BREAKING NEWS
latest

कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चोरी करणाऱ्या सराई चोरट्याला पोलीसांनी केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. १८ रोजी रात्रीच्या वेळी, जिम्मी बाग, कर्पेवाडी कल्याण (पुर्व) येथे फिर्यादी राजेश देवीदयाल मेहुलीया (वय: ४६ वर्षे), काम रिक्षा चालक, राहणार: जय श्रीहरी सोसायटी चाळ न. १, रूम नं ८, जिम्मी बाग, कर्पेवाडी कल्याण पुर्व यांची रहात्या घरासमोर पार्क केलेली रिक्षा ही अज्ञात इसमाने चोरी करून नेली म्हणुन कोळसेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ३१४/२०२५ भा.न्या. संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दि. २०/०४/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर दाखल गुन्ह्याच्या तपासात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक माहीती व गुप्त बातमीदारांमार्फत माहीती काढून कौशल्यपुर्ण तपास करून अनोळखी आरोपी निष्पन्न करून रेकॉर्डवरील आरोपी प्रांजल मनोज बर्वे, (वय: २६ वर्षे), राहणार:  रूम नं. १५, योगेश अपार्टमेंट, करपे वाडी, न्यु जिम्मी बाग, कल्याण (पुर्व) यास चोरी केलेल्या रिक्षा सह शिताफीने पकडून दि. २१ रोजी अटक केली व त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेले ६५,०००/- रू. किंमतीची MH-05-CG-8672 रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-३, कल्याण श्री. अतुल झेंडे, व सहा. पोलीस आयुक्त कल्याण विभाग श्री. कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाणेचे वपोनिरी.गणेश न्हायदे,सहा.पो.निरी. दर्शन पाटील, संदीप भालेराव, पोहवा. बुधवंत, जाधव, भामरे, वाघ, सौंदाणे, जरग, कापडी, पोशि. सोनवळे, सोनवणे यांच्या पथकाने यशस्वीरित्या केली आहे.

केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी केली उल्हास नदीची पाहणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण-डोंबिवली  महापालिका आयुक्‍त अभिनव गोयल यांनी सोमवारी कल्याण परिक्षेत्रातील उल्हास नदी व कल्याण (पश्चिम) येथील नाले साफ-सफाईचा पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उल्हास नदीतील जलपर्णी काढण्याचे काम सुरू असून त्यांची पाहणी करून मोहने, गाळेगाव परिसरातील नदीपत्रात येणारे सांडपाणी उपाययोजना काय करता येतील यांचा आढावा घेतला. तसेच उल्हास नदीतील जलपर्णीवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यावर भर देण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पाहणी दौऱ्या समयी दिली.
नालेसफाई त्वरीत करणेबाबत संबंधित अधिकाऱ्‍यांना दिले सक्त निर्देश 

उल्हास नदीमध्ये औद्योगिक कंपन्यांचे केमिकलयुक्त पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात असल्याने नाल्यांमधील जलपर्णी वाढल्यामुळे गाळ साचतो व पावसाळ्यात नाले ओव्हरफ्लो होतात. यावर कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून उल्हास नदी‍ पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. यादृष्टीकोनातून महानगरपालिकेने नियोजन सुरु केले असल्याबाबत महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले आहे. मोहने व गाळेगाव येथील उल्हास नदीला मिळणाऱ्या नाल्यांची पाहणी करण्यात आली, उल्हास नदी मधील जलपर्णी काढण्याचे काम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मार्फत सुरू आहे. आयुक्तांनी या बाबतीत पुढील उपाययोजना करण्याच्या दृष्टीने डी.पी.आर.करणे बाबत संबंधितांना निर्देशित केले व लवकरात लवकर डि.पी.आर.तयार करून शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येईल असे सांगितले.
क.डो.मनपा आयुक्त यांनी "अ" प्रभागातील लहुजी नगर येथील रस्त्यावरील झोपडपट्टी व चाळीतील सांडपाणी व्यवस्थेची पाहणी केली. कल्याण पश्चिमेतील नाले साफ-सफाई करण्यास सुरुवात झालेली आहे. असल्याने अंबिकानगर येथील नालेसफाईच्या प्रस्तावित कामाबाबत पाहणी केली. त्यानंतर "ब" प्रभागातील अनुपम नगर येथील नाला व चिकन घर येथील नाल्याची पाहणी केली. घनकचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे सुरू राहण्याच्या दृष्टीने व नाल्यात कमीत कमी कचरा जाईल असे होण्याच्या दृष्टीने आयुक्त महोदयांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील तसेच "ब" प्रभागाचे सहा.आयुक्त प्रिती गाडे यांना याबाबत डीप क्लिनिंग करणे बाबत निर्देशित केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, उपायुक्त अतुल पाटील, प्रसाद बोरकर, संजय जाधव, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ, शैलेश मळेकर, योगेश गोटेकर, 'ब' प्रभागाच्या सहा.आयुक्त प्रिती गाडे, 'अ' प्रभागाचे सहा.आयुक्त प्रमोद पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर, इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.