BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

ऐतिहासिक व धार्मिक परंपरा व महत्व असलेले 'आट्या पाट्या' खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर ; नवीन पिढी खेळापासून दूर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

उरण - होळी जवळ आली कि सर्वांना आठवण होते ती आट्या पाट्या खेळाची. प्राचीन काळापासून चालत आलेल्या व भारतीय परंपरेतील आट्या पाट्या खेळाला अनन्य साधारण महत्व आहे. मात्र सध्याच्या २१व्या युगातील जीवघेण्या स्पर्धेच्या व धकाधकीच्या युगात हा खेळ मात्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. उरण तालुक्यात पूर्वी मोठया उत्साहात व आनंदाने खेळल्या जाणारे सण आता उरण मध्ये एक दोन ठिकाणे सोडली तर कुठेही खेळले जात नाही. पूर्वी उरण तालुक्यात हा खेळ होळीच्या दहा दिवसा अगोदर पासून जिथे होळी पेटवली जाते त्या ठिकाणी खेळला जात होता. आता मात्र नवीन पिढीला हा खेळ माहित नसल्याने तसेच मैदानी खेळापासून आजची लहान मुले हळूहळू दूर जात असल्याने सध्या हा खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी या खेळाला राजाश्रय होता म्हणून हा खेळ टिकून राहिला. आता मात्र या खेळाला शासकीय अनुदान व सहकार्यावर अवलंबून राहावे लागते.भारतीय संस्कृतीतील या खेळाला नव संजीवनी प्राप्त करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. जास्तीत जास्त प्रमाणात या खेळाचे सर्वत्र आयोजन केल्यास, जनजागृती केल्यास निश्चितच या खेळाला चांगले दिवस येतील.
उरण शहरामध्ये 'श्री शीतळा देवी मंदिर', देऊळवाडी येथे होळीच्या ठिकाणी आट्या पाट्या खेळण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे. पूर्वी होळीच्या दहा दिवसा अगोदर पासून देऊळवाडी उरण शहरात हा खेळ खेळला जायचा. आता मात्र होळीच्या दिवशी एकच दिवस हा खेळ उरण शहरातील देऊळवाडीत खेळला जातो. आट्यापाट्या हा महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये (किलिथट्टू नावाने) लोकप्रिय असलेला, शारीरिक चपळाई व धोरणात्मक कौशल्याचा प्राचीन भारतीय मैदानी खेळ आहे. दोन संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या खेळात, एका संघाला सूरपाटी व इतर नऊ आडव्या पाट्यांतून (गाळ्यांतून) बचाव करत, प्रतिस्पर्ध्यांच्या अडथळ्यांना हुलकावणी देऊन शेवटच्या लोणपाटीपर्यंत पोहोचायचे असते.
आट्यापाट्या खेळाची सविस्तर माहिती :

मैदान आणि रचना:-  
हा खेळ सपाट मैदानात खेळला जातो. शहरात मैदानात हा खेळ खेळला जातो. यात मध्यभागी एक लांब रेषा (मृदंगपाटी किंवा सूरपाटी) असते आणि तिला छेदून ९ आडव्या पाट्या (कप्पे) असतात. खेळाच्या सुरुवातीच्या पाटीला 'चांभारपाटी' तर शेवटच्या पाटीला 'लोणपाटी' म्हणतात. 

खेळाडू आणि संघ:- 
प्रत्येक संघात साधारणपणे ९ खेळाडू असतात. खेळामध्ये दोन संघ असतात. एक 'पाटी धरणारा' (Defending) आणि दुसरा 'खेळणारा' (Attacking)   असे दोन संघ असतात. एक संघ बचावाच्या भूमिकेत तर दुसरा संघ आक्रमणाच्या भूमिकेत असतो.

खेळाचे नियम आणि उद्देश:- 
बचाव (Defending) भूमिकेत असलेले  खेळाडू फक्त उभ्या रेषेवर (सूरपाटी) पाय ठेवून दोन्ही बाजूंना उड्या मारून किंवा धावून अटॅकिंग खेळाडूंना आडव्या पाट्या ओलांडण्यापासून रोखतात.
आक्रमण (Attacking) च्या भूमिकेत असणारे, खेळणारे खेळाडू हुलकावणी देऊन, वेगाने धावत एक-एक पाटी पार करून लोणपाटीपर्यंत जातात. एक एक चौकोन पार करत पुढे जातात व शेवटी आपले उद्दिष्टे साध्य करतात.

बाद (Out):-  जर पाटी धरणाऱ्या खेळाडूने धावणाऱ्या खेळाडूला स्पर्श (Touch) केला, तर तो खेळाडू बाद होतो. त्यामुळे अत्यंत एकाग्रतेने हा खेळ खेळला जातो.

गुण:-  जो खेळाडू नऊही पाट्या पार करून लोणपाटीपर्यंत पोहोचतो आणि पुन्हा सुरक्षित माघारी फिरतो, त्या संघाला गुण मिळतात.

फायदे:-  या खेळामुळे मुलांमध्ये चपळता, वेग, निर्णयक्षमता आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. या खेळामुळे शरीराचा विशिष्ट व्यायाम तर होतोच शिवाय एकाग्रता सुद्धा वाढीस लागते. मनोरंजन आणि व्यायामाव्यतिरिक्त, हा खेळ वैयक्तिक वेगवानपणा आणि सामूहिक संघ कामगिरीचे उत्तम संयोजन आहे.

इतिहास:-  हा खेळ अत्यंत प्राचीन असून महाराष्ट्रात संत तुकारामांच्या काळापासून प्रचलित आहे. हा खेळ मुख्यत्वे भारतातील काही ग्रामीण भागात, विशेषतः होळी किंवा इतर सणांच्या वेळी अत्यंत उत्साहाने खेळला जातो. महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये बऱ्यापैकी लोकप्रिय असलेला, आट्या-पाट्या हा एक प्राचीन क्रीडा खेळ आहे ज्यामध्ये गुंतागुंतीचे नियम आहेत. तामिळनाडूमधील किलिथट्टू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृषी प्रदेशातून उगम पावलेला हा खेळ बऱ्याच काळापासून धोरणात्मक विचारसरणी आणि शारीरिक चपळतेची चाचणी म्हणून ओळखला जातो. हा खेळ राष्ट्रीय व्यासपीठावर तामिळ ओळख वाढवतो. महाराष्ट्रात आट्या पट्या म्हणून हा खेळ ओळखला जातो. महाराष्ट्रात हा खेळ पूर्वी 'भांडणाचा खेळ' म्हणून प्रसिद्ध होता. प्रत्येक राज्यात व देशात या खेळाला वेगवेगळे नाव आहेत. गुजरात राज्यात आटा पाता, खरो पाट, लुणी पाट, तामिळनाडू मध्ये किलीथट्टू, धटूतुकडा, उप्पू कोडू, उप्पू पटाई, बंगाल मध्ये डोरिया बांध, महाराष्ट्र मध्ये सुरपट्या, आत्या पत्या, आट्या पाट्या, सारगरी, सरमणी, पंजाब मध्ये लोणापती, सुरपती चिक्का, यूरोप मध्ये ढोंगाचा खेळ, अतिरेक्यांचा पाठलाग या नावाने हा खेळ परिचित आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये मराठी भाषा गौरव दिनाचे गौरवास्पद सादरीकरण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली (कोपर) - "माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसिके l मेळवीन ll" संत ज्ञानेश्वर पासून ते ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला अलौकिक दर्जा प्राप्त करून ती समृद्ध केली  आहे. दिनांक २७ फेब्रुवारी रोजी 'जे एम एफ' शिक्षण संस्थांतर्गत 'जन गण मन' इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मध्ये सकाळ आणि दुपारच्या सत्रात 'मराठी भाषा गौरव दिन' मोठ्या गौरवात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांचे स्वागत करण्यात आले. ग्रंथ हेच आपले गुरू आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी लेझीम व ढोल ताशांच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व स्वागत गीत गाऊन सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. मराठी शिक्षिकांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला. मराठी शिक्षिका स्मिता काटकर यांनी मराठी भाषा दिनाचे महत्त्व सांगितले तर इयत्ता तिसरी मधील विद्यार्थिनींनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवी गाऊन त्याचा अर्थ देखील सांगितला. आजच्या दिवशी सर्व मुले मुली हे साहित्यिक, कवयित्री च्या वेशभूषेमधे आली होती. इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या मराठी शिक्षिका सौ. मानसी शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली 'सांग सांग भोलानाथ' हे बालगीत सादर केले तर पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मराठी शिक्षिका स्मिता काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारुड सादर केले. तर दुपारच्या सत्रात सौ.वर्षा पवार, सौ.स्वाती सोनवणे या मराठी शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी  मराठी नाटक, नृत्य, गायन सादर केले. कविता वाचन ,  मराठी म्हणी यांची जणू आज मेजवानीच होती. नृत्य शिक्षक अभिषेक देसाई, नाट्य शिक्षक प्रमोद पगारे व नितेश मेस्त्री यांनी देखील विद्यार्थांना दिग्दर्शन केले.
   
मराठी भाषा ही मराठी माणसाचा आत्मा आहे. आजच्या स्पर्धायुक्त जगात माणूस नाविन्याचा ध्यास घेत पुढे जाण्याच्या शोधात आहे तर एआय (AI) सारख्या अत्याधुनिक प्रणीलाचा वापर करून टीकून राहण्याचा प्रयत्न करतो आहे, असे जरी सर्व असले तरी मराठी माणूस शेवटी मराठी विचारामधूनच आपल्या  बुद्धिमत्तेला वाव देतो, असे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. "आयुष्याचा पेपर खूप कठीण गेला, कारण अभ्यास भावनांचा केला परंतु पेपर मात्र व्यवहाराचा निघाला" शेवटी आहे काय अन् नाही काय.. ही स्वरचित कविता संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी वाचून दाखवून त्याचा अर्थ देखील सांगितला.

ज्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व आहे अशा सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे ह्या   दरवेळीच नवनवीन मराठी काव्य लिखाण करीत असतात आजच्या दिवशी देखील त्यांनी  स्वरचित काव्य पंक्तींचे वाचन करून कवी कुसुमाग्रज यांना आदरांजली अर्पण केली. प्रत्येक मैलावर मराठी भाषेची उच्चार पद्धती म्हणजेच भाषेचा लहेजा बदलत जातो, असे असले तरी आपल्या पर्यंत पोहोचणाऱ्या भावनांचा अर्थ हा एकच असतो जो आपल्या हृदयापर्यंत भिडतो म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेला रसाळ वाणी संबोधून अमृतापेक्षाही गोड आहे असे १५ व्या शतकातच लिहून ठेवले आहे. असेही सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. 

सकाळ आणि दुपारच्या सत्रात सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्साहाने मराठी अभिमान गीत गाऊन मराठी भाषा गौरव दिन साजरा केला तर विद्यार्थ्यांनी शुद्ध मराठी भाषेतून सूत्रसंचलन केले. संगीत शिक्षका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमांची सांगता केली. संपूर्ण कार्यक्रमाची सजावट श्री.नरेश पिसाट यांनी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दिवा शहरातील आगासन येथे उभारला जाणार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे - कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकासकामांना गती मिळत असून, दिवा शहरातील आगासन रोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. या कामासाठी राज्याच्या नगर विकास विभागाकडून तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निधी उपलब्ध झाला आहे. यासाठी शिवसेना नगरसेवक रमाकांत मढवी यांनी देखील पाठपुरावा केला होता. या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून पुतळा उभारण्याच्या प्रत्यक्ष कामासाठीची २ कोटी रुपयांची निविदा जाहीर झाली आहे. यामुळे येत्या १ मे रोजी आगासन येथे या पुतळ्याच्या प्रत्यक्ष उभारणीचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून गेल्या काही वर्षांत रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, क्रीडा सुविधा, सांस्कृतिक वारसा, संवर्धन अशा विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. दिवा, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या भागांमध्ये पायाभूत सुविधा उभारणीपासून ते स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण करण्यापर्यंत अनेक प्रकल्प राबविण्यात आले आहेत. तर आपल्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या मतदारसंघातील प्राचीन मंदिर परिसरांचा विकास करण्यासमवेतच महापुरुषांचा सन्मान राखत त्यांची स्मारके देखील मतदारसंघात उभारण्यात येत आहे. याच पद्धतीने खासदार डॉ. शिंदे यांच्या पुढाकाराने डोंबिवली येथील घारडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. मानपाडा येथे ही मेघडंबरीत विराजमान असलेल्या महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

दिवा शहरात ही छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा असावा अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शिवसैनिकांकडून केली जात होती. तर यासाठी शिवसेना नगरसेवक रमाकांत मढवी यांनी ही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे याबाबत मागणी केली होती. यासर्वांच्या मागणीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत असलेल्या राज्याच्या नगरविकास विभागाकडे पुतळा उभारणीसाठीच्या निधीची मागणी केली. या मागणीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिसाद देत ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. तर आता राज्याच्या नगरविकास विभागाकडून तब्बल २ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निधी उपलब्ध झाला आहे. येत्या १ मे रोजी आगसन येथे या पुतळ्याच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरु होणार असल्याची माहिती शिवसेना नगरसेवक रमाकांत मढवी यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा सांस्कृतिक अभिमानाच्या प्रतिका समवेतच स्थानिक नागरिकांमध्ये प्रेरणादायी संदेश देणारा ठरेल. तर आगासन रोड परिसरातील या महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे दिवा शहराचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यापूर्वी मतदारसंघातील अनेक विकास प्रकल्पांसाठी निधी मिळवून दिला असून, नागरिकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न सुरू आहे.

डोंबिवली-ठाणे बस सेवेला हिरवा कंदील; नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - डोंबिवली ते ठाणे दरम्यान वाढत्या लोकल रेल्वे गर्दीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असताना, नगरसेवक दिपेश पुंडलीक म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. कल्याण-डोंबिवली परिवहन महानगरपालिका (केडीएमसी) विभागामार्फत प्रायोगिक तत्त्वावर दि. ४ मार्च २०२६ पासून डोंबिवली मोठागाव सर्कल ते ठाणे माजिवडा जंक्शन दरम्यान बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बस सेवा सुरू झाल्यामुळे डोंबिवलीकरांना सुरक्षित, सोयीस्कर आणि पर्यायी प्रवासाचा मार्ग उपलब्ध होणार असून लोकल रेल्वेवरील ताण कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. 

नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी या विषयावर सातत्याने पाठपुरावा करत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रशासनाला याची तातडीची जाणीव करून दिली होती. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेत ही बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच, डोंबिवलीचे आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण यांनी देखील या विषयात सहकार्य व पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत. ही सेवा पुढील काळात नियमित स्वरूपात सुरू ठेवण्यासाठी आणि अधिक बस फेऱ्या वाढवण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

महापालिकेचा क्रीडा उपक्रम यशस्वी राबवत कल्याण-डोंबिवलीमध्ये दिव्यांग क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत दिव्यांग खेळाडूंचा गौरव करत दिव्यांग मुलांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी त्यांचे पालकांनी त्यांना सर्व स्पर्धांसाठी संधी द्यावी असे प्रतिपादन महापालिका महापौर हर्षाली चौधरी यांनी केले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागामार्फत स्व. नाना फडके मैदान कल्याण (पश्चिम) येथे समाज कल्याण विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या क्रिडा स्पर्धांच्या उद्घाटनासमयी बोलतांना त्यांनी हे प्रतिपादन केले. स्पर्धेत सहभागी खेळाडुंचे कौतुक करताना माझ्यासाठी कोणी दिव्यांग नाही तर सर्वजण सर्वसामान्य आणि सक्षम  नागरिक आहेत असे सांगत त्यांनी दिव्यांग बांधवांचा गौरव केला. 

या समयी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, महापालिका सचिव किशोर शेळके, समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड तसेच पालिका सदस्य, सदस्या व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. दिव्यांगाना सक्षम बनविण्याचा आपला प्रयत्न असून क्रिडा स्पर्धा ही देखील एक ट्रीटमेंट थेरेपी आहे, यासाठी पालकांनी मुलांना विविध ऍक्टीव्हिटीमध्ये घालावे. महापालिका अशा उपक्रमांमधून दिव्यांग व्यक्तींना नक्कीच प्रोत्साहन देत राहील असे उद्गार महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आपले मनोगतात काढले. 
स्व.नाना फडके मैदानात आज दिव्यांग बांधवांसाठी कॅरम, गोळाफेक, बुध्दीबळ, व्हिलचेअर रेसिंग, नेमबाजी, १०० मीटर धावणे (कर्णबधिर आणि मुकबधिर व्यक्तींसाठी), बादलीत चेंडू टाकणे (गतीमंद व्यक्तीसांठी), इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या  स्पर्धांमध्ये दिव्यांग बांधवांनी मोठया प्रमाणत सहभाग नोंदवून आपल्या कौशल्य व जिद्दीचे दर्शन घडविले. या स्पर्धांच्या आयोजनामुळे दिव्यांग बांधवामध्ये आत्मविश्वास वाढून समाजामध्ये सकारात्मक संदेश गेला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

मजदूर संघटनेच्या माध्यमातून नाका कामगारांना 'सुरक्षा संच' (सेफ्टी किट) चे वाटप..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या माध्यमातून डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथील लेवा भवन सभागृहात नाका कामगारांना शासन योजनेंतर्गत गृहोपयोगी वस्तू, भांडी व अत्यावश्यक संच, सुरक्षा संच (सेफ्टी कीट) ज्या कामगार कार्यालयात ऑनलाईन नोंदणी झालेल्या आहेत, त्या कामगारांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ, परिवहन समितीचे माजी सभापती संजय पावशे, प्रसिद्ध कलाकार अक्षदा दास, समाजसेवक समीर जगे, शिवसेना पदाधिकारी प्रकाश म्हात्रे, रिपाइंचे माणिक उघडे, मीना साळवे, समाधान तायडे, दिलखुश माळी, शिवसेना पदाधिकारी सुदाम जाधव, रेश्मा चिकटे, संघटनेचे सहखजिनदार रामचंद्र वाघ, संघटनेचे केंद्रीय कमिटी सदस्य रामेश्वर शेजूळ आदी मान्यवर उपस्थित होते. 

या कार्यक्रमात अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ म्हणाले, इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने नोंदणीकृत नाका कामगारांना गृहउपयोगी वस्तू, भांडी व अत्यावश्यक संच देण्यात येते. परिवहन समितीचे माजी सभापती संजय पावशे म्हणाले की, महाराष्ट्र जनरल मजदूर संघटना नेहमीच नाका कामगारांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत असते. संघटनेच्या प्रयत्नात यश येत असून आजवर अनेक नाका कामगारांना याचा लाभ मिळाला आहे.

कल्याण लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे 'इंडोनेशिया' शिष्टमंडळाचे नेतृत्व..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई - ऑपरेशन सिंदूरच्या शिष्टमंडळा-मधीला सक्रिय आणि यशस्वी सहभागानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवि-ण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या 'पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप मध्ये खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली असून इंडोनेशिया दौरा करणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व ते करणार आहेत.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत विविध पक्षांचे खासदार एकत्र येत भारताचे एकसंघ प्रतिनिधित्व जगातील पातळीवर मांडत होते. या मोहिमेत खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व करत युएई, सिएरा लियोन, लायबेरिया आणि डी आर काँगो या देशांना भेट देत भारताची ठाम भूमिका प्रभावीपणे मांडली होती. त्यांच्या संयमी, अभ्यासू आणि ठाम मांडणीमुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाला बळकटी मिळाल्याचे मानले गेले. यापूर्वीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली परिसरातील पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि वाहतूक प्रकल्पांसाठी सातत्याने पाठपुरवठा केला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टीव्ही वाढविणे, मेट्रो व रेल्वे प्रकल्पांना गती देणे, तसेच मतदारसंघातील विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग ही त्यांची उल्लेखनीय कामगिरी मानली जाते.

युवा खासदार म्हणून संसदेतील सक्रिय उपस्थिती, विकासाभिमुख भूमिका आणि आंतरराष्ट्रीय विषयावरील अभ्यासू मांडणी यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. 'पार्लेमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप'च्या माध्यमातून भारताची संसदीय कूटनीती अधिक मजबूत करण्याचा महत्वकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून विविध पक्षातील खासदारांचा समावेश असलेली शिष्टमंडळे ६० हून अधिक देशांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि द्विपक्षीय सहकार्य यासारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.