BREAKING NEWS
latest

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दि.०४ एप्रिल रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील ३० भूप्रमाण केंद्रांचे उद्घाटन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई :- तहसिल कार्यालयामध्ये सुरू असलेल्या सेतु सेवा कार्यालयाच्या धर्तीवर भूमी अभिलेख विभागातील उप-अधीक्षक भूमी अभिलेख, ठाणे आणि उप-अधीक्षक भूमी अभिलेख, शहापूर या कार्यालयातील भुप्रमाण केंद्राचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दि.०४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वाजता दुरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाला.

या केंद्रामध्ये संगणकीकृत मिळकत पत्रिकेवरील फेरफार सर्व प्रकारचे ऑनलाईन फेरफार अर्ज, ई-मोजणी व्हर्जन २.० मधील सर्व प्रकारचे मोजणी नकाशे, मिळकतीच्या डिजिटल सही केलेले फेरफार, नोंदवही उतारे आणि ऑनलाईन अर्ज करायची सुविधा, तसेच नकाशे व स्कॅन अभिलेख याच्या डिजिटल सही केलेल्या नकला, जनतेला वाजवी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

यापूर्वी भूमी अभिलेख विभागातील विविध प्रकारचे नकला मिळविण्यासाठी नक्कल अर्ज करण्यासाठी जनतेला कार्यालयात छापील अर्ज करून हेलपाटे घालावे लागत होते. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नागरिकांची खाजगी संस्थेकडून आर्थिक पिळवणूक होत होती आणि सुविधा वेळेत मिळत नव्हत्या. परंतू आता भूप्रमाण केंद्राच्या माध्यामातून जनतेला सर्व सुविधा वेळेत आणि वाजवी दरात मिळाल्यामुळे प्रशासनातील विलंब कमी होऊन लोकाभिमुख प्रशासनाला हातभार लागणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये एकुण ३० भूप्रमाण केंद्राचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले असून यामुळे भूमी अभिलेख खाते लोकाभिमुख होणार आहे.

ठाण्यात व्हॉट्सऍपवरून चालायचं सेक्स रॅकेट, दोन दलालांवर गुन्हा दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : ठाणे शहरात व्हॉट्सऍपवरून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी पोलीसांनी एका दलालाला अटक केली आहे. तर दुसरा दलाल पसार झाला आहे. व्हॉट्सऍपवरून पीडित महिलेचा ग्राहकांना फोटो पाठवून वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन दलालांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांपैकी एका दलालाला झडप घालून पोलीसांनी अटक केली. मात्र, दुसरा दलाल पोलीसांना गुंगारा देत पसार झाला. निर्मल मंगर साव (वय: ५८ वर्षे) असे अटक केलेल्या दलालाचं नाव आहे. तर त्याचा साथीदार प्रदीप जाधव हा पसार झाला आहे.

पीडित महिलांना वेश्या व्यवसायासाठी पैशांचं आमिष दाखवून आरोपी हे सेक्स रॅकेट चालवत होते, अशी माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.

व्हॉट्सऍपवरून ग्राहकांशी करायचे संपर्क -

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दलाल प्रदीप आणि निर्मल या दोघांनी आपआपसात संगनमतानं एका ४५ वर्षीय महिलेला वेश्या व्यवसायासाठी पैशांचं आमिष दाखवलं. त्यानंतर पीडित महिलेचा वापर वेश्या व्यवसायासाठी करण्याकरिता व्हॉट्सऍपवरून आणि मोबाईल फोनद्वारे ग्राहकांशी संपर्क करण्यास सुरुवात केली.

दलाल निर्मलला अटक, पैसे जप्त -

पीडित महिलेला एका ठिकाणी वेश्या व्यवसयासाठी पाठविण्यात येत असल्याची माहिती शांतीनगर पोलीस पथकाला मिळाली होती. त्यानुसार ३ एप्रिल रोजी सांयकाळच्या सुमारास भिवंडीतील बाबला कंपाऊंड भागात असलेल्या एका लॉजवर पोलीस पथकानं धाड टाकली. यावेळी पोलीसांनी दलाल निर्मलला अटक केली. त्याच्याकडील ७ हजार १२० रुपये रोख रक्कम जप्त केली. पीडित महिलेची भिवंडीतील एका लॉजमधून सुटका करण्यात आली.

पसार झालेल्या दुसऱ्या दलालाचा शोध सुरू -

दोन्ही दलालाविरोधात शांतीनगर ठाण्याचे पोलीस शिपाई भुषण नाना पाटील यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलीसांनी अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन १९५६ चे कलम ४ आणि ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला. पसार झालेल्या प्रदीपचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक (प्रशासन) विनोद पाटील यांनी दिली. या या घटनेचा पुढील तपास विनोद पाटील करीत आहेत.

राज्यात कुठूनही करता येणार ऑनलाईन घर नोंदणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : घराच्या नोंदणीसाठी आपल्याला उपनिबंधक कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात जावं लागतं. बऱ्याच वेळा लोकांना अनेक तास या कार्यालयांमध्ये ताटकळत बसावं लागतं. अनेकदा सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. काही वेळा, काही ठिकाणी दलाल पैसे उकळतात. हा सगळा प्रकार आता थांबणार आहे. कारण राज्य सरकारने घरांच्या नोंदणीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

आता राज्यात कुठेही बसून कुठल्याही जिल्ह्यातील घरांची नोंदणी करता येईल. ही सगळी प्रक्रिया ऑनलाइन असेल. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर याबाबतची माहिती जाहीर केली आहे. महायुती सरकार राज्यात १ मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’ ही पद्धत सुरू करणार असल्याचं बावनकुळे यांनी जाहीर केलं.

घरी बसून मुद्रांक नोंदणी करता येणार : बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “घर खरेदी-विक्री करतेवेळी नोंदणीसाठी सरकारी कार्यालयात जावं लागतं. तिथे अनेक हेलपाटे मारावे लागतात. नोंदणी करताना मध्ये दलालांचा अडथळा असतो. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शी व गतीमान सरकारच्या १०० दिवसांच कार्यक्रम दिला होता, त्याअंतर्गत महसूल खात्याच्या मुद्रांक निरिक्षकांनी व महानिरिक्षकांनी एक चांगला उपक्रम पुढे आणला आहे. ‘एक राज्य एक नोंदणी’ अशी पद्धत आपलं सरकार सुरू करत आहे. त्याअंतर्गत राज्यातील कुठलीही नोंदणी, मुद्रांक नोंदणी घरी बसून करता येणार आहे.

१ मे पासून एक राज्य एक नोंदणी प्रक्रिया सुरू होणार : महसूल मंत्री

महसूल मंत्री म्हणाले, “तुम्ही एखादं घर खरेदी केलं असेल तर कुठेही बसून त्याची नोंदणी करता येईल. पुण्यात बसून नागपुरातील घराची, मुंबईत बसून पुण्यातील घराची नोंदणी करता येईल. ही सगळी फेसलेस प्रक्रिया असेल. तुमचं आधार कार्ड व आयकर दस्तऐवजांच्या मदतीने तुम्ही फेसलेस नोंदणी करू शकता. ऑनलाइन मुद्रांक नोंदणी व ‘एक राज्य एक नोंदणी’ प्रक्रिया आपण १ मेपासून सुरू करत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी डिजीटल इंडिया, डिजीटल महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. आमचं सरकार त्यावर काम करत आहे.” सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर मुंबई व उपनगरांत अशी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती जी आता राज्यभर सुरू होत आहे.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जीवपेक्षा पैसा मोठा ; गर्भवतीचा दुर्दैवी अंत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

पुणे : पुण्यामधील दीनानाथ  मंगेशकर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करून घेण्यापूर्वी दवाखान्यात भरण्यासाठी दहा लाख रुपये नाहीत केवळ एवढ्या कारणासाठी एका बाळंतपणासाठी आलेल्या एका महिलेला एडमिट करून घेतलं गेलं नाही व परिणामी तिला जीवाला मुकावे लागले ही बाब अत्यंत खेदजनक असून दीनानाथ मंगेशकर सारख्या धर्मदाय आयुक्तकडे रजिस्टर असलेल्या हॉस्पिटल ने त्यांच्याकडील दहा ते पंचवीस टक्के बेड आर्थिक दृष्ट्या दुर्बल व मोफत उपचारासाठी राखीव  ठेवण्याचा कायदा असतानाही भरण्यासाठी पैसे नाहीत या कारणासाठी त्या महिलेला ऍडमिट करून घेतले नाही आणि त्यातच तिचा जीव गेलेला आहे. नाव मोठं आणि लक्षण खोटं असणाऱ्या अशा या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा हा अत्यंत असंवेदनशील प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा आहे.
       
वास्तविक पाहता धर्मदाय आयुक्त कडे नोंद असलेल्या सर्व हॉस्पिटल्सने दवाखान्याच्या बोर्डवर धर्मादाय आयुक्त संचलित असे लिहिण्याचा शासनाने कायदा केलेला आहे. अशी हॉस्पिटल निर्माण होत असताना शासनाच्या मालकीची जागा घेतात व शासनाकडून वेगवेगळ्या सवलती घेतात. इन्कम टॅक्स मधून सूट घेतात एवढेच नाही तर स्थानिक सरकारकडून पाणीपट्टी सूट, घरपट्टीत सूट सर्व प्रकारचे आर्थिक लाभ घ्यायचे आणि गोरगरिब पेशंट कडून सुद्धा अशा पद्धतीने पैसे घेतल्याशिवाय त्यांना उपचार द्यायचे नाहीत ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे अशा या पैसे खाऊ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चा परवाना रद्द करणे गरजेचे आहे तसेच त्यांच्यावर मनुष्यधाचा गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे.  वास्तविक पाहता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल त्या महिलेकडून किंवा तिच्या नातेवाईकांकडून पिवळ्या रेशन कार्ड व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ किंवा अगदी पंतप्रधान आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देऊ शकले असते. तथापि केवळ पैशाच्या हव्यासापोटी पैशाची मागणी करत बसलेल्या या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ने वरील योजनांचा लाभ देण्याऐवजी त्या महिलेला उपचार देण्याच्या टाळून पैसे हडपण्याच्या हेतूने अशा पद्धतीने उपचार करण्यात दिरंगाई केली. त्या महिलेला सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत दवाखान्याच्या दारात बसून राहावं लागलं त्याच ठिकाणी तिला रक्तस्राव सुरू झाला. तिची मानसिक खच्चीकरण झाले आणि अशा  परिस्थितीत तिला जीवाला मुकावे लागले ही बाब अत्यंत खेदाची आहे या गोष्टीवर सर्वपक्षीय आंदोलन उभे राहणे गरजेचे आहे.

संविधानाने सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत त्यात सर्वात महत्वाचा जगण्याचा अधिकारच यामुळे नाकारला गेला आहे. सदर महिला ही एका आमदार साहेबाच्या पीए ची पत्नी होती. तिच्या साठी मंत्रालयातुन तिला ऍडमिट करून घ्या म्हणून ही फोन आला होता.  तरीही तिला ऍडमिट करून घेतले गेले नाही. याउलट तिला ससून हॉस्पिटलला न्या असे सांगितले. त्यामुळे नाईलास्तव तिला दुसरीकडे न्यावे लागले त्यामुळे उपचारासाठी विलंब झाला व महिलेला प्राणास मुकावे लागले. प्रसूती दरम्यान त्या महिलेला दोन जुळ्या मुली झाल्या. हॉस्पिटल च्या अशा निष्काळजी पणामुळे मुलींना त्यांच्या आईला गमवावे लागले. सदर हॉस्पिटल वर कडक कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे अशी पुण्यात सर्वत्र मागणी होत आहे.

चित्रपट प्रेक्षकांमध्ये देशभक्ती रूजवणारा कलाकार वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने हरपला..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मनोज कुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी  रोजी झाला होता. मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी स्वामी असे होते. मनोज कुमार यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. दिलीप कुमार हे त्यांचे आवडते अभिनेते. त्यांच्यावर दिलीप कुमार यांचाच प्रभाव होता. त्यांनी मनोज कुमार हे नाव धारण करण्यामागेही दिलीप कुमार हेच होते. शबनम या चित्रपटात दिलीप कुमार यांनी साकारलेल्या  पात्राचे नाव  मनोज कुमार असे होते. या  चित्रपटात दिलीप कुमार यांनी साकारलेले मनोज कुमार हे पात्र त्यांना इतके  भावले की त्यांनी स्वतःचे नाव मनोज कुमार असेच ठेवले. १९५७ साली शहीद या चित्रपटाद्वारे मनोज कुमार यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपट खूप गाजला.या चित्रपटात त्यांनी साकारलेली भगतसिंग यांची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली.

देशभक्तीवर आधारित हा चित्रपट यशस्वी झाल्याने त्यांनी पुढे अनेक देशभक्तीपर चित्रपटांची निर्मिती केली. मनोज कुमार यांनी उपकार या देशभक्तीपर चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला जय जवान  किसान… हा नारा त्यांनी या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. हा चित्रपट खूप गाजला या चित्रपटातील गाणी लोकप्रिय झाली. मेरे देश की धरती… हे अजरामर गीत याच चित्रपटातले.  उपकार नंतर त्यांनी पुरब और पश्चिम, हरियाली और रास्ता, रोटी कपडा और मकान, क्रांती, हिमालय की गोद मे असे देशभक्तीपर चित्रपट काढले हे सर्व चित्रपट खूप गाजले. या चित्रपटाद्वारे त्यांनी प्रेक्षकांमध्ये देशभक्ती रुजविण्याचा प्रयत्न केला. मनोज कुमार यांनी आणि अनेक देशभक्तीपर चित्रपटांची निर्मिती केली म्हणून त्यांना "भारत कुमार' हे टोपण नाव पडले. त्यांनी निर्माण केलेले आणि अभिनय केलेले देशभक्तीवरील चित्रपट त्याकाळी खूप गाजले होते.  

मेरे देश की धरती, सरफरोशी की तमन्ना, एक प्यार का नगमा है, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा.. अशी अनेक अजरामर गाणी मनोज कुमार यांच्यावर चित्रित झाली आहेत. आजही स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी  त्यांच्या देशभक्तीवरील चित्रपटातील गाणी आवर्जून वाजवली जातात. शोर, पत्थर के सनम, दो बदन, मेरा नाम जोकर हे त्यांनी अभिनय केलेले चित्रपट देखील खूप लोकप्रिय ठरले. मनोज कुमार यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले. उपकार या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. २००५ साली त्यांना चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. १९९२ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविले. 

मनोज कुमार यांनी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांमध्ये देशभक्ती रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निधनाने प्रेक्षकांमध्ये देशभक्ती रुजवणारा पडद्यावरील भारत कुमार काळाच्या पडद्याआड हरपला गेला असे म्हणावे लागेल. मनोज कुमार यांच्या निधनाने हिंदी चित्रपट सृष्टीची मोठी हानी झाली आहे. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

माजी आमदार गणपत गायकवाड यांचा न्यायालयात केबल वाद प्रकरणी जबाब..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण :  २०१४ साली कोळसेवाडी पोलीस ठाण्यात झालेल्या राडा प्रकरणात भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण न्यायालयात आपला जबाब नोंदविला. पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याला गणपत गायकवाड आणि शिवसेना शहरप्रमुख निलेश शिंदे यांनी नकार दिला आहे.

माजी आमदार गणपत गायकवाड आणि निलेश शिंदे यांच्यावर केबलच्या वादातून पोलिस ठाण्यात वाद झाल्याचा आरोप आहे. मात्र, न्यायालयात दोघांनीच हा आरोप फेटाळला. 'त्या वेळी चोरी आणि सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांबाबत आम्ही पोलीसांना भेटण्यासाठी गेले होतो. मात्र कोणताही वाद घडला नाही,' असे दोघांनी न्यायालयासमोर सांगितले. या प्रकरणात गणपत गायकवाड यांनी न्यायालयात आपला जबाब नोंदविला, तर निलेश शिंदे यांनी सत्यप्रतिज्ञा पत्र सादर केले. यापूर्वी पाच साक्षीदारांनी केबलच्या वादातून पोलीस ठाण्यात गोंधळ झाल्याची साक्ष दिली होती.

कल्याण पूर्वचे माजी आमदार गणपत गायकवाड सध्या तळोजा कारागृहात आहेत. महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात ते अटकेत आहेत. आज न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले, त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यांच्या सोबत त्यांचे भाचे कुणाल पाटील आणि विकी गणात्राही न्यायालयात उपस्थित होते.

सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी पाच साक्षीदारांच्या जबाबाची माहिती गणपत गायकवाड यांना दिली. साक्षीदारांनी केबलच्या वादातून वाद झाल्याचे सांगितले होते. मात्र, गणपत गायकवाड यांनी "मी त्या वेळी आमदार होतो. आमच्या परिसरात चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. त्यामुळे आम्ही त्या संदर्भात पोलीसांकडे निवेदन द्यायला गेलो होतो, असे स्पष्टीकरण दिले. तसेच, त्यांनी हेही सांगितले की, 'आमच्या विरोधात पोलीसांनी चुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 'निलेश शिंदे यांनी देखील सत्यप्रतिज्ञा पत्र सादर करत 'त्या वेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रुपेश गायकवाड यांनी मोहिम सुरू केली होती. केबलच्या वादातून काहीच घडले नाही, असे म्हटले.

दरम्यान, माजी आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयात जेवण करण्याची अनुमती देण्यात आली होती. मात्र, सुनावणीनंतर त्यांना पुन्हा कारागृहात नेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली. काही समर्थकांनी त्यांचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस आणि समर्थकांमध्ये मोठी रेटारेटी झाली. परिणामी, न्यायालयाच्या परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

ए.आय. आधारित डिजिटल परिवर्तनासाठी महाराष्ट्र आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात भागीदारी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात सामंजस्य करार झाला. यानुसार, राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता (ए.आय.) केंद्र स्थापन होणार आहे. हा करार “डिजिटल भारत, आत्मनिर्भर महाराष्ट्र” संकल्पनेला बळकटी देईल, आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने शासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख होईल. याचा थेट लाभ नागरिकांना होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी म्हणाले.

*या सामंजस्य कराराअंतर्गत महाराष्ट्रात तीन ए.आय. उत्कृष्टता केंद्रे स्थापन केली जातील:*

मुंबई – भूगोल विश्लेषण केंद्र: या केंद्राच्या माध्यमातून उपग्रह इमेजरी आणि जी.आय.एस. चा वापर करून धोरणात्मक निर्णय प्रक्रियेस सहाय्य मिळेल.

पुणे – न्यायवैज्ञानिक संशोधन आणि ए.आय. केंद्र: गुन्हे तपास आणि न्यायवैज्ञानिक विश्लेषणासाठी ए.आय.चा वापर वाढविण्यात येईल.

नागपूर – मार्व्हेल केंद्र: कायद्यांची अंमलबजावणी, दक्षता आणि प्रशासन सुधारण्यासाठी ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

याव्यतिरिक्त, मायक्रोसॉफ्टचे कोपायलट (Copilot) तंत्रज्ञान शासनाच्या कार्यप्रणालीत लक्षणीय सुधारणा करेल. दस्तऐवज व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल आणि नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण शक्य होईल. हेल्थकेअर, जमीन अभिलेख व्यवस्थापन आणि वाहतूक व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांमध्येही सुधारणा होईल. यामुळे शासनाची सेवा अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकहितैषी बनेल.

मायक्रोसॉफ्टच्या एमएस लर्न (MS Learn) प्लॅटफॉर्मद्वारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त ए.आय. (AI) प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र मिळेल, ज्यामुळे त्यांच्या कार्यक्षमता सुधारतील. या सहकार्यामुळे महाराष्ट्रातील आयटी (IT) आणि ए.आय. (AI) क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

या पुढाकारामुळे महाराष्ट्र प्रशासनातील पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्याचा आणि डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक मोठा पाऊल टाकण्याचा मार्ग मोकळा होईल. महाराष्ट्र हे ए.आय.(AI) - आधारित सरकारी सेवा सुधारण्यासाठी देशातील अग्रणी राज्य बनेल, आणि देशभरातील नागरिकांना उत्तम सेवा मिळवून देईल. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.