BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

देशभरातील निवडक लोकप्रतिनिधींच्या यादीत ‘पिंपरी-चिंचवड’चा सन्मान; कॉमनवेल्थ संसदीय राष्ट्रीय परिषदेसाठी आमदार अमित गोरखे यांची निवड..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई :  ‘कॉमनवेल्थ संसदीय संघटना वेस्ट झोन–७’ तर्फे गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या परिषदेसाठी आमदार अमित गोरखे यांची निवड करण्यात आली असून, संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. दिनांक ८ ते ११ एप्रिल २०२६ दरम्यान होणाऱ्या या परिषदेत देशातील निवडक आणि अभ्यासू आमदारांनाच पाचारण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आमदार अमित गोरखे यांना या परिषदेच्या ‘मुख्य पूर्ण अधिवेशनात’ आपले विचार मांडण्याची अत्यंत महत्त्वाची संधी देण्यात आली आहे, ही बाब त्यांच्या नेतृत्वगुणांची व धोरणात्मक दृष्टीकोनाची राष्ट्रीय पातळीवरील दखल असल्याचे स्पष्ट करते.

राष्ट्रीय दिग्गजांची मांदियाळी या परिषदेला देशाचे सर्वोच्च संसदीय नेतृत्व उपस्थित राहणार आहे. यात प्रामुख्याने:
श्री. ओम बिर्ला – माननीय लोकसभा अध्यक्ष
डॉ. प्रमोद सावंत – माननीय मुख्यमंत्री, गोवा
डॉ. गणेश गावंकर – अध्यक्ष, गोवा विधानसभा
श्री. हरिवंश नारायण सिंह – उपसभापती, राज्यसभा
ऍड. राहुल नार्वेकर – अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा
प्रा. राम शिंदे – सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद
श्री.शंकरभाई चौधरी – अध्यक्ष, गुजरात विधानसभा
श्री. पुसापती अशोक गजपती राजू – माननीय राज्यपाल, गोवा राज्य 
श्री. माविन गोडिन्हो – मंत्री, गोवा राज्य 
श्री. जोशुआ पीटर डीसूझा – उपाध्यक्ष, गोवा विधानसभा

परिषदेमधील सत्रे – धोरणात्मक दिशादर्शक चर्चा मुख्य
पूर्ण अधिवेशनाच्या पहिल्या भागात ‘विकसित भारत २०४७ साध्य करण्यात युवा विधिमंडळ सदस्यांची भूमिका’ या अत्यंत महत्त्वपूर्ण सत्रात आमदार अमित गोरखे महाराष्ट्राचा विकासदृष्टिकोन, युवा नेतृत्वाची जबाबदारी आणि धोरणात्मक दिशा प्रभावीपणे मांडणार आहेत. दुसऱ्या भागात ‘व्यापार, पर्यटन, नागरीकरण, पर्यावरण आणि किनारी संपर्क या क्षेत्रांतील वेस्ट झोन–७ ची प्राधान्ये’ हा विषय आहे. तसेच परिषदे दरम्यान विविध विषयांवर चर्चासत्रे, संवाद सत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आंतरराज्य समन्वय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

ही निवड केवळ वैयक्तिक सन्मान नसून महाराष्ट्राच्या नेतृत्वावर ठेवलेला विश्वास आहे. ‘विकसित भारत २०४७’ या राष्ट्रीय ध्येयपूर्तीत महाराष्ट्राची भूमिका ठामपणे मांडणे, तसेच युवा नेतृत्वाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीसाठी ठोस धोरणात्मक विचार मांडणे, ही माझी प्राथमिकता असेल, असे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.

आमदार अमित गोरखे राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण पाऊल
आमदार अमित गोरखे यांची या परिषदेसाठी झालेली निवड ही त्यांच्या प्रभावी कामगिरीची, जनाधाराची आणि नेतृत्वक्षमतेची राष्ट्रीय स्तरावर झालेली दखल मानली जात आहे. अत्यंत मर्यादित आमदारांमधून निवड होणे आणि त्यातही मुख्य अधिवेशनात विचार मांडण्याची संधी मिळणे, हे महत्वाचे आहे. 

पिंपरी-चिंचवड तसेच महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण
या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहराचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय व्यासपीठावर अधिक प्रभावीपणे होणार असून, स्थानिक प्रश्नांना व्यापक स्तरावर मांडण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या नेतृत्वाची राष्ट्रीय स्तरावर नोंद घेतली जात असल्याचेही यावरून स्पष्ट होते. आमदार अमित गोरखे यांची या परिषदेसाठी झालेली निवड ही पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण ठरत असून, राज्याचा आवाज देशाच्या धोरणात्मक चर्चांमध्ये अधिक ठामपणे पोहोचवण्यास निश्चितच हातभार लावणारी ठरणार आहे.

कल्याण व शहापूर येथील ८० व ६० वर्षीय रुग्णांवर किम्स हॉस्पिटल्स, ठाणे येथे उच्च जोखमीच्या हृदय शस्त्रक्रिया यशस्वी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, ०७ एप्रिल : 'किम्स हॉस्पिटल्स', ठाणे यांनी कल्याण व शहापूर येथील अनुक्रमे ८० व ६० वर्षीय अशा दोन रुग्णांवरील गुंतागुंतीच्या व उच्च-जोखमीच्या हृदयविकार प्रकरणांवर यशस्वी उपचार करून गंभीर आजार व अनेक सहव्याधी (co-morbidities) असलेल्या रुग्णांवर प्रभावीपणे उपचार करण्यातील आपले वैद्यकीय कौशल्य सिद्ध केले आहे.

भारतामध्ये हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण असून एकूण मृत्यूंपैकी सुमारे २८% मृत्यू हृदयविकारामुळे होतात. दरवर्षी अंदाजे २ लाख बालकांमध्ये तसेच लाखो प्रौढांमध्ये गंभीर हृदयविकाराचे निदान होते. मात्र प्रगत अवस्थेतील हृदयरोग असलेल्या रुग्णांपैकी केवळ काहींनाच वेळेत शस्त्रक्रियेची संधी मिळते, ज्यामुळे उपचारांमध्ये मोठी दरी असल्याचे दिसून येते.

पहिले प्रकरण:
कल्याण येथील रहिवासी नामदेव देशमुख (वय: ८० वर्षे ) यांची सुरुवातीला दोन्ही गुडघ्यांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी (B/L TKR) तपासणी सुरू होती. शस्त्रक्रियेपूर्व हृदय तपासणी दरम्यान डॉक्टरांना एओर्टिक व्हॉल्वमध्ये गंभीर अरुंदता तसेच कोरोनरी धमन्यांमध्ये पाच गंभीर ब्लॉकेज आढळले, ज्यामुळे हृदयाची पंपिंग क्षमता लक्षणीयरीत्या कमी झाली होती. रुग्णाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचाही त्रास असल्याने शस्त्रक्रियेचा धोका अधिक वाढला होता.

या गुंतागुंतीच्या परिस्थितीत किम्स हॉस्पिटल्स, ठाणे येथील कार्डियाक सायन्सेस टीमने एओर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट सोबत पाच कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट्सची संयुक्त शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती उत्तम राहिली. आयसीयूमध्ये स्थिर स्थिती, दुसऱ्या दिवशी हालचाल सुरू झाली आणि अवघ्या पाच दिवसांत रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.

दुसरे प्रकरण:
शहापूर येथील वासुदेव हांबीर (वय: ६० वर्षे ) यांना १४ वर्षांपूर्वी छातीला झालेल्या दुखापतीमुळे दीर्घकालीन गुंतागुंत निर्माण झाली होती. मागील दोन वर्षांपासून त्यांना वाढता श्वास लागणे, पाय व पोट सुजणे तसेच दीर्घकाळ सूज राहिल्यामुळे जखमा (अल्सर) होण्याचा त्रास होत होता.

सविस्तर तपासणीत यकृत सिरोसिस,अ‍ॅसाइटिस, पोर्टल हायपरटेन्शन, स्प्लेनोमेगली, दोन्ही पायांतील व्हेरिकोज वेन्स तसेच अत्यंत कॅल्सिफाइड (“दगडासारखा कठीण”) पेरिकार्डियमसह कन्स्ट्रिक्टिव पेरिकार्डायटिस अशा अनेक गंभीर समस्या आढळल्या. या शस्त्रक्रियेत मृत्यूचा धोका सुमारे ५०% इतका होता.

अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असूनही किम्स हॉस्पिटल्स, ठाणे येथील कार्डियाक सायन्सेस टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. रुग्णाने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला, तिसऱ्या दिवशी चालण्यास सुरुवात झाली आणि सहाव्या दिवशी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आले.

डॉ. बी.सी. कलमठ, संचालक व विभागप्रमुख – कार्डियाक सायन्सेस विभाग, म्हणाले, “या प्रकरणांमधून शस्त्रक्रियेपूर्व सखोल तपासणी आणि प्रगत शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित होते. गंभीर हृदयविकार आणि इतर आजार असलेल्या रुग्णांमध्येही योग्य कौशल्य, सुविधा आणि क्लिनिकल प्रोटोकॉलच्या मदतीने यशस्वी परिणाम साध्य होऊ शकतात.”

डॉ. सौम्य शेखर जेनासमंत, सल्लागार कार्डिओथोरॅसिक व व्हॅस्क्युलर सर्जन, म्हणाले, “ही दोन्ही प्रकरणे अत्यंत गुंतागुंतीची होती आणि त्यासाठी सूक्ष्म नियोजन, अचूकता व बहुविभागीय (multidisciplinary) दृष्टिकोन आवश्यक होता. अनेक सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ व उच्च- जोखमीच्या रुग्णांवर उपचार करणे आव्हानात्मक असते, मात्र योग्य वेळी केलेला हस्तक्षेप आणि समन्वित उपचार पद्धतीमुळे सकारात्मक परिणाम साधता आले.”

सौरभ गुप्ता, प्रादेशिक संचालक, किम्स हॉस्पिटल्स, म्हणाले, “किम्स हॉस्पिटल्समध्ये आम्ही अत्यंत गंभीर रुग्णांनाही प्रगत हृदय उपचार सेवा देण्यास कटिबद्ध आहोत. या यशस्वी उपचारांमुळे क्लिनिकल उत्कृष्टता, रुग्णकेंद्रित सेवा आणि अत्यंत अचूक व सुरक्षित पद्धतीने गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याची आमची क्षमता अधोरेखित होते.”

ही प्रकरणे विशेषतः ज्येष्ठ नागरिक व अनेक आरोग्य समस्यांनी ग्रस्त रुग्णांमध्ये हृदयरोगांचे लवकर निदान आणि वेळेवर उपचार किती महत्त्वाचे आहेत हे अधोरेखित करतात. हृदयरोगांचे वाढते प्रमाण आणि गुंतागुंत लक्षात घेता, एकात्मिक व प्रगत वैद्यकीय उपचार पद्धती जीवनमान सुधारण्यासाठी आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी अत्यावश्यक ठरत आहेत.

केडीएमसीच्या 'स्थायी समिती' सभापती पदी शिवसेना- भाजपा महायुतीचे मल्लेश शिवन्ना शेट्टी, तर 'शिक्षण समिती' सभापती पदी अभिजीत थरवळ आणि 'महिला व बाल कल्याण समिती'च्या सभापती पदी सारिका जाधव यांची निवड जाहीर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि. ६ एप्रिल – कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या 'स्थायी समिती' सभापती पदासाठी शिवसेना-भाजपा महायुतीचे मल्लेश शिवन्ना शेट्टी, तर 'पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण समिती'च्या सभापती पदासाठी शिवसेना-भाजपा महायुतीचे अभिजीत सुजाता सदानंद थरवळ आणि 'महिला व बाल कल्याण, दिव्यांग कल्याण, नागरी दलित वस्ती आणि झोपडपट्टी पुनर्वसन समिती'च्या सभापती पदासाठी शिवसेना-भाजपा महायुतीच्या सारिका सतीश जाधव या उमेदवारांनी दि.०२ एप्रिल २०२६  रोजी आपली नामनिर्देशन पत्रे महापालिका सचिव किशोर शेळके यांचेकडे दाखल केली होती. या तीनही समितींच्या सभापती पदासाठी केवळ एक-एकच नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने, आज रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या विशेष सभेमध्ये मल्लेश शिवन्न शेट्टी यांस 'स्थायी समिती' सभापती म्हणून, तर अभिजीत सुजाता सदानंद थरवळ यांस 'शिक्षण समिती' सभापती म्हणून आणि सारिका सतीश जाधव यांस 'महिला व बाल कल्याण समिती'च्या सभापती म्हणून घोषित करण्यात आले.
यावेळी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, महापालिका सचिव बाळासाहेब चव्हाण, संबंधित समितीचे सदस्य उपस्थित होते. आमदार राजेश मोरे, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, महापालिका पदाधिकारी, इतर मान्यवर तसेच पालिका सदस्यांनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले.

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलेला आहे – प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  सोमवारी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन होता. ६ एप्रिल १९८० रोजी पक्षाची स्थापना झाली. पक्षाने ४६ वर्षे पूर्ण करून ४७ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लेख लिहून आपले विचार मांडले आहेत. 'सामान्य कार्यकर्ता ते पक्षाचा प्रदेशाध्यक्ष' हा प्रवास फक्त भाजपसारख्या संघटनेतच शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. 

त्यांनी पुढे लिहिले की, विचारधारेच्या घट्ट मुळांनी मातीत रुजलेला आणि कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलेला भारतीय जनता पक्षाचा विशाल वटवृक्ष आज ४७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. ६ एप्रिल १९८० रोजी रोवलेले हे बीज आज सुमारे २५ कोटींहून अधिक कार्यकर्त्यांच्या मेहनतीने संपूर्ण देशभर विस्तारले आहे.

”राष्ट्र प्रथम’ मंत्रासह भाजपाचा विस्तार – पक्षाच्या ४७ व्या वर्षात प्रवेशानिमित्त प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया”

रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की,  भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, भाजयुमोचा उपाध्यक्ष, नगरसेवक, आमदार, कॅबिनेट मंत्री आणि आता प्रदेशाध्यक्ष या नात्याने जेव्हा मी पक्षाच्या इतिहासाकडे पाहतो, तेव्हा मला जाणवतं की जसे विचारधारेने एक एक कार्यकर्ते घडवले आणि त्याचप्रमाणे असंख्य ध्येयवादी कार्यकर्त्यांनी त्यांच्या रक्ता-घामाने गुरुदक्षिणा म्हणून पक्षाला घडवले. जेव्हा नेहरू-गांधींची अल्पसंख्याक-केंद्रित समाजवादी विचारसरणी आणि साम्यवादी चळवळींचा जागतिक प्रभाव होता, त्या काळात जनसंघाच्या माध्यमातून बहुसंख्य पण वंचित समाजाला केंद्रस्थानी ठेवण्याचे आणि प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचे धैर्य डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी यांसारख्या नेत्यांनी दाखवले. त्यांची दूरदृष्टी आजही आमच्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.
भाजपच्या या प्रवासात अनेक दिग्गज नेत्यांचे योगदान

वैचारिक पाया आणि नेतृत्वाची परंपरा लाभलेल्या भाजपच्या या प्रवासात अनेक ऋषितुल्य नेत्यांचे मोठे योगदान राहिले आहे. महाराष्ट्र भाजपाचाच विचार करायचा झाला तर १९८० मध्ये उत्तमराव पाटील यांनी पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाचा पाया रचला. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाला गावागावात नेले आणि बहुजन व ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणत अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. १९९५ मध्ये काँग्रेसची सत्ता हटवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. प्रा. ना.स. फरांदे यांनी पक्षाला वैचारिक बळ दिले, तर सूर्यभान वहाडणे पाटील यांनी शिस्तबद्ध नेतृत्वातून संघटना मजबूत केली. भाऊसाहेब फुंडकर यांनी शेतकऱ्यांसाठी लढा देत पक्षाला शेतशिवारापर्यंत पोहोचवले. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना सावरत संघटनेला नवी ऊर्जा दिली.

सुधीर मुनगंटीवार यांनी जनसंपर्काचा नवा अध्याय सुरू केला. २०१३ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने मोठी झेप घेतली आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून थेट मुख्यमंत्रीपदावर जाण्याचा अनोखा विक्रम घडला. त्यानंतर रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी संघटना आणि सरकार यांच्यात उत्तम समन्वय साधत पक्षाला शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवले.

जातीय राजकारणाला भाजपचे ठाम प्रत्युत्तर;

कधी ‘शेटजी-भटजी’ची पार्टी म्हणून टीका झालेल्या भाजपने ४६ वर्षांत महाराष्ट्रात ११ बहुजन समाजातील प्रदेशाध्यक्ष दिले, जे जातीय राजकारण करणाऱ्यांना ठोस उत्तर आहे. आज एक कार्यकर्ता म्हणून प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सांभाळताना, मला अभिमान वाटतो की सामान्य कार्यकर्त्यापासून या पदापर्यंत पोहोचणे केवळ भाजपातच शक्य आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील यश हे केवळ आकडे नसून जनतेचा विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारतीयत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व’ हा विचार तळागाळात;

भाजप ही केवळ बॅनर आणि सभांची संघटना नसून विचारधारेवर उभे असलेले कार्यकर्ते हीच तिची खरी ताकद आहे. ‘भारतीयत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व’ हा विचार आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवला आहे. आम्हाला अनेकदा अँटी राष्ट्रवादी म्हटले जाते; पण देशाबद्दल अभिमान बाळगणे हा दोष असेल, तर तो आम्ही आनंदाने स्वीकारू. ‘राष्ट्र प्रथम’ही आमच्या विचारधारेची मूळ भूमिका आहे. काळानुसार तंत्रज्ञानाचा स्वीकार करत भाजप एक ‘टेक-फ्रेंडली’ संघटना बनत आहे, ज्यामुळे बूथ स्तरापर्यंत कार्यकर्त्यांशी तात्काळ संपर्क साधणे शक्य झाले आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.

५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल;

भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणे आणि त्यात महाराष्ट्राचा १ ट्रिलियन डॉलरचा वाटा सुनिश्चित करणे, यावर विशेष भर दिला जात आहे. या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आणि गावपातळीवरील समस्या शासनापर्यंत नेणे, हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. हाच ‘अंत्योदय’चा खरा अर्थ आहे. जेव्हा प्रत्येक भाजप कार्यकर्ता या भावनेने काम करेल, तेव्हाच ‘विकसित भारत’चे स्वप्न साकार होईल आणि विकसित महाराष्ट्राशिवाय ते शक्य नाही.

कल्याण-डोंबिवलीकरांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे केडीएमसीकडून ४३१ कोटींची प्रॉपर्टी टॅक्सची विक्रमी वसुली..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने चालू आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून नागरिकांनी यंदाही दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे ३१ मार्च २०२६ अखेर तब्बल सुमारे ८६% विक्रमी कर वसुली पूर्ण करण्यात यश मिळवले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने करदात्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

महापालिकेच्या महसुलाचा मुख्य आधार असलेल्या मालमत्ता करातून सन २०२५-२०२६ या वर्षासाठी सुमारे ₹५०० कोटींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. आयुक्त डॉ. अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोसावी तसेच उपआयुक्त (कर) बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागांनी समन्वय साधत सातत्याने आढावा बैठका घेतल्या.

या प्रयत्नांचे फलित म्हणून मार्च अखेरपर्यंत ₹३३१.४१ कोटी इतकी कर वसुली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, “अभय योजना” राबवली नसतानाही नागरिकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे करवसुली वाढल्याचे केडीएमसीला गती मिळाल्याची प्रतिक्रिया कर विभागाचे उपआयुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी दिली आहे. तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांबरोबरच नागरिकांनी वेळेवर कर भरण्याची जबाबदारी पार पाडल्यामुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे केडीएमसी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, २०२६-२०२७ या नवीन आर्थिक वर्षासाठी अधिकाधिक नागरिकांनी ऑनलाईन पर्यायाद्वारे कर भरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तर कराच्या माध्यमातून शहरामध्ये अधिकाधिक लोकाभिमुख सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा कल्याण-डोंबिवलीकरांनी केडीएमसी प्रशासनाकडून व्यक्त केली आहे.

दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर नागरी हक्क समितीचे प्रशासनाला पत्र देत तात्काळ कारवाईची मागणी..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि. १ एप्रिल – दिवा परिसरामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात दिवा-शिळ नागरी हक्क समितीने ठोस भूमिका घेतली असून यासंदर्भात सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांना अधिकृत पत्र देऊन तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या वेळी ऍड. रोहिदास मुंडे, माजी नगरसेवक हिरा पाटील, उबाठा शहर प्रमुख सचिन पाटील तसेच मनसेचे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित विषय मांडला व प्रशासनाचे लक्ष वेधले.

समितीच्या निदर्शनास आले आहे की, दिवा भागात काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने बांधकामे सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नाही. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. अशा बेकायदेशीर बांधकामांमुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
समितीने आपल्या पत्रामध्ये नमूद केले आहे की, काही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे किंवा संगनमतामुळे ही अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा संशय निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच ही अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबवून पाडण्यात यावीत.

दिवा शिळ नागरी हक्क समिती प्रशासनाला आवाहन करते की, नागरिकांच्या हितासाठी त्वरित व निष्पक्ष कारवाई करावी, अन्यथा समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे दिवा शिळ नागरी हक्क समितीने म्हटले आहे.

पालिका अधिकाऱ्या महिला कर्मचाऱ्याला व्हॉट्सॲप कॉलवर सेटलमेंटसाठी मागितले 'शरीरसुख'..

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका वरिष्ठ लिपिकाने चक्क महिला कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी देत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पीडित महिलेने दाद मागूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने अखेर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?

डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यासोबत काही दिवसांपूर्वी वरिष्ठ लिपिक भूषण पाटील याचा वाद झाला होता. कामाच्या कारणावरून त्याने या महिलेला इतर कर्मचाऱ्यांसमोर अपमानित केले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. उपस्थित कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून त्यावेळी हा वाद मिटवला, मात्र भूषण पाटील एवढ्यावरच थांबला नाही. त्याने या वादाचा सूड घेण्यासाठी एक वेगळीच चाल खेळली.

काही दिवसांनंतर भूषण पाटील याने पीडित महिलेला व्हॉट्सअऍप कॉल केला. तुझ्यासह आणखी एका कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले असल्याचे सांगून त्याने तिला घाबरवले. दुसऱ्या कर्मचाऱ्याने माझ्याशी सेटलमेंट केली आहे, त्यामुळे त्याची कारवाई मी थांबवली आहे, असा दावा त्याने केला. यानंतर त्याने पीडित महिलेला विचारले की, तू मला काय देशील? मला तुझ्याकडून शरीरसुख हवे आहे, अशी थेट मागणी त्याने फोनवरून केली.

महापालिका प्रशासनाची धक्कादायक भूमिका

हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर पीडित महिला कर्मचाऱ्याने तातडीने आपल्या वरिष्ठांकडे धाव घेत घडलेली घटना सांगितली. मात्र, इतका गंभीर आरोप असूनही महापालिका प्रशासनाने भूषण पाटील याच्यावर कोणतीही तात्काळ कारवाई केली नाही. प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून पीडित महिलेने अखेर मानपाडा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. पोलीसांनी या प्रकरणी भूषण पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला नोटीस बजावण्यात आली आहे.

भूषण पाटीलचा वादग्रस्त इतिहास

विशेष म्हणजे भूषण पाटील हा अधिकारी यापूर्वीही वादात राहिला आहे. केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना लाच घेताना पकडण्यात आले होते, त्यावेळी भूषण पाटील यालाही अटक झाली होती. या प्रकरणामुळे तो जवळपास २ वर्षे निलंबित होता. इतका गंभीर इतिहास असतानाही त्याला पुन्हा कामावर घेण्यात आले आणि आता त्याने महिला कर्मचाऱ्यासोबत असे गैरवर्तन केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ स्तरावर सुरू असल्याचे साहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले आहे.