BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

प्रवाशांच्या खिशावर भार देत तिकिटांचे दर वाढवत नवीन वर्षाआधी रेल्वेचा मोठा धक्का..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी दिल्ली:  नाताळचा सण आणि नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर भारतीय रेल्वेने लाखो प्रवाशांना मोठा आर्थिक झटका दिला आहे. रेल्वेने तिकिटांच्या दरात वाढ जाहीर केली असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर होणार आहे. रविवार, २६ डिसेंबर २०२५ रोजी रेल्वेकडून नवीन भाडे यादी जाहीर केली जाणार असून, या भाडेवाढीतून रेल्वेला सुमारे ₹६०० कोटींचे अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

२१५ किमीपेक्षा जास्त प्रवासासाठीच भाडेवाढ

सामान्य श्रेणी (जनरल क्लास): २१५ किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी प्रति किलोमीटर ₹१ मेल/एक्सप्रेस, नॉन-एसी आणि एसी श्रेणी: प्रति किलोमीटर ₹२ वाढ २१५ किमीपेक्षा कमी अंतराच्या प्रवासासाठी भाड्यात कोणताही बदल नाही.

५०० किमी प्रवासावर किती भार ?

नॉन-एसी श्रेणीमध्ये ५०० किलोमीटरच्या प्रवासासाठी प्रवाशांना तब्बल ₹१० जास्त मोजावे लागणार आहेत.

दिलासा कोणाला ? 

निम्न व मध्यम वर्गीय प्रवाशांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ,उपनगरीय लोकल मासिक हंगामी तिकिटे (पास) या तिकिटांच्या दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

नाताळ–नवीन वर्षासाठी खुशखबर! २४४ विशेष रेल्वे फेऱ्या

प्रवाशांच्या गर्दीचा अंदाज घेत भारतीय रेल्वेने नाताळ आणि नवीन वर्षासाठी मोठा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व आठ झोनमध्ये २४४ अतिरिक्त विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

कोणते मार्ग असणार विशेष ?

दिल्ली, हावडा, लखनौ आणि आसपासची शहरे
मुंबई–गोवा (कोकण) कॉरिडॉरवर विशेष दैनिक व साप्ताहिक गाड्या
मुंबई–नागपूर, पुणे–सांगनेर आणि महाराष्ट्रातील प्रमुख मार्गांवर अतिरिक्त सेवा
घराकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणि सुट्टीसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरणार आहे.

तिकिटांच्या दरवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी असली तरी, सणासुदीच्या काळात सुरू करण्यात आलेल्या विशेष गाड्यांमुळे काहीसा दिलासा मिळणार आहे. आता प्रवाशांचे लक्ष फक्त एकाच गोष्टीकडे तिकिट मिळते का ? आणि किती महाग पडते ?

रोटरी क्लब ऑफ दिवा-ठाणे व एस.एम.जी विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ९ वी आंतरशालेय चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न..

विशेष प्रतिनिधी

दिवा : रोटरी क्लब ऑफ दिवा-ठाणे आणि एस.एम.जी विद्यामंदिर, दिवा (पूर्व) यांच्या संयुक्त विद्यमाने दिवा शहरात ९ वी आंतरशालेय चित्रकला स्पर्धा २०२५ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेत दिव्यातील विविध शाळांमधील तब्बल ८०२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपली कलागुणांची झलक सादर केली.
या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी रंग, कल्पकता आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून विविध विषयांवर सुंदर चित्रे साकारली. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि कलात्मक सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रमात आनंदी व उत्स्फूर्त वातावरण पाहायला मिळाले.
या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ दिवा-ठाणेचे अध्यक्ष किशोर पाटील, उपजिल्हा प्रांतपाल जितेंद्र नेमाडे, रोटरी क्लब ऑफ दिवा-ठाणेचे माजी अध्यक्ष साईनाथ म्हात्रे, ओम साई शिक्षण संस्थेचे सचिव स्वप्नील गायकर, तसेच गणेश टावरे, सी.ए विकास गुंजाळ उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो, असे मत व्यक्त केले.

या यशस्वी स्पर्धेसाठी आयोजक संस्था, शिक्षकवर्ग, स्वयंसेवक व पालकांचे मोलाचे योगदान लाभले. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे ही ९ वी आंतरशालेय चित्रकला स्पर्धा यशस्वी व संस्मरणीय ठरली.

पत्रकारांच्या डोळ्यांची काळजी डिजिटल युगात महत्त्वाची ! प्रेस क्लब कल्याण रौप्य महोत्सवानिमित्त पत्रकारांसाठी नेत्र आरोग्य मार्गदर्शन शिबिर संपन्न..


प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण -: पत्रकार नेहमी बातमी मिळविण्यासाठी दिवसभर खूप धडपड करीत असतो पण तो स्वतःची काळजी कधीच घेत नाही. त्यातच आजच्या डिजिटल युगात सतत मोबाईलवर काम करत राहणे त्यामुळे डोळ्यांवर प्रचंड ताण येत आहे. डोळ्यांवर येणारा ताण प्रत्येक जण दुर्लक्षित करीत आहे याकडे दुर्लक्ष न करता आपल्या आरोग्याची काळजी व डोळ्यांची निगा राखणे महत्वाचे असून याकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला देत डोळ्यांची काळजी कशी घ्यावी व यासाठी काय करावे लागेल याबाबतची विस्तृतपणे माहिती ईशा नेत्रालय खडकपाडा शाखेच्या वरिष्ठ रेटिना शल्यचिकित्सक डॉ. पुष्पांजली रामटेके यांनी प्रेस क्लब कल्याण आयोजित वार्तालाप सोहळ्या प्रसंगी दिली.
कल्याण-डोंबिवली शहर परिसरात गेल्या पंचवीस वर्षांपासून पत्रकारांसाठी कार्यरत राहणारी ठाणे जिल्ह्यातील पहिली रजिस्टर संस्था 'प्रेस क्लब कल्याण' ला पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्याने रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे त्यानिमित्त पत्रकारांच्या डोळ्यांची काळजी आणि डोळ्यांची निगा राखण्यासाठी कल्याण खडकपाडा येथील ईशा नेत्रालयाचा वार्तालाप सोहळा पार पडला. यावेळी डॉ. पुष्पांजली रामटेके, बाल नेत्र तज्ञ डॉ. स्नेहा पेशवाणी प्रेस क्लब चे अध्यक्ष आनंद मोरे, कार्याध्यक्ष कुणाल म्हात्रे, सचिव विष्णूकुमार चौधरी आदी सह अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी पत्रकारांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, रोज मोबाईलवर किती काम करावे, झोप किती घ्यावी, आराम कसा करावा अशा अनेक बाबींचा ऊहापोह डॉ. पुष्पांजली रामटेके यांनी केला. बाल नेत्र डॉ. स्नेहा पेशवाणी यांनी लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी आधी पासूनच कशी करावी याबाबत अनेक उदाहरण देत मार्गदर्शन केले. डोळ्यांची तपासणी व शस्त्रक्रिया महागडी आहे म्हणून दुर्लक्ष करू नका, डोळे आहेत तर आपण जग बघू शकू व बातम्या करू शकतो त्यामुळे आपल्या डोळ्यांची सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रेस क्लब चे ज्येष्ठ सदस्य दत्ता भाटे यांनी केले. तर कार्याध्यक्ष कुणाल म्हात्रे यांनी उपस्थित मान्यवरांनी दिलेल्या माहितीकडे दुर्लक्ष न करता डोळ्यांची वेळेवर तपासणी करा असे यावेळी सांगितले. वार्तालाप सोहळ्या प्रसंगी ईशा नेत्रालयाच्या वतीने उपस्थित पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबाच्या डोळ्यांची मोफत तपासणीचे फॅमिली कार्ड आणि आय मास्क देऊन पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवर डॉक्टरांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली व शंकाचे निरसन केले. 
या वार्तालापा प्रसंगी ईशा नेत्रालय खडकपाडा शाखेचे विस्तार अधिकारी गौरव कांबळे, शाखा अधिकारी राजश्री वाघ, विशाखा शहा आदी मान्यवरांचे जेष्ठ सदस्य नवीनभाई भानुशाली, अतुल फडके, सचिन सागरे, राजेश जाधव, रवि चौधरी यांनी स्वागत केले या वार्तालापाला ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य, आर टी. सुरळकर, नाना म्हात्रे, दिलीप पाटणकर, रविंद्र खरात, संतोष होळकर, केतन बेटावदकर, आकाश गायकवाड, चारुशीला पाटील, राजू काऊतकर, सिद्धार्थ कांबळे, नारायण सुरोशी, संभाजी मोरे आदी सह विविध दैनिकाचे आणि वृत्तवाहिनीचे पत्रकार उपस्थित होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन अशोक कांबळे यांनी आपल्या बहारदार शैलीत केले तर दत्ता भाटे यांनी आभार व्यक्त केले.

शिंदे गटाच्या मनमानी कारभाराला कंटाळून दिव्यात मिंधे गटाला मोठा धक्का देत ‘लाडक्या बहिणींचा’ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश..

विशेष प्रतिनिधी

दिवा :- दिवा शहरात शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून, शिंदे गटातील अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे.

हा जाहीर प्रवेश आमदार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यामध्ये शर्मिला अजय म्हात्रे (शाखा संघटिका), मनाली मंगेश उगवे, वनिता देवकर, नंदा चव्हाण, भारती फडणीस, भाग्यश्री येवले, वृषाली जगताप, सपना पवार, गीता डोके, कुंदा डिके व ज्योती दळवी या महिला पदाधिकाऱ्यांनी मिंधे गटाच्या कार्यपद्धतीला रामराम ठोकत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.

शिंदे गटात दिवा शहरात सुरू असलेल्या मनमानी कारभार, महिलांना विश्वासात न घेणे, संघटनात्मक निर्णयांपासून दूर ठेवणे व केवळ नावापुरती “लाडकी बहीण” योजना या धोरणामुळे आपण कंटाळलो असल्याचे या महिला पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले. प्रत्यक्षात महिलांचा सन्मान करणारा, निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेणारा आणि खऱ्या अर्थाने महिलांना बळ देणारा पक्ष म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या प्रवेशावेळी कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, जिल्हाप्रमुख कल्पेश भोईर, धनंजय बोराडे, जिल्हा संघटक अभिजीत सावंत, जिल्हा संघटिका वैशाली दरेकर, युवा जिल्हा अधिकारी प्रतीक पाटील, विधानसभा प्रमुख ऍड. रोहिदास मुंडे, दिवा शहरप्रमुख सचिन पाटील, विधानसभा संघटिका योगिता नाईक यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

दिवा शहरात मिंधे गटाचा फसवा कारभार आता उघड होत असून, महिलांच्याच नेतृत्वातून मिंधे गटाला जबरदस्त चपराक बसल्याचे चित्र आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पाश्वभूमीवर हा प्रवेश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद वाढवणारा असून, दिव्यातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरणार आहे, असे ऍड. रोहिदास मुंडे यांनी सांगितले.

आधार पडताळणीसाठी नवा नियम; हॉटेल्स आणि इव्हेंटमध्ये फोटो कॉपीवर बंदी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिल्ली: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आता हॉटेल्स, इव्हेंट स्थळे किंवा इतर कोणत्याही समकक्ष कार्यक्रमांसाठी आधार कार्डची फोटो कॉपी स्वीकारणे पूर्णपणे बंद होणार आहे. आधारची फोटो कॉपी जमा करणे हा सध्याच्या कायद्याचा भंग असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

हॉटेल्स आणि इव्हेंट आयोजकांसाठी नवी पडताळणी प्रक्रिया तयार

UIDAI चे CEO भुवनेश कुमार यांनी सांगितले की हॉटेल्स आणि इव्हेंट ऑर्गनायझर्ससाठी आधार-आधारित पडताळणीची नवी रचना तयार करण्यात येत आहे. यासाठी संस्थांना नोंदणी करून नव्या पडताळणी प्रणालीचा प्रवेश मिळू शकेल.

ते म्हणाले की, पडताळणी प्रक्रिया QR कोड स्कॅनिंगद्वारे किंवा नव्या आधार मोबाईल ऍपद्वारे केली जाईल. ही प्रक्रिया अधिक सुरक्षित, वेगवान आणि कागदविरहित असेल.

पेपर बेस्ड पडताळणी होणार बंद; नवा ऍप लवकरच

UIDAI ने या नव्या नियमांना मंजुरी दिली असून लवकरच ते नोटिफाय केले जातील. पेपर बेस्ड पडताळणी बंद करण्यासाठी नवी डिजिटल प्रणाली लागू केली जात आहे.

नव्या प्रणालीत खास इंटरमिडीएटरी सर्व्हरवरील अडचणी दूर करण्यावर भर देण्यात आला आहे. हॉटेल्स आणि इतर संस्थांना ऑफलाईन ऑथेंटिकेशन करावे लागेल, त्यानंतर त्यांना API चा प्रवेश मिळेल.

UIDAI सध्या बीटा टेस्टिंग करत आहे. नव्या ऍपमध्ये App-to-App authentication असेल, ज्यामुळे प्रत्येक पडताळणीसाठी सेंट्रल सर्व्हरशी जोडणीची गरज भासणार नाही. ही प्रक्रिया एअरपोर्ट, रिटेल स्टोअर्स आणि इतर अनेक ठिकाणी वापरता येणार आहे.

गोपनीयतेचे संरक्षण अधिक मजबूत होणार

भुवनेश कुमार यांनी सांगितले की नवी पडताळणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गोपनीयतेचे संरक्षण अधिक मजबूत होईल. पेपर बेस्ड पडताळणीत होणारे धोक्यांचे प्रमाण कमी होईल आणि आधार डेटा लीक होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात घटेल.

नव्या ऍपमधील सुधारणांमुळे डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायद्याला (DPDP Act) प्रत्यक्ष समर्थन मिळेल, ज्याची अंमलबजावणी १८ महिन्यांत होणार आहे.

आधार पडताळणी आता अधिक सुरक्षित, डिजिटल आणि पेपरविरहित

UIDAI च्या नव्या निर्णयामुळे देशभरातील हॉटेल्स, कार्यक्रम स्थळे आणि इतर संस्था नव्या डिजिटल पडताळणी प्रक्रियेकडे वळणार आहेत. यामुळे डेटा सुरक्षितता वाढेल आणि आधाराच्या गैरवापरावर नियंत्रण मिळेल.

दिव्यात ठाकरे पक्षाच्या विभागप्रमुखांनी हाती घेतला शिंदेंचा धनुष्यबाण..

विशेष प्रतिनिधी

दिवा:  दिवा शहरातील ठाकरे गटाला धक्का देत त्या पक्षाच्या दोन ज्येष्ठ विभागप्रमुखांनी आज शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. माजी उपमहापौर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात उपशहर प्रमुख, माजी नगरसेवक, विभागप्रमुख, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख गुरुनाथ नाईक, श्रीधर बेडेकर यांच्यासह माधुरी नाईक, सचिन भुवड आणि विकी नाईक यांनी शिंदे गटाचा धनुष्यबाण हाती घेतला. या प्रवेशामुळे दिवा शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ज्येष्ठ शिवसैनिक गुरुनाथ नाईक यांचे त्यांच्या स्वगृही मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. दिवा शहरात सन १९८४ साली शिवसेना उभी राहत असताना केवळ पाच कार्यकर्ते सक्रिय होते, त्यापैकी एक म्हणून गुरुनाथ नाईक यांचे नाव घेतले जाते. पक्ष वाढीसाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असून, माजी महापौर रमाकांत मढवी यांच्या निवडणुकीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाला दिवा शहरात बळकटी मिळणार असून, येत्या काळात राजकीय हालचाली अधिक तीव्र होतील, असे चित्र सध्या दिसून येत आहे.

दिव्यातील भाजपचे सतीश केळशीकर यांची ठाणे जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि. १८ डिसेंबर : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, ठाणे शहर (जिल्हा) यांच्या वतीने शशिकांत (सतीश) मनोहर केळशीकर यांची ठाणे जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, ठाणे शहर विधानसभा आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, भाजप प्रदेश सरचिटणीस डॉ. माधवी नाईक-मेंढे तसेच भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली.

या प्रसंगी अनुसूचित जाती मोर्चा, ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष विरसिंह पारछा यांनी विशेष मार्गदर्शन करत, सतीश केळशीकर आपल्या कार्यकाळात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून संघटना अधिक बळकट करण्यासाठी निश्चितच मोलाचे योगदान देतील, असा विश्वास व्यक्त केला.

नवनियुक्त सरचिटणीस सतीश केळशीकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पक्षाला योग्य दिशेने पुढे नेण्याचे काम आपण प्रामाणिकपणे करू. वरिष्ठ नेते व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेली विकासकामे पुढे सुरू ठेवून संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाईल. भारतीय जनता पार्टीत कोणतेही गट नसून सर्वांना सोबत घेऊन काम करणारा हा पक्ष आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.