BREAKING NEWS
latest

राज्य सरकारने केंद्र सरकारला उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न देण्याचा पाठवला विनंती प्रस्ताव..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : एक दानशूर व्यक्तिमत्त्व उद्योगपती रतन टाटा हे ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने पडद्याआड झाल्याने राज्य सरकारने शासकीय शोक जाहीर करत रतन टाटा यांचे भारताच्या विकासासाठी केलेले कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना 'भारतरत्न' देण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात येणारा प्रस्तावही काल संमत करण्यात आला.

उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी रात्री (९ ऑक्टोबर) निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली असून उद्योग क्षेत्रासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. राज्यात आज (१० ऑक्टोबर) एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला. दरम्यान राज्य मंत्रिमंडळाची  महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव मांडला. यानंतर ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना 'भारतरत्न' देण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात येणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.

यावेळी शोकप्रस्तावात त्यांनी म्हटलं आहे की, ”उद्यमशीलता हा देखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो. नवनवीन उद्योगांच्या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतो. मात्र, त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळवळा हवा. रतन टाटा यांच्या रुपाने आपण अशाच विचारांचा एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला. भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हे तर समाजउभारणीच्या कामातही टाटा यांचे योगदान अपूर्व होते. ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते. भारताचा अभिमान होते. स्वयंशिस्त, स्वच्छ कारभार आणि मोठमोठे उद्योग सांभाळताना पाळलेली उच्च प्रतीची नैतिक मूल्ये या कठोर कसोट्या पार पाडत रतन टाटा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आणि भारताचाही ठसा उमटवला. त्यांच्या रुपाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे. टाटा समुहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पणतू होते. टाटा समुहाचे अध्यक्ष म्हणून आणि नंतर अंतरिम अध्यक्ष म्हणून या समुहाचा कारभार अनेक वर्ष पाहिला. देशातल्या सर्वात जुन्या अशा टाटा समुहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून अतिशय परोपकारी वृत्तीने त्यांनी काम पाहिलं.”

ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री यांनी बैठकीत शोकप्रस्ताव मांडला आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची विनंती केंद्र सरकारला करण्याचा प्रस्ताव ही संमत करण्यात आला. “टाटा यांनी नैतिक मूल्यांची जी जपणूक केली, ती इतर उद्योजकांसाठी आणि उद्योगविश्वातील भावी पिढ्यांसाठीही दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरतील. ते तत्त्वनिष्ठ कर्मयोगी होते. स्वातंत्र्यानंतर देशाची पुन्हा उभारणीत टाटा समूहाचा वाटा सिंहाचा होता. या समूहाच्या माध्यमातून रतन टाटा यांनी भारताचा झेंडा जागतिक पातळीवर दिमाखाने फडकता ठेवला. मोटारीपासून मिठापर्यंत आणि कंप्युटरपासून कॉफी-चहापर्यंत असंख्य उत्पादनांशी टाटा हे नाव अभिमानाने जोडले जाते. शिक्षण,आरोग्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रातही रतन टाटा यांनी आपले अनन्यसाधारण योगदान दिले. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर त्यांनी दाखवलेला खंबीरपणा स्मरणात राहणारा आहे. कोविड काळात रतन टाटा यांनी 'पीएम रिलीफ फंड'ला तत्काळ १५०० कोटी रुपये दिले. तसेच कोविड काळात रुग्णांसाठी त्यांची बहुतांश हॉटेलही उपलब्ध करून दिली. हा त्यांचा मोठेपणा कायम लक्षात राहणारा आहे. नवनिर्मिती आणि दानशूरता यांचा अपूर्व संगम त्यांच्या ठायी होता. त्यांनी कधीही आपल्या ‘टाटा मूल्यां’शी तडजोड केली नाही.”

“तरुणांमधील कर्तृत्वाला, प्रयोगशिलतेला प्रोत्साहन देण्यात ते कायम आघाडीवर होते. गडचिरोली सारख्या दुर्गम भागात तरुणांच्या कौशल्याला वाव आणि रोजगाराची संधी देण्यासाठी त्यांनी 'इनोव्हेशन सेंटर' सुरू केले. महाराष्ट्र सरकारचा पहिला ‘उद्योग रत्न’ हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. त्यांच्या मार्गदर्शनाचा अनुभव महाराष्ट्राला सदैव झाला. रतन टाटा यांच्या निधनाने आपला देश आणि महाराष्ट्राचेही कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. टाटा समूहाच्या विशाल परिवाराच्या दुःखात मंत्रिमंडळ सहभागी आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो, ही प्रार्थना. देशाच्या या महान सुपुत्राला महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने राज्य मंत्रिमंडळ भावपूर्ण श्रद्धांजली”, असं राज्य मंत्रिमंडळाच्या शोकप्रस्तावात म्हटलं.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत