मुंबई : राज्यात निवडणुकीसोबत भाज्यांचे भावही तापू लागले आहेत. आगामी निवडणुकीच्या तोंडावर महागाईही वाढू लागली आहे. किरकोळ बाजारात लसूण ५०० रुपये दराने विकला जात आहे तर कांदा ८० रुपये किलो झाला आहे. हिवाळ्यात येणारा वाटाणाही २५० रुपये पार झाला आहे. निवडणुकीच्या काळात झालेल्या या भाववाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे तर महिलांचे बजेट कोलमडले आहे.
मागच्या आठवड्यात बाजार समितीत कांदा १८ ते ४८ रुपये किलो दराने विकला जात होता. हाच कांदा आता ३५ ते ६२ वर पोहचला आहे. किरकोळ बाजारात कांद्याचा भाव ७५ ते ८० रुपये प्रतिकिलो झाला आहे. दोन आठवडे कांदा दर तेजीत राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. एवढंच नाही तर वाशी सेक्टर-१७ या उच्चभ्रू वसाहतीमधील मार्केटमध्ये हेच दर १०० रुपये प्रतिकिलो एवढे आहेत. परतीच्या पावसाचा फटका कांदा उत्पादनावर झालेला दिसत आहे. यामुळे कांद्याची आवक कमी होऊ लागली आहे.
किरकोळ बाजारामध्ये लसूण ५०० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. नवीन वर्षात नवीन पीक बाजारात येईपर्यंत लसूणची भाववाढ सुरूच राहण्याची शक्यता आहे.
वाटाणा, हिरव्या भाज्यांचे भावही वाढले
हिवाळ्यात येणाऱ्या वाटण्याचेही भाव महागले आहेत. बाजार समितीमध्ये वाटाणा १६० ते २०० रूपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. किरकोळ बाजारात वाटण्याचा दर २५० रूपये प्रतिकिलो पर्यंत पोहचले आहेत. बाजारात हिरव्या वाटाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. किरकोळ बाजारात मेथीची जुडी ३० रुपये किलो दराने विकली जात आहे. तर लसूणचे दरही कडकडले आहेत. बुधवारी बाजार समितीमध्ये लसूण २२० ते ३२० रुपये किलो दराने विकला जात होता. शेवग्याच्या शेंगाचे दर किरकोळ बाजारात १३० रूपयांवर पोहचले असून वालाच्या शेंगा १२० रुपयांना विकल्या जात आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा