BREAKING NEWS
latest

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा कायापालट..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे - भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री श्री. वैष्णव यांचे आभार मानले.

या योजनेत ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा, शहाड, दिवा आणि बेलापूर या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. यामुळे या भागातील प्रवाशांना आधुनिक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील पुनर्विकासासाठी निवडलेल्या स्थानकांची नावे आणि त्यासाठीचा निधी पुढीलप्रमाणे आहे:

* टिटवाळा स्टेशन: २५ कोटी रुपये

* शहाड स्टेशन: ८. ४ कोटी रुपये

* दिवा स्टेशन: ४५ कोटी रुपये

* बेलापूर स्टेशन: ३२ कोटी रुपये

याव्यतिरिक्त, कल्याण डोंबिवली परिसरातील डोंबिवली स्टेशनचा देखील या योजनेत समावेश आहे. या योजनेमुळे ठाणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना निश्चितच चांगला अनुभव मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

"१ लाख नसेल तर मरण पत्करा!" — मुंबईतील होली स्पिरिट हॉस्पिटलचा अमानुष निर्णय

संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी साप्ताहिक)

"पैशांअभावी उपचार नाकारले, जीव धोक्यात!" — होली स्पिरिट हॉस्पिटलवर गंभीर आरोप, हृदयविकारग्रस्त रुग्णाला प्रवेश नाकारल्याचा प्रकार

जोगेश्वरी/अंधेरी: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानाच, मुंबईतही पैशांअभावी उपचार नाकारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरी पूर्वेतील नामांकित होली स्पिरिट हॉस्पिटलने हृदयविकाराने त्रस्त असलेल्या एका रुग्णाला डिपॉझिट न दिल्यामुळे ऍडमिट करून घेण्यास नकार दिला. तब्बल दीड तास रुग्ण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थ अवस्थेत बसून राहिला आणि अखेर महापालिकेच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.

जिवंत असतानाही हॉस्पिटलने पाठ फिरवली!
जोगेश्वरी पूर्वेतील दुर्गानगरमधील ५२ वर्षीय अमृतलाल सोनी यांना मंगळवारी रात्री अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड उपलब्ध नसल्याने त्यांना तातडीने होली स्पिरिटमध्ये नेण्यात आले. मात्र हॉस्पिटलने तत्काळ १ लाख रुपयांचे डिपॉझिट भरण्याची अट घालून रुग्णाला ऍडमिट करण्यास स्पष्ट नकार दिला.

धर्मादाय हॉस्पिटलची अमानुष वागणूक!
होली स्पिरिट हॉस्पिटल हे धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत असूनही निर्धन व दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या बेड्सचा लाभ रुग्णाला मिळाला नाही. २५ हजार रुपये देण्याची विनंती केली असतानाही रुग्णालयाने हट्टाने नकार दिला, हे विशेष!

राजकीय हस्तक्षेप, तरीही उत्तर नाही!
अखेर नातेवाईकांनी सोनी यांना मध्यरात्री कूपर रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू आहेत. ही माहिती मिळताच मनसेच्या जोगेश्वरी विभागाने रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. मात्र कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याचे मनसेचे सचिव नितीन गावडे यांनी सांगितले. त्यांनी याप्रकरणी धर्मादाय आयुक्त व आरोग्यमंत्री यांना पत्रव्यवहार करण्याची घोषणा केली आहे.

एक प्रश्न अनुत्तरित — धर्मादाय संस्थांचे ध्येय फक्त पैसा कमवणेच आहे का?
या प्रकारानंतर होली स्पिरिट हॉस्पिटलच्या प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. आता बघावे लागेल की प्रशासन जबाबदारी स्वीकारते की या प्रकरणातही एखाद्या जीवाच्या किंमतीवर गप्प राहते!

ह्या अमानुषतेला जबाबदार कोण?
रुग्णाच्या जीवावर बेतणाऱ्या 'पेहले पैसे, फिर उपचार' या मानसिकतेविरोधात आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे.


प्रशासनाचा चांगल्या अनुभवाचा उपयोग कल्याण-डोंबिवली पालिकेत होईल - आयुक्त अभिनव गोयल

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : आरोग्य  व शिक्षण, विभागाची माला आवड असल्याने या विभागात विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे मत नवीन आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केले. कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना हिंगोली जिल्हा अधिकारी पदी चांगले काम केल्यामुळे महाराष्ट्र सरकारने माझी नियुक्ती कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त पदी केल्याचे समाधान नवीन आयुक्त अभिनव गोयल यांनी व्यक्त केले.

माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी प्रशासन लोकाभिमुख व्हावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याची मोहीम राबविण्यात येत असून, त्या धरतीवर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यात येणार असल्याचे मत महा पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी मांडले.

कल्याण डोंबिवली या शहरी भागात आपल्या क्षेत्राचे आव्हाने, त्याचे भविष्यातील नियोजन , आणि आपल्याकडे काय काय समस्या आहे, काय काय प्रश्न आहेत, त्याचबरोबर कोणकोणत्या विकास कामांचे प्रोजेक्ट चालू आहेत त्यांना गती देण्याची आपल्याला गरज आहे, त्याच्यावर एकदा सविस्तर चर्चा करून आपल्याला त्या कामावर भर देण्यात येईल. कल्याण-डोंबिवली महापालिके च्या अनधिकृत ६४ बिल्डिंगचा प्रश्न न्याय प्रविष्ट असल्याने  आपल्याला योग्य वेळेची वाट पाहावी लागणार असल्याचे मत आयुक्त अभिनव गोयल यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर आपले मत व्यक्त केले, फूट पथावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

रामनवमीला शिवसेनेचा ‘पॉवर शो’ – शाखा क्र. ७७ चं भव्य उद्घाटन!


संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)

रामनवमीच्या दिवशी शिवसेनेचं संघटनबळ झळकलं! जोगेश्वरी पूर्वमध्ये शाखा क्रमांक ७७ चे कार्यालय उद्घाटन

जोगेश्वरी, ६ एप्रिल २०२५ — रामनवमीच्या दिवशी जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील शिवसेना शाखा क्रमांक ७७ च्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेतृत्त्वाखाली खासदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा आणि शिवसैनिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता.

प्रभाग क्रमांक ७७ हा जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील एक महत्त्वाचा प्रभाग मानला जातो. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ या भागात खासदार रविंद्र वायकर यांचे सक्रिय कार्य सुरू आहे. उद्घाटनप्रसंगी त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना कार्यालयाचा वापर जनतेच्या सेवेसाठी आणि संपर्कासाठी करावा, असे आवाहन केले.

शाखाप्रमुख प्रकाश (बंड्या) शिंदे यांनी यावेळी सांगितले की, “शिवसेना पक्षाचे विचार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धोरण आणि खासदार रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहणार आहे. विधानसभेत मताधिक्य वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे.”

विभागप्रमुख ज्ञानेश्वर सावंत यांनी आगामी महापालिका निवडणुकीत आठही प्रभागांमध्ये शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.
त्याचबरोबर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांबाबत सुरू असलेल्या अपप्रचाराला उत्तर देत ते म्हणाले की, "विकास कामांबाबत कोणताही गैरसमज पसरवला जाणार नाही, आणि सत्य जनतेपुढे मांडले जाईल."

कार्यक्रमास विधानसभा मार्गदर्शक मनीषा वायकर, लोकसभा सहसंपर्कप्रमुख रचना सावंत, महिला विभाग प्रमुख प्रियांका आंबोळकर, तसेच शाखा संघटिका, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, युवासेना, व्यापारी आघाडी व इतर अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनाचा हा सोहळा रामनवमीच्या दिवशी पार पडत असल्याने परिसरात एक उत्साही वातावरण निर्माण झाले होते. नव्याने सुरु झालेलं हे कार्यालय शिवसैनिकांसाठी नवे केंद्रबिंदू ठरणार आहे.


'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये 'रामनवमी' सोहळा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्ष नवमी तिथी म्हणजेच रामनवमी, रामजन्म. 'जे एम एफ' शिक्षण संस्था संचलित जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मध्ये देखील रामजन्म सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नागपूर येथील उच्च शाळेतील निवृत्त मुख्याध्यापक श्री. परशुरामजी भांगे, सौ. पुष्पा भांगे, संस्थेच्या खजिनदार जान्हवी कोल्हे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सर्वप्रथम विद्यार्थिनी इव्हा शॉ व रोमी शॉ या भगिनींनी राम स्तुती वर आधारीत 'ठुमक चलत रामचंद्र..' हे नृत्य सादर केले. इयत्ता पाचवी मधील अवंत या विद्यार्थ्याने श्रीरामाची गोष्ट सांगून माहिती दिली. इयत्ता चौथी मधील समायरा, जाई, आणि रूही या विद्यार्थिनींनी आपल्या शास्त्रीय नृत्यातून संपूर्ण रामायण सादर केले तर इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी नाटक सादर केले. सर्व मुले राम लक्ष्मण सीता, हनुमान, तसेच रामायण मधील इतर पात्र बनून आले होते. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी गीत रामायण मधील 'नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू..'  हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गणित विषयाच्या शिक्षिका सौ. सुरुची पंड्या यांनी राम चरित मानस मधील पद गाऊन सर्वांना आनंद दिला. तर दुपारच्या सत्रात नाट्य विभागाचे शिक्षक नितेश मेस्त्री यांनी  'आरंभी वंदीन अयोध्येचा राजा.. हे गीत सादर करून सर्वांच्या डोळ्यासमोर अयोध्येचे चित्र उभे केले.
पुत्र असावा तर रामासारखा, पती असावा तर रामासारखा, भाऊ असावा तर रामासारखा. श्रीरामा सारखा संयम, शत्रूलाही सुहास्य वदनाने नमविता आले पाहिजे अशा मर्यादा पुरुषोत्तमाचे गुण सर्वांमध्ये असले पाहिजेत, असे प्रमुख पाहुणे श्री. परशुरामजी भांगे यांनी रामनवमीच्या शुभेच्छा देताना सांगितले. तर चार युगांची माहिती देत कलियुगामध्ये देव आणि दानव हे कसे मानवाच्या अंतर्गत आहेत आणि त्या अंतर्मनावर मात करण्यासाठी श्रीरामाचे अंतर बाह्य अवलोकन करणे गरजेचे आहे असे खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी मुलांना सांगून श्रीरामसारखे निस्वार्थी प्रेम करा असेही सांगितले व शुभेच्छा दिल्या.
     
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे सध्या शैक्षणिक चर्चासत्रासाठी माउंट अबू येथे वास्तव्यास आहेत, तेथूनच त्यांनी दूरचित्र संभाषण द्वारे (व्हिडिओ कॉल) सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. रामासारखे चरित्र, निस्सिम बंधूप्रेम, आज्ञाधारक, प्रसंगी शत्रूलाही लढा देऊन क्षमा करणारा केवळ श्रीराम आहे, अशा श्रीरामसारखे कर्तुत्ववान व्हा असे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे व डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले व सर्वांना पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. 
      
आजच्या दिवशी मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये जणु काही अयोध्या सजली होती. श्री. नरेश पिसाट, अवधूत देसाई सर यांनी सर्व ठिकाणी भगवे पताके, फुलांच्या माळा, रांगोळ्या यांची भव्य दिव्य सजावट केली होती. सर्व सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाल्यावर पाहुण्यांच्या हस्ते पाळण्या मध्ये श्रीरामाची मूर्ती ठेऊन, संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी 'राम जन्मला ग सखी..' हा पाळणा गाऊन राम जन्म सोहळा संपन्न झाला. तसेच रामाची आरती करण्यात आली. त्याच बरोबर चैत्र महिना म्हणजे चैत्र देवीचे नवरात्र, तुळजा भवानी देवीची पूजा करून आरती करण्यात आली. कलात्मक शिक्षक अभिषेक देसाई, प्रमोद पगारे, दीपा तांबे , रमेश वागे, सौ.मयुरी खोब्रागडे सौ. श्रेया कुलकर्णी व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमाची उत्तम तयारी करून राम जन्म सोहळा संपन्न केला.

खडकपाडा पोलीस ठाणे हद्‌दीतील अटाळी परिसरातील वृद्ध महिलेच्या खुनाचे गुन्ह्यातील आरोपीस अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : दिनांक २०/०३/२०२५ रोजी श्रीमती रंजना चंद्रकात पाटेकर (वय: ६० वर्षे), राहणार. सिद्धीविनायक चाळ, खापरीपाडा, अटाळी, आंबिवली कल्याण (पश्चिम) यांचा राहते घरी अज्ञात मारेकरी याने जबरी चोरी करून श्रीमती रंजना पाटेकर या वृध्द महिलेचा खुन केल्याबाबत वृद्ध महिलेचा भाचा श्री. हर्षल प्रेमाचंद पाटकर यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पो.स्टे. गु.रजि.नं. २५३/२०२५ भारतीय न्याय संहीता १०३(१) ३११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी बाबत काहीएक धागा दोरा नसताना तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यानी शिताफीने माहिती काढून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी नामे चांद उर्फ अकबर महम्मद शेख, (वय; ३० वर्षे), राहणार. संतोषी माता नगर, नवनाथ कॉलनी, रूम न. १० आंविवली, कल्याण (पश्चिम) यांस मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे ताब्यात घेवुन आरोपी नामे चांद उर्फ अकबर शेख याच्याकडे शिताफीने व सखोल तपास करून सदर गुन्ह्यातील जबरी चोरी झालेला मुद्देमाल १,०५,०००/- रूपये किंमतीचा हस्तगत करून आरोपीस सदर गुन्ह्यात अटक करून कौशल्यपूर्ण पध्द‌तीने गुन्हा उपडकीस आणलेला आहे.

गुन्ह्याच्या तपासात आरोपी नामे चांद उर्फ अकबर महम्मद शेख हा घटनास्थळाचे परिसरात राहण्यास असुन आरोपीस मोमोज विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे हवे असल्याने त्याने जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने मयताचे घराची काही दिवसापासून रेकी करून घटनेच्या वेळी मयत श्रीमती रंजना पाटकर ह्या घरात एकटयाच असताना आरोपी याने मयत यांच्याकडे पिण्याचे पाणी मागितले, मयत पाणी आणण्यासाठी आत गेल्या असतां आरोपी याने फिर्यादीच्या घरात प्रवेश करून हॉलमधील टिव्हीचा आवाज वाढविला, तदनंतर मयत ह्यांनी आरडा ओरडा करू नये म्हणून हाताने तोंड दाबुन जमीनीवर आपटून, गळा दाबुन जिवे ठार मारले, त्यानंतर मयताच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र, व कानातील सोन्याची कर्नफुले असा एकुण १,०५,०००/- रूपये किंमतीचा मु‌द्देमाल जबरी चोरी केला होता.

अटक आरोपी नामे चांद उर्फ अकबर महम्मद शेख यास यापुर्वी कोळशेवाडी पो स्टे. गु.रजि.नं. १२२/२०१४ भा.दं.वि.सं.कलम ३०२,२०१,४६०,३४ मध्ये आधारवाडी कारागृहात बंदी होता. आठ महिन्यापूर्वी सदर आरोपी हा कारागृहातून बाहेर येवुन मानेगांव अटाळी, कल्याण (पश्चिम) येथे राहण्यास होता. तदनंतर त्याने सदरचा गुन्हा केला असुन त्यास सदर जबरी चोरीसह खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन सध्या तो खडकपाडा पोलीस ठाण्याच्या  पोलीस कोठडी मध्ये आहे.

सदर गुन्ह्यात अज्ञात मारेकरी यांचा कोणत्याही प्रकारचा धागा दोरा नसतांना खडकपाडा पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मा. पोलीस आयुक्त श्री. आशुतोश डुंबरे, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. संजय जाधव, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३. कल्याण श्री. अतुल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त कल्याण विभाग श्री. कल्याणजी घेटे यांनी तपासकामी मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. संदीप शिवले नेम. खडकपाडा पोलीस ठाणे करीत आहेत. सदरची कामगिरी खडकपाडा पोलीस ठाणे तपास पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप शिवले. सपोनि. विजय गायकवाड, अनिल गायकवाड, पोउपनिरी. अर्जुन दांडेगावकर, सेपोउपनि. सुधीर पाटील, पोहवा. राजु लोखंडे, योगेश बुधकर, कुंदन भामरे, संदीप भोईर, विनोद कामडी, किरण शिर्के, संजय चव्हाण, ज्योती देसले, पोशि. ललीत शिंदे, महेश बगाड, राहुल शिंदे, अविनाश पाटील, अनंता देसले, सुरज खंडाळे, मनोहर भोईर, धनराज तरे यांनी यशस्वीपणे केली आहे.

दोन बलात्कारी गुन्ह्यातील रिल स्टार आरोपीस नाशिक येथुन खंडणी विरोधी पथक, ठाणे यांच्याकडून अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : मानपाडा पोलीस स्टेशन गुरजिनं ३४१/२०२५ बीएनएस कायदा कलम ६४, ७४, ११५(२), ३५१(२), ३(५) सह आर्म ऍक्ट कायदा कलम ३,२५ व  टिळकनगर पोलीस स्टेशन गुरजिनं २६७/२०२५ भादंवि कलम ३७६ (२), (एन) ५०४, ५०६ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील पाहीजे असलेला आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील (वय: ५२ वर्षे), राहणार. चौधरी बिल्डिंग, २ रा माळा, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, बारा बंगला रोड, ठाकुर्ली, डोंबिवली (पुर्व) हा गुन्हे दाखल झाल्यापासुन फरार झालेला होता व सापडत नव्हता. सदर पाहीजे आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील याचा गुप्त बातमीदारांकरवी शोध घेतला असता तो 'हॉटेल सेलीब्रेशन' जिल्हा नाशिक याठिकाणी लपुन बसला असल्याबाबत माहीती प्राप्त झाली होती.
सदर मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील यांस इंदीरानगर पोलीस स्टेशन, नाशिक शहर यांच्या मदतीने खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांनी 'हॉटेल सेलीब्रेशन' जिल्हा नाशिक येथुन दिनांक ०४/०४/२०२५ रोजी सायंकाळी ०८.०० वाजता पकडून ताब्यात घेतले असुन, त्यास पुढील तपासकामी मानपाडा पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई मा. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर मा. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, मा. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-१, गुन्हे शाखा, ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक मा. विनायक घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध -२, गुन्हे शाखा, ठाणे, यांच्या  मार्गदर्शनाखाली पोनि. नरेश पवार, सपोनि. सुनिल तारमळे, श्रीकृष्ण गोरे, पोउपनिरी. सुहास तावडे, सपोउपनिरी. संदीप भोसले, पोहवा. ठाकुर, पाटील, गायकवाड, जाधव, गडगे, मपोहवा. पावसकर, पोना. हासे, मधाळे, चापोना. हिवरे, पोशि. वायकर, ढाकणे यांनी यशस्वीपणे केली आहे.