BREAKING NEWS
latest

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतील १२६४ जणांकडून अग्निशस्त्रे जप्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा, शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीसांकडून दक्षता घेण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवलीतील १२६४ जणांची अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. एकीकडे निवडणूक प्रचारापासून प्रक्रिया संपेपर्यंत अर्थात निकाल घोषित होईपर्यंत कुठेही हिंसाचाराचे गालबोट लागून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीसांनी अग्निशस्त्र जप्तीची कारवाई केली आहे. तर दुसरीकडे पोलीस रेकॉर्डवरील १०३३ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालय परिमंडळ - ३ च्या हद्दीत कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली असे चार विधानसभा मतदारसंघ येतात. सार्वत्रिक विधानसभा निवडणूका २०२४ ची आदर्श आचारसंहिता मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी असा निवडणूकीचा कार्यक्रम आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून कल्याण पोलीस परिमंडळ - ३ हद्दीतील ८ पोलीस ठाण्यांनी  अग्नीशस्त्रे जप्तीसह पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईस सुरूवात केली आहे.

कल्याण पोलीस परिमंडळाच्या हद्दीत १ हजार ३८५ जणांकडे परवानाधारक अग्निशस्त्र आहे. या सगळ्यांनी पोलीस परवानगी घेऊन अग्निशस्त्रे बाळगली आहेत. १५ ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलीसांनी १ हजार ३८५ पैकी १२६४ जणांकडील अग्निशस्त्रे निवडणूक काळापुरती जप्त केली आहे. अग्निशस्त्र जप्तीच्या कारवाईत राजकीय मंडळीची संख्या जास्त आहे.

कल्याण पोलिस परिमंडळ - ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणात बाजारपेठ, महात्मा फुले चौक, खडकपाडा आणि कोळसेवाडी, तसेच डोंबिवलीतील रामनगर, विष्णूनगर, टिळकनगर आणि मानपाडा अशा आठही पोलीस ठाण्यांनी अग्निशस्त्र जप्तीसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्यावर प्रतिबंधकात्मक कारवाई केली. लोकसभा निवडणुकीदरम्यान १ हजार १६५ जणांच्या विरोधात कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी ५९३ जणांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे ११९ जणांच्या विरोधात अजामीनपात्र स्वरूपाची कारवाई करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ हजार ३३ जणांच्या विरोधात कारवाई प्रस्तावित करण्यात आली. त्यापैकी ८७१ जणांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. विविध स्वरूपाच्या कारवाईत सीआरपीसी, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अद्याप १६२ जणांवर कारवाई करणे बाकी असल्याचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६८ प्रमाणे नोटीसा धाडण्यात आल्या आहेत. या नोटीसा प्रत्येक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आपापल्या हद्दीतील राजकिय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना बजावल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण स्वतः किंवा आपले हस्तकाकरवी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या असे कोणतेही कृत्य करू नये की, ज्यामुळे कोणताही दखलपात्र गुन्हा होईल व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल. आपणास सुचित करूनही जर आपण स्वतः किंवा आपल्या हस्तकाकरवी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या कोणतेही कृत्य केल्यास त्याची जबाबदारी संपूर्णपणे आपल्यावर राहील. आपल्या विरूध्द भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ प्रमाणे दिलेल्या नोटीसचा भंग केल्यास भारतीय न्याय संहिता कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत