नाशिक : महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक आहेत, ना ब्रेक आहे. चालकाच्या सीटसाठीही तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. आम्ही जनतेला ईश्वरांचे रुप मानतो. जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे. मात्र, महाविकास आघाडीतील नेते जनतेला लुटण्यासाठी राजकारणात आले आहेत, अशी खरमरीत टीका महाविकास आघाडीवर पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी केली. पंतप्रधान मोदी यांनी नाशिक आणि धुळ्यातून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीरसभेत काँग्रेससह महाविकास आघाडीला लक्ष्य केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ”महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला. राज्यातील जनतेने त्यांचे अडीच वर्षांचे शासन बघितले आहे. आधी त्यांनी सरकार लुटले, नंतर जनतेला लुटले. त्यांनी मेट्रो प्रकल्प बंद केले, वाढवण बंदराचे काम थांबवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. तसेच समृद्धी महामार्गाला विरोध केला, अशा नेत्यांपासून आता महाराष्ट्रातील जनतेने सावध आणि एकजूट होण्याची गरज आहे".
“महायुती सरकारच्या केंद्रस्थानी महिला आहेत. कारण महिलांचा विकास झाला, तरचं समाजाचा विकास होतो. त्यामुळे आम्ही महिलांना केंद्रस्थानी ठेऊन अनेक योजना सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रातील महायुती सरकारनेही लाडकी बहीण सारख्या अनेक योजना सुरु केल्या आहेत. लाडकी बहीण योनजेची चर्चा केवळ महाराष्ट्रातच नाही देशभरात सुरु आहे. मात्र, काँग्रेस आणि महाविकास आघाडी नेते ही योजना बंद करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी त्यांचे काही लोक न्यायालयातही जाऊन आले. त्यांना महिलांचा होत असलेला विकास पचणी पडत नाही”, अशी टीकाही पंतप्रधान मोदी यांनी केली.
“काँग्रेस जातीजातीत भेद निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा वंचितांच्या आरक्षणासाठी प्रयत्न करत होते. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू त्याला विरोध करत होते. अनेक अडचणींचा सामना करून बाबासाहेबांनी दलित, आदिवासींना आरक्षण दिलं. त्यानंतर इंदिरा गांधींनीही एससी, एसटींना प्रतिनिधित्व मिळू नये यासाठी प्रयत्न केले. एससी, एसटी, ओबीसी हा समाज मजबूत आणि साक्षर झाला तर काँग्रेसच्या राजकारणाचं दुकान बंद होईल ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते त्यांच्या आरक्षणाला विरोध करतात”, अशी टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा