तम नामवंत कीर्तनकारांनी हजेरी लावली आहे, गिरणी संपापर्यंत प्रतिष्ठा पावलेल्या या सप्ताहात श्रवणभक्तीसाठी हजारो भाविक आणि अभ्यासू हजेरी लावीत असत. रजनीकांत दीक्षित, मनोहर राणे, ललन गोपाळ शर्मा, दत्ताराम लांबतुरे आदी कार्यकर्त्यांनी आजही ही परंपरा टिकवून ठेवली आहे.

लोअर परेल -

येथील बारा चाळ येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर. श्रीक्षेत्र पंढरपूरला बडवे मंडळीकडून भाविकांना होणार त्रास आणि यात्रेच्या वेळी शासनाने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १९६७ मध्ये जुन्नरचे कीर्तन केसरी गुरुवर्य रामदासबुवा मनसुख यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरु होता. लोअर परेल येथील या मंदिरात भक्ती करणारे ज्ञानेश्वर मोरे माऊली हे वारकरी महामंडळाचे अध्यक्ष होते. तरुण वयातील एक अभ्यासू वक्ते म्हणून त्यांचा परिचय वारकरी पंथातील झाला होता. परंतु  ४ जानेवारी १९७३ त्यांचे निधन झाले. तत्पूर्वी त्यांनी कोकणात १८ पारायणे करण्याचा संकल्प केला होता ते हयात असताना १४ पारायणे झाली उर्वरित ४ पारायणे त्यांच्या समाजातील अनुयायी यांनी केली. त्याच्यानंतर हभप कृष्णाजीराव शिंदे आणि पोपट बाबा ताजणे यांनीही संप्रदाय सांभाळण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. सध्या गुरुवर्य अनंत दादामहाराज मोरे हे उच्च विद्याविभूषित संप्रदायाचे गुरुवर्य  म्हणून धुरा सांभाळत आहेत. श्रीक्षेत्र आळंदी आणि पंढरपूरला धर्मशाळा असून लोअर परेल येथील वर्षभर नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम आणि अखंड हरिनाम सप्ताह होत असतात. आषाढी एकादशीला लोअर परेल मधील भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात. 

वरळी कोळीवाडा -

श्री शंकर मंदिर हे कोळी बांधवानी १८ ऑगस्ट १९०४ मध्ये बांधले. त्यानंतर १९२२ ला आळंदी निवासी गुरुवर्य तुकाराम महाराज कबीर त्याठिकाणी आले. आणि त्यांनी अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात केली. साधारण १९२५ पासून याठिकाणी त्रयी सप्ताह (तीन आठवड्यांचा) अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. तीन आठवडे सातत्येने चाललेला असा हरिनाम सप्ताह महाराष्ट्रात इतरत्र कुठेही नाही. १९५३ पासून आजतागायत हैबतबाबा दिंडी क्रमांक १ रथाच्या पुढे आळंदी ते पंढरपूर अशी पायी दिंडी वारी या मंदिरातील भाविक भक्त निष्ठेने करीत आहेत. अगोदरच्या काळात बैलगाडीतून सामान घेऊन दिंडी निघत असे. मामासाहेब दांडेकर, नारायणदादा घाडगे, प्रमोद महाराज जगताप, केशवमहाराज कबीर यांच्यासह शेकडो मान्यवर कीर्तनकारांनी कीर्तने झाली आहेत. या मंदिरात आरतीसाठी १९०८ पासूनचा पुरातन ढोल आहे. आषाढी एकादशीनिमित्त कोळीवाड्यातील शेकडो भाविक भक्त देवदर्शनासाठी येत असतात. विलास वरळीकर हे सध्या अध्यक्ष आहेत.

सायन -

शीव म्हणजे आताच्या सायन फ्लायओव्हर जवळील श्री विठ्ठल मंदिर. श्रीधर दामोदर खरे हे १८६० साली मुंबईत आल्यानंतर सायन मध्ये स्थायिक झाले. ते एकदा पंढरपूरला वारीसाठी गेले असता त्यांनी धातूंची मूर्ती आणली, परंतु ती चोरीस गेली. त्यानंतर त्यांनी पाषाणाची मूर्ती घडवून घेतली. त्यावेळी त्याठिकाणी आगरी-कोळी लोकांची वस्ती मोठ्याप्रमाणे होती, त्यांनी एकत्र येऊन मंदिर बांधले आणि १८९३ मध्ये मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. पंढरपूरच्या रुक्मिणी मंदिरातील पुजारी पंढरीनाथ उत्पात यांना पुजारी म्हणून तर वासुदेव बळवंत सोमण यांच्या नेतृत्वाखाली मंदिराचा कारभार करण्यासाठी ट्रस्ट नियुक्त करण्यात आला.  प्रत्येक सणानुसार या मंदिरातील मूर्तींना आभूषणे आणि वस्त्रालंकार घालण्यात येतात. आषाढी एकादशीला मंदिराला विलोभनीय सजावट करण्यात येते.

माहीम -

माहीम फाटक ते मोरी रोड या भागातील १९१६ सालचे प्रसिद्ध माहीम विठ्ठल-रखुमाई मंदिर.  १९१४-१५ मध्ये माहीम इलाख्यात प्लेगची साथ पसरली होती. भयभयीत झालेले लोक एका तांत्रिक भगताकडे गेली तेव्हा त्याने सांगितले या बेटावर श्री विठ्ठल रखुमाई मंदिराची उभारणी करा. तेव्हा १९१६ साली मंदिराचे निर्माण केले. आणि पंढरपूरला जाऊन काळ्या पाषाणाच्या मूर्ती आणल्या. तेव्हापासून आषाढी एकादशीच्या दिवशी सांस्कृतिक आणि भजनाचे कार्यक्रम हजारो गर्दीत होत असतात.

बांद्रे -

बाळाभाऊ तुपे यांनी संकल्पना मांडल्यानंतर नाभिक समाजाने ९ जानेवारी १९४० साली श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराची उभारणी केली. स्थानिक भाविकांच्या गर्दीत आषाढी एकादशी साजरी केली. अनेक दिंड्या येत असतात.

भायखळा -

भायखळा पश्चिमेला ना.म.जोशी मार्गावर हे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर १२९ वर्षाचे हे पुरातन मंदिर आहे. मंदिरात नित्य भजन, पोथीवाचन, आरती, हरिपाठ होत असतात. प्रदीर्घ चाललेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा निष्ठेने पार पाडली जात आहे. आषाढी एकादशीला सातरस्त्यापासून भायखळ्यापर्यंत हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.

गोखले रोड दादर -

जीवनाचा सुरुवातीचा अधिक काळ अलिबाग येथे झाल्याने अलिबागकार हे आडनाव स्वीकारलेले परंतु मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील गणपत ल गुडेकर यांनी आपल्या धार्मिक कार्याला प्रभादेवीतील गोखले रोड झंडू फार्मसी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात १९५२ पासून श्रीराम नवमी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात केली. गाथ्यावरील भजन, पोथी वाचन, एकादशीला कीर्तन हे तेव्हापासून नित्य होत असतात. १९६८ ला अलिबागकर महाराज यांचे निधन झाल्यानंतर गुरुवर्य हभप गोपाळबाबा वाजे यांनी धुरा सांभाळली. आणि पंढरपूर, आळंदी यासह महराष्ट्रात संप्रदाय पोहोचविला. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे कासार घाटाजवळ या वारकरी समाजाची धर्मशाळा असून विद्यमान गुरुवर्य म्हणून नारायण महाराज वाजे हे समाज चालवीत आहेत. आषाढी एकादशीला दादर सैतानचौकी, एल्फिस्टन परिसरातील शेकडो भक्त दर्शनाला येत असतात.

दादर पश्चिम -

डी.एल वैद्य रोड मठाच्या गल्लीत हे विठ्ठल मंदिर आहे. शिवाजी पार्क परिसरातील शेकडो भाविक भक्त याठिकाणी नेहमीच दर्शनासाठी येत असतात. या मंदिरात नारदीय कीर्तन परंपरा राबविली जाते. या परंपरेचे शिक्षण आणि सादरीकरण विशेषतः महिलांचा सहभाग अधिक असतो. काही वर्षांपूर्वी अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे महाराष्ट्र व्यापी कीर्तन संमेलन यांनी आयोजित केले होते. आषाढी एकादशीला दिवसभर भजने आणि कीर्तने होत असतात.

विशेष म्हणजे गेल्या शतकभरातील धर्मक्षेत्रांसह खेड्यापाड्यात वारकरी पंथ आणि संतांचा विवेकी विचार पोहोचविणारे शेकडो कीर्तनकार सर्वश्री गुरुवर्य मामासाहेब तथा सोनोपंत दांडेकर, धुंडा महाराज देगलूरकर, गुंडामहाराज, तात्यासाहेब वास्कर, शंकरमहाराज कंधारकर, रामचंद्र महाराज नागपूरकर, अमृतमहाराज नरखेडकर, बन्सीमहाराज तांबे, भानुदास महाराज देगलूरकर, किसनमहाराज साखरे, अर्जुनमामा साळुंखे, किसनदादा निगडीकर, मारुतीबाबा कुर्हेकर, जगन्नाथ महाराज पवार, रामदासबुवा मनसुख, हभप गहिनीनाथ औसेकर महाराज, माधवराव शास्त्री, गोपाळबुवा रिसबूड, भीमसिंग महाराज, चैतन्य महाराज देगलूरकर, बंडातात्या कराडकर, रामकृष्ण महाराज लहवितकर, ज्ञानेश्वर महाराज मोरे, महंत प्रमोद महाराज जगताप, रविदास महाराज शिरसाट, एकनाथमहाराज सदगीर, केशव महाराज उखळीकर, संदीपान महाराज शिंदे, बंडातात्या कराडकर, पांडुरंगबुवा घुले, बळवंत महाराज औटी, न्यायमूर्ती मदन गोसावी, अशोक महाराज सूर्यवंशी, बोडके बुवा, आनंददादा महाराज मोरे अशा शेकडो वारकरी सांप्रदायातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने-प्रवचने झाली आहेत. मुंबईकरांच्या या मंदिरात हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आले आहेत.


गिरण्यांच्या भोंग्याबरोबर गिरणगाव जागा व्हायचा, कष्टकरी कामगार घामाने चिंब व्हायचा परंतु मराठी माणसाची संस्कृती टिकवण्यासाठी बेभान व्हायचा. फुलाजीबुवा नांगरे, हातिस्कर बुवा, वासुदेव (स्नेहल) भाटकर, शिवरामबुवा वरळीकर, मारुतीबुवा बागडे, खाशाबा कोकाटे, हरिभाऊ रिंगे, खाशाबा कोकाटे,, मारुतीबुवा बागडे, तुळशीरामबुवा दीक्षित, हरिबुवा रिंगे, किशनबुवा मुंगसे, भगवानबुवा निगडीकर, दामू अण्णा माळी, पांडुरंगबुवा रावडे, विठोबाबापू घाडगे, बाबुबुवा कळंबे, चंद्रकांत पांचाळ, विलासबुवा पाटील, परशुरामबुवा पांचाळ, रामचंद्रबुवा रिंगे या भजनी गायकांनी आणि राम मेस्त्री, गोविंदराव नलावडे, तुकाराम शेट्ये, मल्हारीबुवा भोईटे, सत्यवान माने, गणपतबुवा लेकावले, शंकर मेस्त्री, भाऊ पार्टे, विठोबा अण्णा घाडगे, राम घाडगे या पखवाज वादकांनी मुंबईकरांना रात्रभर जागविले होते. मिल ओनर्स असोशिएअशन प्रभादेवीच्या मफतलाल सभागृहात मिल कामगारांच्या भजन स्पर्धा घ्यायचे. ही स्पर्धा आणि काही नामवंत काळाच्या पडद्याआड गेले असले तरी नवोदित पिढी मागचा भजन परंपरेचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी तो चालविण्याचा प्रयत्न करीत आहे.  

मंदिरात धार्मिक कार्याला जोडून घेतलेली पहिली पिढी गेल्या काही वर्षात निवृत्त होऊन मुंबईच्या उपनगरात किंवा गावी वास्तव्याला गेली आहे. काहींनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे  'वारकरी प्रबोधन महासमितीचे' संस्थापक अध्यक्ष हभप रामेश्वर महाराज शास्त्री आणि सातारा सहकारी बँकेचे अध्यक्ष हभप राजाराम तथा नाना निकम हे दरवर्षी गिरणगावात दिंडी सोहळा काढीत असतात. परंतु भविष्यात उंच उंच टॉवरच्या भुलभुलैयात मुंबईतील मंदिराचा कळस आणि त्या ठिकाणचा चाललेला परमार्थ दिसेल काय? किंबहुना सुरुवातीच्या काळातला परमार्थ उभारी घेत पुन्हा उंची गाठणार आहे का या प्रश्नाचे उत्तर काळ देणार आहे.

संकलन - 
रवींद्र मालुसरे
(अध्यक्ष)
मराठी वृत्तपत्र लेखक संघ ,मुंबई 
भ्रमणध्वनी: ९३२३११७७०४


अज्ञात इसमांनी फाडले ठाकरे गटाचे बॅनर; डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेसमोर गुढीपाडव्यानिमित्त लावण्यात आलेले शुभेच्छांचे बॅनर काही अज्ञात इसमांनी फाडल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेनंतर डोंबिवलीत काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. या प्रकरणी ठाकरे गटाचे डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांनी डोंबिवली पोलीस तक्रार ठाण्यात दाखल केली आहे.


डोंबिवली पूर्वेकडील ठाकरे गटाच्या शहर शाखेसमोर गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले होते. शनिवारी रात्री १२.३० ते पहाटे ६ च्या सुमारास काही अज्ञात इसमांनी हे बॅनर फाडले असून रविवारी सकाळी बॅनर फाडल्यचे निदर्शनास येताच डोंबिवलीतील ठाकरे गटाचे डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांनी रामनगर येथील डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. डोंबिवली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा रजि क्र. ४८२/२०२० आयपीसी कलम ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करत या प्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे.


मुख्य नेते पदावरून संजय राऊत यांची गच्छंती..

 

प्रतिनिधी: अवधुत सावंत

निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले. यानंतर आता शिंदे गटाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बऱ्याच शिवसेनेच्या शाखा या शिंदे गटाच्या नेत्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. यापुढे जात आज शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना हटवण्यात आले असून त्यांच्या जागी शिंदे गटातील ज्येष्ठ नेते, खासदार गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून या नियुक्तीचे अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्षांना देण्यात आले.

एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना यासंदर्भात पत्र दिले आहे. “२१ फेब्रुवारी २०२३ ला मुंबईमध्ये शिवसेनेच्या कार्यकारिणीची एक बैठक पार पडली. यामध्ये एकमताने ठराव करण्यात आला आहे की, संजय राऊत हे आता संसदेतील मुख्य नेतेपदी नसणार आहेत. तर गजानन किर्तीकर यांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे.”

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये संसदीय नेतेपदावर गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आली. याआधी यापूर्वी लोकसभेत शिवसेनेच्या मुख्य गटनेतेपदी खासदार संजय राऊत होते. पण एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर संसदेतील शिवसेनेचे कार्यालयदेखील एकनाथ शिंदे गटाला मिळाले होते. त्यानंतर संजय राऊतांची मुख्य गटनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यांनतर आज शिवसेनेने हे पाऊल उचलले आहे.


सुशिक्षित-सुसंस्कृत डोंबिवलीकर काल्पनिक सण साजरे करताना शहिदांचे वास्तव बलिदान नाकारत आहेत - कॉम्रेड काळू कोमासकर

 

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  जात, धर्म, पंथ, सण हे सर्व काल्पनिक असून राजकारणी व राज्यकर्त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी लोकांची दिशाभूल करून देशासाठी ज्या शहिदांनी बलिदान केले आहे, त्या शहिदांचे वास्तव डोंबिवलीकर नाकारत आहेत. अशी टीका लालबावटा रिक्षा युनियन चे अध्यक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे  कौन्सिल सदस्य कॉम्रेड काळू कोमास्कर  यांनी डोंबिवलीकरांवर केली आहे.

२३ मार्च या शाहिद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, शहिद राजगुरू, शहीद सुखदेव यांना डोंबिवली येथील बाजीप्रभू चौकात आदरांजली वाहण्यासाठी इंदिरा चौक, टिळक चौक मार्गे बाजीप्रभू चौक अशी रॅली काढून एका कार्यक्रमाचे आयोजन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि लाल बावटा रीक्षा  युनियन यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी काळू कोमास्कर बोलत होते. या शहीद दिनाच्या कार्यक्रमात डोंबिवलीतील पंधरा संघटनांनी सहभाग दिला होता.

दिनांक २३ मार्च शहिद दिनानिमित्त डोंबिवली शहरात विविध संघटनांनी मिळून रॅली व सभेचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात बाजीप्रभू चौकात उभारलेल्या शहिद  स्मारकापासून करण्यात आली, "इन्कलाब झिंदाबाद, भगतसिंग के देश में हिंदू-मुस्लिम जातीवाद नही चलेगा" अश्या घोषणांनी  रॅली दरम्यान डोंबिवलीचे रस्ते दणाणत होते. रॅलीचे रूपांतर बाजीप्रभू चौकात सभेमध्ये झाले.  क्रांतिकारी गीताने सभेची सुरुवात करण्यात आली. सभेमध्ये काँम्रेड काळू कोमास्कर, जनता दल सेक्युलरचे राज्य सचिव रवी भिलाने, बहुजन मुक्ती पार्टीचे  गौतम वाघचौरे, संयुक्त जयंती उत्सव मंडळाचे दीपक अहिरे, विद्यार्थी संघटनेचे अष्टपाल कांबळे, हॉकर्स फेडरेशनचे बबन कांबळे, अनिसचे कॉ.संजय पटेल, परेश काटे, राष्ट्र सेवा दलाचे जीवराज सावंत, कॉम्रेड शहिद भगतसिंग मित्रमंडळाचे कॉ.महेश आवारे, स्वाभिमानी शिक्षण संघटनेचे संजय गायकवाड, अन्याय अत्याचार निर्मूलन समितिचे केणी हे उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमात काळू कोमासकर म्हणाले की, देशात गुढीपाडव्यासारख्या स्वागत यात्रेला महत्त्व दिले जाते. हे सण, जात, पंथ, धर्म हे काल्पनिक आहेत. परंतु ज्या शहिदांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांचा विसर सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणविणाऱ्या डोंबिवलीकरांना पडला आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे. रॅली दरम्यान अनेकांनी विचारले ही कशासाठी रॅली आहे. त्याचप्रमाणे काळू-कोमासकर यांनी महागाई मध्ये होरपळत चाललेल्या गरीब सामान्य माणसाची व्यथा मांडताना,  भाजपला लक्ष्य केले. तर रवी भिलाने यांनी डोंबिवलीत आल्यानंतर मला काम करण्यासाठी वेगळी ऊर्जा मिळते असे सांगितले. शाहीर पंकज कांबळे यांनी आपल्या शाहिरीने सभेचे वातावरण उत्साही केले. कार्यक्रमाची सांगता घोषणा आणि क्रांतिकारी गीताने करण्यात आला.


ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींविरोधात भाजपाचे आंदोलन..

 

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी राज्यभर आंदोलन करणार असल्याचे भारतीय जनता पार्टी. जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने कोणत्या कारणाबद्दल दोषी ठरवले आहे याबद्दल काहीच बोलत नसल्याबद्दल कांबळे यांनी आश्चर्य व्यक्त केले.       

श्री. शशिकांत कांबळे यांनी सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ''मोदी'' या आडनावावरून अपमानास्पद टिप्पणी करताना ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाज बांधवांचा अपमान केला. न्यायालयाने याबद्दल राहुल गांधींना दोषी ठरवत २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी हे आपल्या घराण्यामुळे आलेल्या राजेशाही मानसिकतेततून बाहेर पडले नाहीत असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसते.  

न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याच्या ऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत आहेत. काँग्रेस नेत्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल भाजपा न्यायालयात दाद मागेल, असेही ते म्हणाले. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असते ? असे वक्तव्य राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत बोलताना केले होते.

'मोदी' या आडनावाच्या अनेक व्यक्ती क्रीडापटू आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनीअर आहेत, व्यावसायिक आहेत. एखाद्या आडनावाशी संबंधित लोकांचा एखादी व्यक्ती जाहीर सभेत अपमान करत असेल तर त्या विशिष्ट आडनावाच्या व्यक्तींना मानहानीचा दावा दाखल करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. आपण कोणालाही अपमानित करावे हा आपला अधिकार आहे असे राहुल गांधींना वाटत असेल तर त्यांच्या वक्तव्यामुळे अपमानित झालेल्या व्यक्तीला त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, असेही शशिकांत कांबळे यांनी पत्रकात नमूद केले आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील शहराध्यक्ष अभिजीत करंजुले, नाना सूर्यवंशी, संजय आदक, नगरसेविका पाटील, संतोष शिंदे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.



मालमत्ता कर आकारणी अंतिम जप्तीच्या नोटीसीमुळे डोंबिवलीतील उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण; कर आकारणी दुरुस्ती साठी 'कामा' चे निवेदन..

 

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने डोंबिवली येथील एमआयडीसी भागातील उद्योजकांना भूखंड मालमत्ता कर आकारणी संदर्भात जप्तीच्या अंतिम नोटीसा देण्यात आल्यामुळे उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेऊन कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन च्या 'कामा' संघटनेने महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांना उद्योजकांना दिलासा देणारी कर दुरुस्ती प्रणाली महापालिकेच्या वतीने करण्यात यावी असे निवेदन दिले आहे. 

  उद्योजकांच्या 'कामा' संघटनेचे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांच्या नेतृत्वाखाली उद्योजकांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मंगेश चितळे यांची भेट घेतली. याबाबत देवेन सोनी यांनी अशी माहिती दिली की, ग्रामपंचायत कडून या उद्योजकांच्या भूखंडांना कर लावला जात असे. परंतु कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे येथील २७ गावे समाविष्ट करण्यात आल्यानंतर महापालिकेच्या वतीने शंभर पट कर उद्योजकांच्या भूखंडांना लावला गेला आहे. कोरोनाच्या काळातून उद्योजक कसेबसे सावरत असताना, हा  कर उद्योजकांना परवडत नाही. कोरोना काळामध्ये काही लघुउद्योग बंद पडले असून, या उद्योजकांना सुद्धा अवाच्या सव्वा सुमारे करोडो रुपयांचा कर पालिकेने लावला आहे. आता हे कर न भरल्यास त्यांना अंतिम जप्तीच्या नोटीसा देण्यात आल्या असून, त्यामुळे डोंबिवलीतील उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

याबाबत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेमध्ये एमआयडीसीतील उद्योजकांना दिलासा देणारी कर प्रणाली दुरुस्ती करण्यात यावी. असा देखील ठराव करण्यात आला होता. मात्र त्याबाबत महापालिकेकडून आजतागायत अंमलबजावणी झालेली नाही. २०१७-१८ पासून मालमत्ता कर हा जुन्या पद्धतीने आकारणी करण्यात यावा ही पालिकेला मागणी आम्ही करत आहोत. ज्यांची मिळकत २००२ च्या पूर्वीची आहे. त्याप्रमाणे कर आकारणी सुरू करावी असा ठराव महापालिकेने केला आहे. हे वारंवार आम्ही महापालिकेला निवेदनाद्वारे सांगितलेले आहे. पुन्हा डिसेंबर २०२० पासून आम्ही मालमत्ता कर दुरुस्ती बाबत पाठपुरावा करत असूनही, अद्याप त्याबाबत महापालिकेने कोणतेही पाऊल उचललेले नाही.

'कामा' संघटनेच्या वतीने पालिकेला दिलेल्या निवेदनात डोंबिवली येथील टप्पा एक आणि टप्पा दोन यामधील भूखंडाचे निवासी,औद्योगिक आणि बिगर निवासी असे वर्गीकरण स्तर करावेत. सध्या निवासी आणि बिगर निवासी असे दोन स्तर आहेत. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील तीन स्तर असावे असे निर्देश दिले होते. राज्यातील नाशिक आणि अंबड   पालिकांमध्ये तीन स्तर असणारी रचना औद्योगिक क्षेत्रात आहे. मालमत्ता कर यासंबंधी महापालिकेने काही उद्योजक भूखंडधारकांना नोटीसा दिल्या आहेत. त्या तात्काळ मागे घ्याव्यात किंवा त्यांना स्थगिती द्यावी आणि १८९ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करावा. तोपर्यंत कोणतीही कारवाई एमआयडीसीतील उद्योजकांवर करू नये अशी मागणी निवेदनात करण्यात आली. 
दुरुस्ती कर आकारणी प्रणालीप्रमाणे उद्योजक एक हाती कराची रक्कम भरण्यास तयार आहे असे 'कामा' संघटनेच्या वतीने उपस्थित पत्रकारांना सांगण्यात आले. परंतु ही दुरुस्ती कल्याण-डोंबिवली महापालिकेने करावी, अशी विनंती कामाच्या वतीने निवेदनाद्वारे आयुक्तांना करण्यात आली आहे. येत्या आठवड्यामध्ये महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांची भेट 'कामा' संघटनेच्या वतीने घेण्यात येईल असे संघटनेचे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

भाजपाचे समीर चिटणीस यांच्या संपर्क कार्यालयाचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  भारतीय जनता पक्षाचे डोंबिवली पश्चिम मंडळाचे सरचिटणीस समीर चिटणीस यांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले. यावेळी भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, पश्चिम मंडल अध्यक्ष प्रदीप चौधरी, माजी अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, माजी नगरसेवक मंदार हळबे, मुकुंद पेडणेकर, पूर्व मंडल अध्यक्ष नंदू जोशी, माजी अध्यक्ष संजीव बिडवाडकर, युवा आघाडी अध्यक्ष मितेश पेणकर, महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडी सरचिटणीस शिवाजी आव्हाड, चिटणीस बंधू, त्यांचे कुटुंबीय मित्रमंडळी, डोंबिवलीतील भाजप पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, हितचिंतक, रिक्षा चालक आणि इतर मान्यवर मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.


  डोंबिवली पश्चिम येथील महात्मा गांधी रोड वर असलेल्या अंबिकानगर येथे हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. भावे सभागृह येथे समीर चिटणीस यांचे कार्यालय होते. या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम तसेच लोकउपयोगी कामे, शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे. पारदर्शी व्यावसायासोबत सामाजिक कार्यात चिटणीस बंधूंचा डोंबिवलीमध्ये सहभाग असून, समीर चिटणीस यांनी नैसर्गिक आपत्तीच्या काळात कोकण तसेच कोरोनाच्या काळामध्ये कोकणात आणि डोंबिवली मध्ये नागरिकांना सहाय्यभूत ठरेल असे कार्य त्यांचे सहकारी आणि  भाजपच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू केले होते. डोंबिवली पश्चिम येथील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये समीर चिटणीस हे अभ्यासू लोकप्रिय व्यक्तिमत्व असून, सर्वपक्षीय मित्रमंडळी त्यांचे स्नेही आहेत. समीर चिटणीस हे कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मर्जीतील असून डोंबिवली पश्चिम येथील भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे भाजपमधील  त्यांचे सहकारी पाहत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. सामाजिक कार्याचा व्याप आणि कार्यकर्त्यांचा राबता वाढल्याने आकाराने मोठे कार्यालय घ्यावे लागल्याची चर्चा उद्घाटन झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.


कल्याण-डोंबिवलीच्या अर्थसंकल्पामध्ये या रेशनकार्ड धारकांसाठी अंत्यविधी सुविधा मोफत देण्याचा निर्णय..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात अंत्यविधीची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय आज सादर झालेल्या बजेटमध्ये घेण्यात आला. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी चालू आर्थिक वर्षासाठी कोणताही करवाढ नसणारे २ हजार २६ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये नेहमीच्या आर्थिक तरतुदींसोबतच महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे आरोग्य आणि पायाभूत सुविधा वाढवण्यावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.

त्याचसोबतच यंदाच्या बजेटमध्ये नविन आरोग्य सुविधा, शहर स्वच्छता, घनकचरा प्रकल्प, प्राथमिक शिक्षण, क्रिडा यासह भटके आणि पाळीव प्राण्यांच्या आरोग्य सुविधांची तरतूद, पार्किंग पॉलिसी, रस्ते विकास, स्मशानभूमी, ऊर्जाक्षम पथदिवे, कचऱ्यापासून खत निर्मिती, स्मार्ट गव्हर्नन्ससाठी आदी महत्वाच्या मुद्दयांसाठी आवश्यक तरतूद करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्य लेखा अधिकारी लक्ष्मण पाटील, शहर अभियंता अर्जुन अहिरे, महापालिका सचिव संजय जाधव, परिवहन व्यवस्थापक दिपक राऊत यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या रेशनकार्ड धारकांसाठी मोफत अंत्यविधी सुविधा..

केडीएमसी प्रशासनाने यंदाच्या बजेटमध्ये मोफत अंत्यविधीची सुविधा पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारकांसाठी करण्यात आल्याचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.

अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची मोहीम..

तर यासोबतच कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अत्यंत कळीचा मुद्दा असलेल्या अनधिकृत बांधकामांसाठीही महापालिका प्रशासन विशेष मोहीम राबविणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. या मोहिमे अंतर्गत शासन नियमांच्या चौकटीत बसणाऱ्या अनधिकृत बांधकामांना अधिकृत करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली.

केडीएमसीच्या अर्थसंकल्पामधील ठळक तरतुदी..


* मे २०२३ पर्यंत केडीएमसी क्षेत्रात शंभर टक्के ऊर्जा क्षम पथदिवे बसवणे

* अधिकाधिक रस्ते आणि परिसराचे सौंदर्यीकरण करणे

* प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी विद्युत वाहिनी किंवा गॅस दाहिनी उभारणे

* केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी विनाशुल्क अंत्यविधीची सुविधा उपलब्ध करणे

* कंटेनर टॉयलेट सुविधा उपलब्ध करणे

* पालिका क्षेत्रातील विविध तलावांचे पुनरुज्जीवन करणे

* अमृत योजनेअंतर्गत २७ गावांमध्ये पावणेतीनशे किलोमीटरच्या जलवाहिन्यांचे जाळे विणणे

* कल्याण डोंबिवली १५ नवीन जलकुंभ उभारणे

* डोंबिवली शहरात चाळीस वर्षे जुन्या झालेल्या जलवाहिन्या बदलून टाकणे

* पंधराव्या वित्त आयोगानुसार प्राप्त निधीतून राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम, धुळशमन प्रकल्प, सी ऍण्ड डी वेस्ट प्रोजेक्ट उभारणे

* सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी हेल्थ वेलनेस सेंटर उभारणे

* नवीन प्रसूतीगृह आणि कॅन्सर सेंटर उभारणे,

* कॅथलॅब, केमोथेरपी, रेडिओथेरपी केंद्र उभारणे

* नवीन सुपर स्पेशलिटी रुग्णालय सुरू करण

* भटक्या मांजरांचे लसीकरण आणि निर्बीजीकरण करणे

* महापालिका रुग्णालयांमध्ये सांडपाणी प्रक्रिया स्वतंत्र उभारणे

* पाळीव प्राण्यांचा दवाखाना उभारणे

* मान आणि पाठीच्या मणक्याच्या आजारावर उपचाराकरता केंद्र स्थापन करणे

* डोंबिवलीत शवविच्छेदन केंद्र सुरू करणे

* अद्ययावत रोग निदान केंद्र सुरू करणे

* आधारवाडी डम्पिंग ग्राउंड कायमस्वरूपी निष्कासित करण्यासाठी पुढील कार्यवाही करणे

* स्वच्छ आणि सुंदर शहरासाठी कचरा उचलण्यासह प्रक्रिया राबवणे

* प्रत्येक प्रभागाकरिता एक मोबाईल टॉयलेट खरेदी करणे

* महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्य स्टोअर रूम तयार करणे

* शाळांची नूतनीकरण करण्यासह डिजिटल क्लासरूम उभारणे

* गुणवंत खेळाडू घडवण्यासाठी महापालिकेचे क्रीडा संकुल नामांकित खेळाडूंना चालवण्यासाठी देण्यात येणे

* महापालिकेच्या आरक्षित सर्व जागा एक वर्षाच्या आत वापरात आणणे

* शंभर टक्के पेपरलेस कारभारासाठी एप्रिल २०२३  पासून टप्प्याटप्प्याने ऑफिस प्रणाली राबवण्याचा निर्णय

* महापालिका क्षेत्रात सुरू असणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी वॉर रूम तयार करणे

* महिलांसाठी विशेष मैदाने बनवणे

* महापालिकेच्या मिळकतीमध्ये चार ठिकाणी महिला बचत गटांना कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देणे

दरम्यान, यासारख्या ठळक मुद्द्यांचा आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. आज सादर झालेले हे बजेट वाचायला आणि ऐकायला जरी चांगले वाटत असले तरी त्याची प्रत्यक्ष कितपत अंमलबजावणी होते हे लवकरच स्पष्ट होईल.



Nyay Ranbhumi 29 to 05 December 2021

Nyay Ranbhumi 22 to 28 November 2021

Nyay Ranbhumi 15 to 21 November 2021

Nyay Ranbhumi 08 to 14 November 2021

Nyay Ranbhumi 01 to 07 November 2021

Nyay Ranbhumi 25 to 31 October 2021

 


Nyay Ranbhumi 25 to 31 October 2021