BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

मागासवर्गीयांच्या अंत्यसंस्कारात आडकाठी आणणाऱ्यांची आता खैर नाही; आमदार अमित गोरखे यांच्या तारांकित प्रश्नावर सरकारचे कडक कारवाईचे आदेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पुरोगामी राज्य आहे, असे आपण अभिमानाने सांगतो. मात्र, आजही ग्रामीण भागात मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तीला मरणोत्तर सन्मानाने निरोप मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ही बाब आपल्या लोकशाहीसाठी आणि माणुसकीसाठी अत्यंत क्लेशदायक आहे, अशा शब्दांत भाजपा आमदार श्री. अमित गोरखे यांनी विधान परिषदेत सरकारचे लक्ष वेधले. राज्यातील ग्रामीण भागांमध्ये मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तींवर सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास होणारा विरोध हा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार असल्याचं आमदार अमित गोरखे यांनी म्हटलं आहे. 
तारांकित प्रश्नाद्वारे सरकारचे लक्ष वेधले

पुरोगामी महाराष्ट्रात मरणानंतरही सन्मानाने निरोप मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणे ही लोकशाहीसाठी क्लेशदायक बाब असून, अशा घटना घडल्यास संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पोलीस पाटलांना थेट जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी आग्रही मागणी भाजपा आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत केली. राज्यातील ग्रामीण भागामध्ये मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तींवर सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास होणाऱ्या विरोधाबाबत आमदार गोरखे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी प्रशासकीय अनास्था आणि सामाजिक विषमतेवर प्रखर प्रहार केला.

संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकाराची पायमल्ली

तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहाचे लक्ष वेधताना आमदार अमित गोरखे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या राज्यात आजही अनेक गावांमध्ये मागासवर्गीयांना सार्वजनिक स्मशानभूमीत प्रवेश नाकारला जातो. पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून किंवा नदीपात्रात अंत्यसंस्कार करावे लागतात. हे रोखण्यासाठी 'ॲट्रॉसिटी' कायद्यांतर्गत कठोर कारवाई करून आरोपींना अजामीनपात्र अटक झालीच पाहिजे. 

आमदार गोरखे यांची भूमिका :

१. प्रशासकीय जबाबदारी व निलंबन: ज्या गावांमध्ये स्मशानभूमीअभावी प्रेताची विटंबना होईल किंवा अंत्यसंस्कार रोखले जातील, त्या भागातील तहसीलदार, सरपंच, पोलीस पाटील आणि गटविकास अधिकारी (BDO) यांना थेट जबाबदार धरून त्यांच्यावर 'कर्तव्यात कसूर' केल्याप्रकरणी तात्काळ निलंबनाची कारवाई करावी.

२. अजामीनपात्र गुन्हे: अंत्यसंस्काराला विरोध करणे हा केवळ सामाजिक वाद नसून तो अमानवीय अत्याचार आहे. अशा घटनांत सहभागी असणाऱ्यांवर 'ॲट्रॉसिटी' (SC-ST Act) अंतर्गत तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अजामीनपात्र अटक करण्यात यावी.

३. राज्यस्तरीय हेल्पलाइन व टास्क फोर्स: अशा संवेदनशील घटनांची तक्रार करण्यासाठी सरकारने एक स्वतंत्र 'राज्यस्तरीय हेल्पलाइन' सुरू करावी. तक्रार प्राप्त होताच पुढील २ तासांच्या आत पोलीस संरक्षण देऊन अंत्यविधी सन्मानाने पार पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात यावी.

सामाजिक न्याय मंत्र्यांचे उत्तर :

आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नावर उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून, जिथे मागासवर्गीय समाजासाठी स्मशानभूमी नाही, तिथे गायरान जमिनीतून स्मशानभूमीसाठी जागा देण्याचा सरकारचा प्राधान्याने प्रयत्न राहील. यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून आवश्यक निधी दिला जाईल. जे लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी यामध्ये अडथळा निर्माण करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले जातील. जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीबाबतही तसे निर्बंध घातले जातील. या चर्चेत आमदार अमोल मिटकरी, राजेश राठोड आणि जगन्नाथ अभ्यंकर यांनी देखील सहभाग नोंदवून या विषयाचे गांभीर्य अधोरेखित केले. सरकारकडे मागासवर्गीयांच्या हक्कासाठी आमदार अमित गोरखे यांनी मांडलेली ही परखड भूमिका सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. 

संविधानाने प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा आणि मरणानंतर सन्मानाने निरोप घेण्याचा अधिकार दिला आहे. ग्रामीण भागात आजही मागासवर्गीय समाजाच्या अंत्यविधीला होणारा विरोध हा अमानवीय अत्याचार आहे. ज्या गावात अंत्यसंस्कार रोखले जातील, तिथल्या जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन व्हावे, ही माझी ठाम मागणी आहे. मरणोत्तर विटंबना थांबवण्यासाठी आणि दोषींना अजामीनपात्र कोठडी मिळवून देण्यासाठी माझा लढा सुरूच आहे asebआमदार अमित गोरखे म्हणाले.

कल्याण लोकसभा खासदार आणि कडोंमपा महापौर यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :- कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखेच्या माध्यमातून डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात गुरुवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उभारण्यात आलेल्या महाराजांच्या स्मारकाजवळ आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती. याचसमवेत नेत्रदीपक अशी आतिषबाजी देखील करण्यात आली. यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, कल्याण डोंबिवली महापौर हर्षाली चौधरी यांनी महाराजांच्या भव्य अशा अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थीत होते.

दिव्यातील साबे गावामध्ये सीलबंद पाण्याच्या जारमध्ये साप आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघड..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि. ५ मार्च :- दिव्यातील साबेगाव परिसरात अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. पिण्यासाठी विकत आणलेल्या २० लिटरच्या सीलबंद पाण्याच्या जारमध्ये चक्क साप आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साबेगाव परिसरातील एका कुटुंबाने घरगुती वापरासाठी २० लिटरचा सीलबंद पाण्याचा जार विकत घेतला होता. जार पारदर्शक असल्यामुळे वापरण्यापूर्वी तो पाहताना त्यामध्ये साप असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुदैवाने हा प्रकार वेळेत लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दिवा परिसरात वर्षभर पाणीटंचाई असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर २० लिटरच्या जारमधील ‘मिनरल वॉटर’ किंवा ‘आरओ (RO) वॉटर’वर अवलंबून असतात. मात्र या घटनेमुळे स्थानिक पाणी शुद्धीकरण केंद्रांच्या (RO प्लांट) स्वच्छतेबाबत आणि त्यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सीलबंद जारमध्ये साप कसा गेला ?याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून अनेक ठिकाणी बिनपरवानगी आणि नियमांचे पालन न करता सुरू असलेल्या पाणी प्रकल्पांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. या घटनेचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये जारच्या आत साप स्पष्टपणे दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचे जार वापरण्यापूर्वी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. घरपोच येणारे जार स्वीकारण्यापूर्वी ते स्वच्छ आहेत का, त्यामध्ये कोणताही कचरा किंवा जीवजंतू नाहीत याची खात्री करून घ्यावी. तसेच जार पारदर्शक असल्यामुळे तो उजेडात तपासून मगच सील उघडावे, अशी सूचना देण्यात आली आहे. तसेच लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेता शक्य असल्यास पाणी उकळून आणि गाळून पिण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेऊन ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दिवा आणि आसपासच्या परिसरातील सर्व पाणी शुद्धीकरण केंद्रांची तातडीने तपासणी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजी पाणी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

दिवा शहरात पहिल्यांदाच राज्यस्तरीय भव्य कराटे स्पर्धांचे आयोजन..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि.०३ मार्च - दिवा शहरात प्रथमच राज्यस्तरीय भव्य कराटे स्पर्धांचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. दिवा शहरातील लोकप्रिय 'प्रभास कराटे स्पोर्ट एकॅडमी' यांच्या माध्यमातून प्रोफेसर प्रशांत कसबे यांच्या उत्कृष्ट आयोजन व नियोजनातून ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेसाठी विविध शहरांमधून अनेक संघ आणि स्पर्धक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. खेळाडूंनी आपल्या कौशल्यपूर्ण सादरीकरणातून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली आणि दिवा शहराच्या नावलौकिकात भर घातली. विजेत्या स्पर्धकांना गोल्ड, सिल्व्हर, ब्राँझ पदके तसेच विविध सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १ ते ५ क्रमांकाच्या संघांना विशेष ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

पारितोषिक विजेते संघ:
 प्रथम पारितोषिक – चंचल स्पोर्ट्स, नाशिक (आनंद रोकडे सर), द्वितीय पारितोषिक – प्रभास कराटे स्पोर्ट्स एकॅडमी, दिवा (प्रशांत कसबे सर, भारती कसबे मॅडम), तृतीय पारितोषिक – वॉरिअर स्पोर्ट कराटे असोसिएशन, गवंडी (प्रदीप ओव्हाळ सर), चतुर्थ पारितोषिक – थापा सर यांचा संघ, पंचम पारितोषिक – उमा मॅडम, टिटवाळा यांचा संघ

स्पर्धेचे पंच म्हणून युनायटेड मार्शल आर्ट एकॅडमी इंडियाचे ग्रँडमास्टर रवींद्र केणी सर (सायन), ना. सी. मुलानी सर (ठाणे) आणि कोरी सर (कल्याण) यांनी कुशल नेतृत्व करत स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडली. आयोजन व नियोजनात दिवा शहरातील समाजसेवक प्रविण उतेकर, आकाश विचारे, आयु. जयसिंग कांबळे, सतीश निकम, आयु. विश्वास भालेराव, विशाल मन्ना डे, संगीता उतेकर, पार्वती आनंदा कसबे, मनीषा सुरेश लांडगे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

इतक्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धांचे आयोजन करण्यामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे दिवा शहरातील भावी पिढी सक्षम, आत्मविश्वासू आणि शिस्तबद्ध बनवणे हेच असल्याचे प्रशांत कसबे व भारती कसबे यांनी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे दिवा शहरात क्रीडा क्षेत्रात एक नवे पर्व सुरू झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

ऐतिहासिक व धार्मिक परंपरा व महत्व असलेले 'आट्या पाट्या' खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर ; नवीन पिढी खेळापासून दूर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

उरण - होळी जवळ आली कि सर्वांना आठवण होते ती आट्या पाट्या खेळाची. प्राचीन काळापासून चालत आलेल्या व भारतीय परंपरेतील आट्या पाट्या खेळाला अनन्य साधारण महत्व आहे. मात्र सध्याच्या २१व्या युगातील जीवघेण्या स्पर्धेच्या व धकाधकीच्या युगात हा खेळ मात्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. उरण तालुक्यात पूर्वी मोठया उत्साहात व आनंदाने खेळल्या जाणारे सण आता उरण मध्ये एक दोन ठिकाणे सोडली तर कुठेही खेळले जात नाही. पूर्वी उरण तालुक्यात हा खेळ होळीच्या दहा दिवसा अगोदर पासून जिथे होळी पेटवली जाते त्या ठिकाणी खेळला जात होता. आता मात्र नवीन पिढीला हा खेळ माहित नसल्याने तसेच मैदानी खेळापासून आजची लहान मुले हळूहळू दूर जात असल्याने सध्या हा खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी या खेळाला राजाश्रय होता म्हणून हा खेळ टिकून राहिला. आता मात्र या खेळाला शासकीय अनुदान व सहकार्यावर अवलंबून राहावे लागते.भारतीय संस्कृतीतील या खेळाला नव संजीवनी प्राप्त करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. जास्तीत जास्त प्रमाणात या खेळाचे सर्वत्र आयोजन केल्यास, जनजागृती केल्यास निश्चितच या खेळाला चांगले दिवस येतील.
उरण शहरामध्ये 'श्री शीतळा देवी मंदिर', देऊळवाडी येथे होळीच्या ठिकाणी आट्या पाट्या खेळण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे. पूर्वी होळीच्या दहा दिवसा अगोदर पासून देऊळवाडी उरण शहरात हा खेळ खेळला जायचा. आता मात्र होळीच्या दिवशी एकच दिवस हा खेळ उरण शहरातील देऊळवाडीत खेळला जातो. आट्यापाट्या हा महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये (किलिथट्टू नावाने) लोकप्रिय असलेला, शारीरिक चपळाई व धोरणात्मक कौशल्याचा प्राचीन भारतीय मैदानी खेळ आहे. दोन संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या खेळात, एका संघाला सूरपाटी व इतर नऊ आडव्या पाट्यांतून (गाळ्यांतून) बचाव करत, प्रतिस्पर्ध्यांच्या अडथळ्यांना हुलकावणी देऊन शेवटच्या लोणपाटीपर्यंत पोहोचायचे असते.
आट्यापाट्या खेळाची सविस्तर माहिती :

मैदान आणि रचना:-  
हा खेळ सपाट मैदानात खेळला जातो. शहरात मैदानात हा खेळ खेळला जातो. यात मध्यभागी एक लांब रेषा (मृदंगपाटी किंवा सूरपाटी) असते आणि तिला छेदून ९ आडव्या पाट्या (कप्पे) असतात. खेळाच्या सुरुवातीच्या पाटीला 'चांभारपाटी' तर शेवटच्या पाटीला 'लोणपाटी' म्हणतात. 

खेळाडू आणि संघ:- 
प्रत्येक संघात साधारणपणे ९ खेळाडू असतात. खेळामध्ये दोन संघ असतात. एक 'पाटी धरणारा' (Defending) आणि दुसरा 'खेळणारा' (Attacking)   असे दोन संघ असतात. एक संघ बचावाच्या भूमिकेत तर दुसरा संघ आक्रमणाच्या भूमिकेत असतो.

खेळाचे नियम आणि उद्देश:- 
बचाव (Defending) भूमिकेत असलेले  खेळाडू फक्त उभ्या रेषेवर (सूरपाटी) पाय ठेवून दोन्ही बाजूंना उड्या मारून किंवा धावून अटॅकिंग खेळाडूंना आडव्या पाट्या ओलांडण्यापासून रोखतात.
आक्रमण (Attacking) च्या भूमिकेत असणारे, खेळणारे खेळाडू हुलकावणी देऊन, वेगाने धावत एक-एक पाटी पार करून लोणपाटीपर्यंत जातात. एक एक चौकोन पार करत पुढे जातात व शेवटी आपले उद्दिष्टे साध्य करतात.

बाद (Out):-  जर पाटी धरणाऱ्या खेळाडूने धावणाऱ्या खेळाडूला स्पर्श (Touch) केला, तर तो खेळाडू बाद होतो. त्यामुळे अत्यंत एकाग्रतेने हा खेळ खेळला जातो.

गुण:-  जो खेळाडू नऊही पाट्या पार करून लोणपाटीपर्यंत पोहोचतो आणि पुन्हा सुरक्षित माघारी फिरतो, त्या संघाला गुण मिळतात.

फायदे:-  या खेळामुळे मुलांमध्ये चपळता, वेग, निर्णयक्षमता आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. या खेळामुळे शरीराचा विशिष्ट व्यायाम तर होतोच शिवाय एकाग्रता सुद्धा वाढीस लागते. मनोरंजन आणि व्यायामाव्यतिरिक्त, हा खेळ वैयक्तिक वेगवानपणा आणि सामूहिक संघ कामगिरीचे उत्तम संयोजन आहे.

इतिहास:-  हा खेळ अत्यंत प्राचीन असून महाराष्ट्रात संत तुकारामांच्या काळापासून प्रचलित आहे. हा खेळ मुख्यत्वे भारतातील काही ग्रामीण भागात, विशेषतः होळी किंवा इतर सणांच्या वेळी अत्यंत उत्साहाने खेळला जातो. महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये बऱ्यापैकी लोकप्रिय असलेला, आट्या-पाट्या हा एक प्राचीन क्रीडा खेळ आहे ज्यामध्ये गुंतागुंतीचे नियम आहेत. तामिळनाडूमधील किलिथट्टू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृषी प्रदेशातून उगम पावलेला हा खेळ बऱ्याच काळापासून धोरणात्मक विचारसरणी आणि शारीरिक चपळतेची चाचणी म्हणून ओळखला जातो. हा खेळ राष्ट्रीय व्यासपीठावर तामिळ ओळख वाढवतो. महाराष्ट्रात आट्या पट्या म्हणून हा खेळ ओळखला जातो. महाराष्ट्रात हा खेळ पूर्वी 'भांडणाचा खेळ' म्हणून प्रसिद्ध होता. प्रत्येक राज्यात व देशात या खेळाला वेगवेगळे नाव आहेत. गुजरात राज्यात आटा पाता, खरो पाट, लुणी पाट, तामिळनाडू मध्ये किलीथट्टू, धटूतुकडा, उप्पू कोडू, उप्पू पटाई, बंगाल मध्ये डोरिया बांध, महाराष्ट्र मध्ये सुरपट्या, आत्या पत्या, आट्या पाट्या, सारगरी, सरमणी, पंजाब मध्ये लोणापती, सुरपती चिक्का, यूरोप मध्ये ढोंगाचा खेळ, अतिरेक्यांचा पाठलाग या नावाने हा खेळ परिचित आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये मराठी भाषा गौरव दिनाचे गौरवास्पद सादरीकरण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली (कोपर) - "माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसिके l मेळवीन ll" संत ज्ञानेश्वर पासून ते ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला अलौकिक दर्जा प्राप्त करून ती समृद्ध केली  आहे. दिनांक २७ फेब्रुवारी रोजी 'जे एम एफ' शिक्षण संस्थांतर्गत 'जन गण मन' इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मध्ये सकाळ आणि दुपारच्या सत्रात 'मराठी भाषा गौरव दिन' मोठ्या गौरवात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांचे स्वागत करण्यात आले. ग्रंथ हेच आपले गुरू आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी लेझीम व ढोल ताशांच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व स्वागत गीत गाऊन सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. मराठी शिक्षिकांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला. मराठी शिक्षिका स्मिता काटकर यांनी मराठी भाषा दिनाचे महत्त्व सांगितले तर इयत्ता तिसरी मधील विद्यार्थिनींनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवी गाऊन त्याचा अर्थ देखील सांगितला. आजच्या दिवशी सर्व मुले मुली हे साहित्यिक, कवयित्री च्या वेशभूषेमधे आली होती. इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या मराठी शिक्षिका सौ. मानसी शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली 'सांग सांग भोलानाथ' हे बालगीत सादर केले तर पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मराठी शिक्षिका स्मिता काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारुड सादर केले. तर दुपारच्या सत्रात सौ.वर्षा पवार, सौ.स्वाती सोनवणे या मराठी शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी  मराठी नाटक, नृत्य, गायन सादर केले. कविता वाचन ,  मराठी म्हणी यांची जणू आज मेजवानीच होती. नृत्य शिक्षक अभिषेक देसाई, नाट्य शिक्षक प्रमोद पगारे व नितेश मेस्त्री यांनी देखील विद्यार्थांना दिग्दर्शन केले.
   
मराठी भाषा ही मराठी माणसाचा आत्मा आहे. आजच्या स्पर्धायुक्त जगात माणूस नाविन्याचा ध्यास घेत पुढे जाण्याच्या शोधात आहे तर एआय (AI) सारख्या अत्याधुनिक प्रणीलाचा वापर करून टीकून राहण्याचा प्रयत्न करतो आहे, असे जरी सर्व असले तरी मराठी माणूस शेवटी मराठी विचारामधूनच आपल्या  बुद्धिमत्तेला वाव देतो, असे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. "आयुष्याचा पेपर खूप कठीण गेला, कारण अभ्यास भावनांचा केला परंतु पेपर मात्र व्यवहाराचा निघाला" शेवटी आहे काय अन् नाही काय.. ही स्वरचित कविता संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी वाचून दाखवून त्याचा अर्थ देखील सांगितला.

ज्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व आहे अशा सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे ह्या   दरवेळीच नवनवीन मराठी काव्य लिखाण करीत असतात आजच्या दिवशी देखील त्यांनी  स्वरचित काव्य पंक्तींचे वाचन करून कवी कुसुमाग्रज यांना आदरांजली अर्पण केली. प्रत्येक मैलावर मराठी भाषेची उच्चार पद्धती म्हणजेच भाषेचा लहेजा बदलत जातो, असे असले तरी आपल्या पर्यंत पोहोचणाऱ्या भावनांचा अर्थ हा एकच असतो जो आपल्या हृदयापर्यंत भिडतो म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेला रसाळ वाणी संबोधून अमृतापेक्षाही गोड आहे असे १५ व्या शतकातच लिहून ठेवले आहे. असेही सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. 

सकाळ आणि दुपारच्या सत्रात सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्साहाने मराठी अभिमान गीत गाऊन मराठी भाषा गौरव दिन साजरा केला तर विद्यार्थ्यांनी शुद्ध मराठी भाषेतून सूत्रसंचलन केले. संगीत शिक्षका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमांची सांगता केली. संपूर्ण कार्यक्रमाची सजावट श्री.नरेश पिसाट यांनी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दिवा शहरातील आगासन येथे उभारला जाणार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे - कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकासकामांना गती मिळत असून, दिवा शहरातील आगासन रोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. या कामासाठी राज्याच्या नगर विकास विभागाकडून तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निधी उपलब्ध झाला आहे. यासाठी शिवसेना नगरसेवक रमाकांत मढवी यांनी देखील पाठपुरावा केला होता. या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून पुतळा उभारण्याच्या प्रत्यक्ष कामासाठीची २ कोटी रुपयांची निविदा जाहीर झाली आहे. यामुळे येत्या १ मे रोजी आगासन येथे या पुतळ्याच्या प्रत्यक्ष उभारणीचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून गेल्या काही वर्षांत रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, क्रीडा सुविधा, सांस्कृतिक वारसा, संवर्धन अशा विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. दिवा, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या भागांमध्ये पायाभूत सुविधा उभारणीपासून ते स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण करण्यापर्यंत अनेक प्रकल्प राबविण्यात आले आहेत. तर आपल्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या मतदारसंघातील प्राचीन मंदिर परिसरांचा विकास करण्यासमवेतच महापुरुषांचा सन्मान राखत त्यांची स्मारके देखील मतदारसंघात उभारण्यात येत आहे. याच पद्धतीने खासदार डॉ. शिंदे यांच्या पुढाकाराने डोंबिवली येथील घारडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. मानपाडा येथे ही मेघडंबरीत विराजमान असलेल्या महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

दिवा शहरात ही छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा असावा अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शिवसैनिकांकडून केली जात होती. तर यासाठी शिवसेना नगरसेवक रमाकांत मढवी यांनी ही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे याबाबत मागणी केली होती. यासर्वांच्या मागणीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत असलेल्या राज्याच्या नगरविकास विभागाकडे पुतळा उभारणीसाठीच्या निधीची मागणी केली. या मागणीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिसाद देत ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. तर आता राज्याच्या नगरविकास विभागाकडून तब्बल २ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निधी उपलब्ध झाला आहे. येत्या १ मे रोजी आगसन येथे या पुतळ्याच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरु होणार असल्याची माहिती शिवसेना नगरसेवक रमाकांत मढवी यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा सांस्कृतिक अभिमानाच्या प्रतिका समवेतच स्थानिक नागरिकांमध्ये प्रेरणादायी संदेश देणारा ठरेल. तर आगासन रोड परिसरातील या महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे दिवा शहराचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यापूर्वी मतदारसंघातील अनेक विकास प्रकल्पांसाठी निधी मिळवून दिला असून, नागरिकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न सुरू आहे.