BREAKING NEWS
latest
latest लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
latest लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य पवन भोईर आणि युवा क्रीडापटू राही पाखले, आदर्श भोईर यांना 'शिवछत्रपती पुरस्कार'..

प्रतिनिधी : अवधुत सावंत

डोंबिवली : क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाचा असलेला 'द्रोणाचार्य पुरस्कार' आणि 'शिवछत्रपती पुरस्कार' हे माझ्या डोंबिवलीकर असलेल्या भोईर जिमखान्याचे संस्थापक पवन भोईर आणि युवा क्रीडापटू राही पाखले, आदर्श भोईर यांना मंगळवारी जाहीर झाले, त्यामुळे तो माझ्या डोंबिवलीकरांचा अभिमान आहे. डोंबिवली शहराच्या शिरपेचात क्रीडा क्षेत्रात यामुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला गेल्याची भावना भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.
आमदार रवींद्र चव्हाण यांनी पवन भोईर यांच्या घरी जाऊन 'द्रोणाचार्य पुरस्कारा'ने त्यांना सन्मानित केले जाणार असल्याने त्यांचा आणि डोंबिवलीकर राही पाखले, मूळ डोंबिवलीकर आदर्श अनिल भोईर यांना जिमनॅस्टिकमधील ट्रॅम्पोलीन या खेळासाठी महाराष्ट्र शासनाचा 'शिवछत्रपती पुरस्कार' जाहीर झाला याबद्दल या दोन्ही युवा खेळाडूंचा भाजपा परिवार आणि डोंबिवलीकर नागरिकांचा प्रतिनिधी या नात्याने यथोचित सन्मान केला.
त्यावेळी माध्यमांना चव्हाण यांनी सांगितले की, "हा सन्मान मिळाला याचा मला या शहराचा प्रतिनिधी म्हणून खूप आनंद झाला आहे. भोईर जिमखाना जेव्हा सुरू झाला, तेव्हापासून आजपर्यंत यशस्वी वाटचाल सुरू आहे. आपल्या शहराचे राष्ट्रीय खेळाडू अशी ख्याती असलेले आणि खेळावर मनापासून प्रेम करणाऱ्या स्व. सुरेंद्र वाजपेयी सरांची आज आठवण येते, त्यांना विद्यार्थी खेळात प्रावीण्य मिळवून आला की, खूप आनंद वाटायचा. त्यांनी समाजामधून उत्तमोत्तम खेळाडू होण्याचे स्वप्न बघितले होते. त्यांनी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे, याचाही मला मनस्वी आनंद आहे."
डोंबिवलीकर राही पाखले, मूळ डोंबिवलीकर आदर्श अनिल भोईर यांना जिमनॅस्टिकमधील ट्रॅम्पोलीन या खेळासाठी महाराष्ट्र शासनाचा 'शिवछत्रपती पुरस्कार' जाहीर झाला आहे, तसेच त्यांचे गुरू पवन भोईर यांना 'द्रोणाचार्य पुरस्कार' जाहीर झाला आहे. पुण्यात १८ एप्रिल रोजी म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलात हा सोहळा संपन्न होणार असून माननीय राज्यपालांच्या हस्ते त्याचे वितरण होणार आहे. भोईर, पाखले यांच्या कुटुंबीयांनी देखील हा अविस्मरणीय क्षण नजरेत टिपण्यासाठी वर्षानुवर्षे प्रचंड कष्ट घेतले आहेत, त्या सगळ्यांचे चव्हाणांनी मनापासून अभिनंदन केले. 'माझे डोंबिवलीकर माझा अभिमान' असल्याचे चव्हाण यांनी यावेळी पुन्हा सांगितले. तसेच त्या सर्व खेळाडूंना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

डोंबिवलीतील नांदिवलीत विकास आराखड्यातील रस्त्यामध्ये बेकायदा इमारतीची उभारणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे डोंंबिवलीतील ६५ महारेरा बेकायदा इमारत प्रकरणातील इमारती तोडण्याचे नियोजन कल्याण-डोंबिवली पालिका, पोलीसांकडून सुरू आहे. या बेकायदा इमारतींवर न्यायालयाची टांगती तलवार असताना डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद येथे आर.के. बाझार दुकान, सर्वोदय ऑर्चिड इमारतीच्या पाठीमागील बाजूस भूमाफियांनी पालीकेच्या विकास आराखड्यातील रस्त्यामध्ये घाईघाईने एक बेकायदा इमारत उभारणीचे काम पूर्ण केले आहे. या बेकायदा इमारतीवर कारवाई होऊ नये म्हणून एकाचवेळी बांधकाम आणि त्याचवेळी त्या इमारतीला सफेद रंग लावून ही इमारत जुनी आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न भूमाफियांकडून केला जात आहे.

६५ इमारती तोडण्याचे नियोजन सुरू असताना भूमाफियांचे पालिकेला आव्हान

डोंबिवली पूर्वेतील स्वामी समर्थ मठ भागातील आर.के.बाजार दुकानाच्या पाठीमागील भागातील रस्त्यावर, सर्वोदय ऑर्चिड गृहसंकुलाच्या लगत मागील भागात ही बेकायदा इमारत पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. या भागातून पालिकेचा विकास आराखड्यातील १८ मीटरचा रस्ता जातो. या रस्त्यामध्येच ही बेकायदा इमारत भूमाफियांकडून उभारली जात आहे. डोंबिवलीतील बेकायदा इमारती तोडण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशावरून पालिका, पोलीस आणि या इमारतींमधील रहिवासी हादरून गेले आहेत. अशा परिस्थितीत न्यायालय, पालिका या यंत्रणांना आव्हान देत असल्याने परिसरातील रहिवासी हैराण आहेत. या भूमाफियांना पालिका प्रशासनाचा धाक राहिला आहे की नाही, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. ही बेकायदा इमारत अधिकृत आहे असे घर खरेदीदारांना दाखवून या बेकायदा इमारतींमधील सदनिका विक्री करण्याची प्रक्रिया भूमाफियांनी सुरू केली असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. या आठ माळ्याच्या बेकायदा इमारतीत घर खरेदीदारांची फसवणूक होण्यापूर्वीच पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी या गंभीर प्रकरणात लक्ष घालावे आणि इमारत तात्काळ भुईसपाट होईल यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिक आणि तक्रारदारांकडून केली जात आहे

नांदिवली पंचानंद हा डोंबिवली शहरातील नागरीकरण होत असलेला महत्वाचा भाग आहे. या भागात आखीव रस्ते, बगिचे, उद्याने, मैदानांसाठीचे राखीव भूखंड भूमाफियांनी यापूर्वीच बेकायदा इमारती बांधून हडप केले आहेत. सर्वोदय ऑर्चिड इमारतीच्या पाठीमागील बाजुला आठ वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या आठ बेकायदा इमारती रखडलेल्या अवस्थेत आहेत. सर्वोदय ऑर्चिड ला पण त्यावेळच्या जिल्हाधिकारी यांनी सील ठोकले होते अशी कुजबुज ऐकू येत आहे.


नांदिवली पंचानंद भागात सर्वाधिक बेकायदा इमारती उभारणारा भूमाफिया रस्ते मार्गात बेकायदा इमारत उभारत असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांनी केल्या आहेत. डोंबिवली नांदिवली पंचानंद भागात अलीकडे एकाही नवीन बांधकामाला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित इमारत बेकायदा आहे. या इमारतीची सर्वेयरमार्फत पाहणी करून कारवाईच्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या जातील असे नगररचना विभागाचे उपअभियंता देविदास जाधव म्हणाले. तसेच 'ई' प्रभाग हद्दीत एकही नवीन बेकायदा बांधकाम सुरू नाही. तरीही असे काही बांधकाम सुरू असेल तर त्याची गंभीर दखल घेऊन त्यावर विहित प्रक्रिया पार पाडून त्या बेकायदा इमारतीवर तात्काळ कारवाई केली जाईल असे 'ई' प्रभाग सहाय्यक आयुक्त, तुषार सोनावणे यांनी बोलून दाखवले.

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा कायापालट..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे - भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री श्री. वैष्णव यांचे आभार मानले.

या योजनेत ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा, शहाड, दिवा आणि बेलापूर या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. यामुळे या भागातील प्रवाशांना आधुनिक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील पुनर्विकासासाठी निवडलेल्या स्थानकांची नावे आणि त्यासाठीचा निधी पुढीलप्रमाणे आहे:

* टिटवाळा स्टेशन: २५ कोटी रुपये

* शहाड स्टेशन: ८. ४ कोटी रुपये

* दिवा स्टेशन: ४५ कोटी रुपये

* बेलापूर स्टेशन: ३२ कोटी रुपये

याव्यतिरिक्त, कल्याण डोंबिवली परिसरातील डोंबिवली स्टेशनचा देखील या योजनेत समावेश आहे. या योजनेमुळे ठाणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना निश्चितच चांगला अनुभव मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

प्रशासनाचा चांगल्या अनुभवाचा उपयोग कल्याण-डोंबिवली पालिकेत होईल - आयुक्त अभिनव गोयल

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : आरोग्य  व शिक्षण, विभागाची माला आवड असल्याने या विभागात विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे मत नवीन आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केले. कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना हिंगोली जिल्हा अधिकारी पदी चांगले काम केल्यामुळे महाराष्ट्र सरकारने माझी नियुक्ती कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त पदी केल्याचे समाधान नवीन आयुक्त अभिनव गोयल यांनी व्यक्त केले.

माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी प्रशासन लोकाभिमुख व्हावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याची मोहीम राबविण्यात येत असून, त्या धरतीवर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यात येणार असल्याचे मत महा पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी मांडले.

कल्याण डोंबिवली या शहरी भागात आपल्या क्षेत्राचे आव्हाने, त्याचे भविष्यातील नियोजन , आणि आपल्याकडे काय काय समस्या आहे, काय काय प्रश्न आहेत, त्याचबरोबर कोणकोणत्या विकास कामांचे प्रोजेक्ट चालू आहेत त्यांना गती देण्याची आपल्याला गरज आहे, त्याच्यावर एकदा सविस्तर चर्चा करून आपल्याला त्या कामावर भर देण्यात येईल. कल्याण-डोंबिवली महापालिके च्या अनधिकृत ६४ बिल्डिंगचा प्रश्न न्याय प्रविष्ट असल्याने  आपल्याला योग्य वेळेची वाट पाहावी लागणार असल्याचे मत आयुक्त अभिनव गोयल यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर आपले मत व्यक्त केले, फूट पथावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये 'रामनवमी' सोहळा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्ष नवमी तिथी म्हणजेच रामनवमी, रामजन्म. 'जे एम एफ' शिक्षण संस्था संचलित जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मध्ये देखील रामजन्म सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नागपूर येथील उच्च शाळेतील निवृत्त मुख्याध्यापक श्री. परशुरामजी भांगे, सौ. पुष्पा भांगे, संस्थेच्या खजिनदार जान्हवी कोल्हे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सर्वप्रथम विद्यार्थिनी इव्हा शॉ व रोमी शॉ या भगिनींनी राम स्तुती वर आधारीत 'ठुमक चलत रामचंद्र..' हे नृत्य सादर केले. इयत्ता पाचवी मधील अवंत या विद्यार्थ्याने श्रीरामाची गोष्ट सांगून माहिती दिली. इयत्ता चौथी मधील समायरा, जाई, आणि रूही या विद्यार्थिनींनी आपल्या शास्त्रीय नृत्यातून संपूर्ण रामायण सादर केले तर इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी नाटक सादर केले. सर्व मुले राम लक्ष्मण सीता, हनुमान, तसेच रामायण मधील इतर पात्र बनून आले होते. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी गीत रामायण मधील 'नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू..'  हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गणित विषयाच्या शिक्षिका सौ. सुरुची पंड्या यांनी राम चरित मानस मधील पद गाऊन सर्वांना आनंद दिला. तर दुपारच्या सत्रात नाट्य विभागाचे शिक्षक नितेश मेस्त्री यांनी  'आरंभी वंदीन अयोध्येचा राजा.. हे गीत सादर करून सर्वांच्या डोळ्यासमोर अयोध्येचे चित्र उभे केले.
पुत्र असावा तर रामासारखा, पती असावा तर रामासारखा, भाऊ असावा तर रामासारखा. श्रीरामा सारखा संयम, शत्रूलाही सुहास्य वदनाने नमविता आले पाहिजे अशा मर्यादा पुरुषोत्तमाचे गुण सर्वांमध्ये असले पाहिजेत, असे प्रमुख पाहुणे श्री. परशुरामजी भांगे यांनी रामनवमीच्या शुभेच्छा देताना सांगितले. तर चार युगांची माहिती देत कलियुगामध्ये देव आणि दानव हे कसे मानवाच्या अंतर्गत आहेत आणि त्या अंतर्मनावर मात करण्यासाठी श्रीरामाचे अंतर बाह्य अवलोकन करणे गरजेचे आहे असे खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी मुलांना सांगून श्रीरामसारखे निस्वार्थी प्रेम करा असेही सांगितले व शुभेच्छा दिल्या.
     
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे सध्या शैक्षणिक चर्चासत्रासाठी माउंट अबू येथे वास्तव्यास आहेत, तेथूनच त्यांनी दूरचित्र संभाषण द्वारे (व्हिडिओ कॉल) सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. रामासारखे चरित्र, निस्सिम बंधूप्रेम, आज्ञाधारक, प्रसंगी शत्रूलाही लढा देऊन क्षमा करणारा केवळ श्रीराम आहे, अशा श्रीरामसारखे कर्तुत्ववान व्हा असे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे व डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले व सर्वांना पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. 
      
आजच्या दिवशी मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये जणु काही अयोध्या सजली होती. श्री. नरेश पिसाट, अवधूत देसाई सर यांनी सर्व ठिकाणी भगवे पताके, फुलांच्या माळा, रांगोळ्या यांची भव्य दिव्य सजावट केली होती. सर्व सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाल्यावर पाहुण्यांच्या हस्ते पाळण्या मध्ये श्रीरामाची मूर्ती ठेऊन, संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी 'राम जन्मला ग सखी..' हा पाळणा गाऊन राम जन्म सोहळा संपन्न झाला. तसेच रामाची आरती करण्यात आली. त्याच बरोबर चैत्र महिना म्हणजे चैत्र देवीचे नवरात्र, तुळजा भवानी देवीची पूजा करून आरती करण्यात आली. कलात्मक शिक्षक अभिषेक देसाई, प्रमोद पगारे, दीपा तांबे , रमेश वागे, सौ.मयुरी खोब्रागडे सौ. श्रेया कुलकर्णी व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमाची उत्तम तयारी करून राम जन्म सोहळा संपन्न केला.

खडकपाडा पोलीस ठाणे हद्‌दीतील अटाळी परिसरातील वृद्ध महिलेच्या खुनाचे गुन्ह्यातील आरोपीस अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : दिनांक २०/०३/२०२५ रोजी श्रीमती रंजना चंद्रकात पाटेकर (वय: ६० वर्षे), राहणार. सिद्धीविनायक चाळ, खापरीपाडा, अटाळी, आंबिवली कल्याण (पश्चिम) यांचा राहते घरी अज्ञात मारेकरी याने जबरी चोरी करून श्रीमती रंजना पाटेकर या वृध्द महिलेचा खुन केल्याबाबत वृद्ध महिलेचा भाचा श्री. हर्षल प्रेमाचंद पाटकर यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पो.स्टे. गु.रजि.नं. २५३/२०२५ भारतीय न्याय संहीता १०३(१) ३११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी बाबत काहीएक धागा दोरा नसताना तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यानी शिताफीने माहिती काढून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी नामे चांद उर्फ अकबर महम्मद शेख, (वय; ३० वर्षे), राहणार. संतोषी माता नगर, नवनाथ कॉलनी, रूम न. १० आंविवली, कल्याण (पश्चिम) यांस मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे ताब्यात घेवुन आरोपी नामे चांद उर्फ अकबर शेख याच्याकडे शिताफीने व सखोल तपास करून सदर गुन्ह्यातील जबरी चोरी झालेला मुद्देमाल १,०५,०००/- रूपये किंमतीचा हस्तगत करून आरोपीस सदर गुन्ह्यात अटक करून कौशल्यपूर्ण पध्द‌तीने गुन्हा उपडकीस आणलेला आहे.

गुन्ह्याच्या तपासात आरोपी नामे चांद उर्फ अकबर महम्मद शेख हा घटनास्थळाचे परिसरात राहण्यास असुन आरोपीस मोमोज विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे हवे असल्याने त्याने जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने मयताचे घराची काही दिवसापासून रेकी करून घटनेच्या वेळी मयत श्रीमती रंजना पाटकर ह्या घरात एकटयाच असताना आरोपी याने मयत यांच्याकडे पिण्याचे पाणी मागितले, मयत पाणी आणण्यासाठी आत गेल्या असतां आरोपी याने फिर्यादीच्या घरात प्रवेश करून हॉलमधील टिव्हीचा आवाज वाढविला, तदनंतर मयत ह्यांनी आरडा ओरडा करू नये म्हणून हाताने तोंड दाबुन जमीनीवर आपटून, गळा दाबुन जिवे ठार मारले, त्यानंतर मयताच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र, व कानातील सोन्याची कर्नफुले असा एकुण १,०५,०००/- रूपये किंमतीचा मु‌द्देमाल जबरी चोरी केला होता.

अटक आरोपी नामे चांद उर्फ अकबर महम्मद शेख यास यापुर्वी कोळशेवाडी पो स्टे. गु.रजि.नं. १२२/२०१४ भा.दं.वि.सं.कलम ३०२,२०१,४६०,३४ मध्ये आधारवाडी कारागृहात बंदी होता. आठ महिन्यापूर्वी सदर आरोपी हा कारागृहातून बाहेर येवुन मानेगांव अटाळी, कल्याण (पश्चिम) येथे राहण्यास होता. तदनंतर त्याने सदरचा गुन्हा केला असुन त्यास सदर जबरी चोरीसह खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन सध्या तो खडकपाडा पोलीस ठाण्याच्या  पोलीस कोठडी मध्ये आहे.

सदर गुन्ह्यात अज्ञात मारेकरी यांचा कोणत्याही प्रकारचा धागा दोरा नसतांना खडकपाडा पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मा. पोलीस आयुक्त श्री. आशुतोश डुंबरे, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. संजय जाधव, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३. कल्याण श्री. अतुल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त कल्याण विभाग श्री. कल्याणजी घेटे यांनी तपासकामी मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. संदीप शिवले नेम. खडकपाडा पोलीस ठाणे करीत आहेत. सदरची कामगिरी खडकपाडा पोलीस ठाणे तपास पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप शिवले. सपोनि. विजय गायकवाड, अनिल गायकवाड, पोउपनिरी. अर्जुन दांडेगावकर, सेपोउपनि. सुधीर पाटील, पोहवा. राजु लोखंडे, योगेश बुधकर, कुंदन भामरे, संदीप भोईर, विनोद कामडी, किरण शिर्के, संजय चव्हाण, ज्योती देसले, पोशि. ललीत शिंदे, महेश बगाड, राहुल शिंदे, अविनाश पाटील, अनंता देसले, सुरज खंडाळे, मनोहर भोईर, धनराज तरे यांनी यशस्वीपणे केली आहे.

दोन बलात्कारी गुन्ह्यातील रिल स्टार आरोपीस नाशिक येथुन खंडणी विरोधी पथक, ठाणे यांच्याकडून अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : मानपाडा पोलीस स्टेशन गुरजिनं ३४१/२०२५ बीएनएस कायदा कलम ६४, ७४, ११५(२), ३५१(२), ३(५) सह आर्म ऍक्ट कायदा कलम ३,२५ व  टिळकनगर पोलीस स्टेशन गुरजिनं २६७/२०२५ भादंवि कलम ३७६ (२), (एन) ५०४, ५०६ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील पाहीजे असलेला आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील (वय: ५२ वर्षे), राहणार. चौधरी बिल्डिंग, २ रा माळा, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, बारा बंगला रोड, ठाकुर्ली, डोंबिवली (पुर्व) हा गुन्हे दाखल झाल्यापासुन फरार झालेला होता व सापडत नव्हता. सदर पाहीजे आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील याचा गुप्त बातमीदारांकरवी शोध घेतला असता तो 'हॉटेल सेलीब्रेशन' जिल्हा नाशिक याठिकाणी लपुन बसला असल्याबाबत माहीती प्राप्त झाली होती.
सदर मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील यांस इंदीरानगर पोलीस स्टेशन, नाशिक शहर यांच्या मदतीने खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांनी 'हॉटेल सेलीब्रेशन' जिल्हा नाशिक येथुन दिनांक ०४/०४/२०२५ रोजी सायंकाळी ०८.०० वाजता पकडून ताब्यात घेतले असुन, त्यास पुढील तपासकामी मानपाडा पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई मा. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर मा. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, मा. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-१, गुन्हे शाखा, ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक मा. विनायक घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध -२, गुन्हे शाखा, ठाणे, यांच्या  मार्गदर्शनाखाली पोनि. नरेश पवार, सपोनि. सुनिल तारमळे, श्रीकृष्ण गोरे, पोउपनिरी. सुहास तावडे, सपोउपनिरी. संदीप भोसले, पोहवा. ठाकुर, पाटील, गायकवाड, जाधव, गडगे, मपोहवा. पावसकर, पोना. हासे, मधाळे, चापोना. हिवरे, पोशि. वायकर, ढाकणे यांनी यशस्वीपणे केली आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दि.०४ एप्रिल रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील ३० भूप्रमाण केंद्रांचे उद्घाटन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई :- तहसिल कार्यालयामध्ये सुरू असलेल्या सेतु सेवा कार्यालयाच्या धर्तीवर भूमी अभिलेख विभागातील उप-अधीक्षक भूमी अभिलेख, ठाणे आणि उप-अधीक्षक भूमी अभिलेख, शहापूर या कार्यालयातील भुप्रमाण केंद्राचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दि.०४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वाजता दुरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाला.

या केंद्रामध्ये संगणकीकृत मिळकत पत्रिकेवरील फेरफार सर्व प्रकारचे ऑनलाईन फेरफार अर्ज, ई-मोजणी व्हर्जन २.० मधील सर्व प्रकारचे मोजणी नकाशे, मिळकतीच्या डिजिटल सही केलेले फेरफार, नोंदवही उतारे आणि ऑनलाईन अर्ज करायची सुविधा, तसेच नकाशे व स्कॅन अभिलेख याच्या डिजिटल सही केलेल्या नकला, जनतेला वाजवी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

यापूर्वी भूमी अभिलेख विभागातील विविध प्रकारचे नकला मिळविण्यासाठी नक्कल अर्ज करण्यासाठी जनतेला कार्यालयात छापील अर्ज करून हेलपाटे घालावे लागत होते. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नागरिकांची खाजगी संस्थेकडून आर्थिक पिळवणूक होत होती आणि सुविधा वेळेत मिळत नव्हत्या. परंतू आता भूप्रमाण केंद्राच्या माध्यामातून जनतेला सर्व सुविधा वेळेत आणि वाजवी दरात मिळाल्यामुळे प्रशासनातील विलंब कमी होऊन लोकाभिमुख प्रशासनाला हातभार लागणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये एकुण ३० भूप्रमाण केंद्राचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले असून यामुळे भूमी अभिलेख खाते लोकाभिमुख होणार आहे.

ठाण्यात व्हॉट्सऍपवरून चालायचं सेक्स रॅकेट, दोन दलालांवर गुन्हा दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : ठाणे शहरात व्हॉट्सऍपवरून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी पोलीसांनी एका दलालाला अटक केली आहे. तर दुसरा दलाल पसार झाला आहे. व्हॉट्सऍपवरून पीडित महिलेचा ग्राहकांना फोटो पाठवून वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन दलालांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांपैकी एका दलालाला झडप घालून पोलीसांनी अटक केली. मात्र, दुसरा दलाल पोलीसांना गुंगारा देत पसार झाला. निर्मल मंगर साव (वय: ५८ वर्षे) असे अटक केलेल्या दलालाचं नाव आहे. तर त्याचा साथीदार प्रदीप जाधव हा पसार झाला आहे.

पीडित महिलांना वेश्या व्यवसायासाठी पैशांचं आमिष दाखवून आरोपी हे सेक्स रॅकेट चालवत होते, अशी माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.

व्हॉट्सऍपवरून ग्राहकांशी करायचे संपर्क -

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दलाल प्रदीप आणि निर्मल या दोघांनी आपआपसात संगनमतानं एका ४५ वर्षीय महिलेला वेश्या व्यवसायासाठी पैशांचं आमिष दाखवलं. त्यानंतर पीडित महिलेचा वापर वेश्या व्यवसायासाठी करण्याकरिता व्हॉट्सऍपवरून आणि मोबाईल फोनद्वारे ग्राहकांशी संपर्क करण्यास सुरुवात केली.

दलाल निर्मलला अटक, पैसे जप्त -

पीडित महिलेला एका ठिकाणी वेश्या व्यवसयासाठी पाठविण्यात येत असल्याची माहिती शांतीनगर पोलीस पथकाला मिळाली होती. त्यानुसार ३ एप्रिल रोजी सांयकाळच्या सुमारास भिवंडीतील बाबला कंपाऊंड भागात असलेल्या एका लॉजवर पोलीस पथकानं धाड टाकली. यावेळी पोलीसांनी दलाल निर्मलला अटक केली. त्याच्याकडील ७ हजार १२० रुपये रोख रक्कम जप्त केली. पीडित महिलेची भिवंडीतील एका लॉजमधून सुटका करण्यात आली.

पसार झालेल्या दुसऱ्या दलालाचा शोध सुरू -

दोन्ही दलालाविरोधात शांतीनगर ठाण्याचे पोलीस शिपाई भुषण नाना पाटील यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलीसांनी अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन १९५६ चे कलम ४ आणि ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला. पसार झालेल्या प्रदीपचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक (प्रशासन) विनोद पाटील यांनी दिली. या या घटनेचा पुढील तपास विनोद पाटील करीत आहेत.

राज्यात कुठूनही करता येणार ऑनलाईन घर नोंदणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : घराच्या नोंदणीसाठी आपल्याला उपनिबंधक कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात जावं लागतं. बऱ्याच वेळा लोकांना अनेक तास या कार्यालयांमध्ये ताटकळत बसावं लागतं. अनेकदा सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. काही वेळा, काही ठिकाणी दलाल पैसे उकळतात. हा सगळा प्रकार आता थांबणार आहे. कारण राज्य सरकारने घरांच्या नोंदणीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

आता राज्यात कुठेही बसून कुठल्याही जिल्ह्यातील घरांची नोंदणी करता येईल. ही सगळी प्रक्रिया ऑनलाइन असेल. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर याबाबतची माहिती जाहीर केली आहे. महायुती सरकार राज्यात १ मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’ ही पद्धत सुरू करणार असल्याचं बावनकुळे यांनी जाहीर केलं.

घरी बसून मुद्रांक नोंदणी करता येणार : बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “घर खरेदी-विक्री करतेवेळी नोंदणीसाठी सरकारी कार्यालयात जावं लागतं. तिथे अनेक हेलपाटे मारावे लागतात. नोंदणी करताना मध्ये दलालांचा अडथळा असतो. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शी व गतीमान सरकारच्या १०० दिवसांच कार्यक्रम दिला होता, त्याअंतर्गत महसूल खात्याच्या मुद्रांक निरिक्षकांनी व महानिरिक्षकांनी एक चांगला उपक्रम पुढे आणला आहे. ‘एक राज्य एक नोंदणी’ अशी पद्धत आपलं सरकार सुरू करत आहे. त्याअंतर्गत राज्यातील कुठलीही नोंदणी, मुद्रांक नोंदणी घरी बसून करता येणार आहे.

१ मे पासून एक राज्य एक नोंदणी प्रक्रिया सुरू होणार : महसूल मंत्री

महसूल मंत्री म्हणाले, “तुम्ही एखादं घर खरेदी केलं असेल तर कुठेही बसून त्याची नोंदणी करता येईल. पुण्यात बसून नागपुरातील घराची, मुंबईत बसून पुण्यातील घराची नोंदणी करता येईल. ही सगळी फेसलेस प्रक्रिया असेल. तुमचं आधार कार्ड व आयकर दस्तऐवजांच्या मदतीने तुम्ही फेसलेस नोंदणी करू शकता. ऑनलाइन मुद्रांक नोंदणी व ‘एक राज्य एक नोंदणी’ प्रक्रिया आपण १ मेपासून सुरू करत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी डिजीटल इंडिया, डिजीटल महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. आमचं सरकार त्यावर काम करत आहे.” सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर मुंबई व उपनगरांत अशी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती जी आता राज्यभर सुरू होत आहे.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जीवपेक्षा पैसा मोठा ; गर्भवतीचा दुर्दैवी अंत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

पुणे : पुण्यामधील दीनानाथ  मंगेशकर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करून घेण्यापूर्वी दवाखान्यात भरण्यासाठी दहा लाख रुपये नाहीत केवळ एवढ्या कारणासाठी एका बाळंतपणासाठी आलेल्या एका महिलेला एडमिट करून घेतलं गेलं नाही व परिणामी तिला जीवाला मुकावे लागले ही बाब अत्यंत खेदजनक असून दीनानाथ मंगेशकर सारख्या धर्मदाय आयुक्तकडे रजिस्टर असलेल्या हॉस्पिटल ने त्यांच्याकडील दहा ते पंचवीस टक्के बेड आर्थिक दृष्ट्या दुर्बल व मोफत उपचारासाठी राखीव  ठेवण्याचा कायदा असतानाही भरण्यासाठी पैसे नाहीत या कारणासाठी त्या महिलेला ऍडमिट करून घेतले नाही आणि त्यातच तिचा जीव गेलेला आहे. नाव मोठं आणि लक्षण खोटं असणाऱ्या अशा या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा हा अत्यंत असंवेदनशील प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा आहे.
       
वास्तविक पाहता धर्मदाय आयुक्त कडे नोंद असलेल्या सर्व हॉस्पिटल्सने दवाखान्याच्या बोर्डवर धर्मादाय आयुक्त संचलित असे लिहिण्याचा शासनाने कायदा केलेला आहे. अशी हॉस्पिटल निर्माण होत असताना शासनाच्या मालकीची जागा घेतात व शासनाकडून वेगवेगळ्या सवलती घेतात. इन्कम टॅक्स मधून सूट घेतात एवढेच नाही तर स्थानिक सरकारकडून पाणीपट्टी सूट, घरपट्टीत सूट सर्व प्रकारचे आर्थिक लाभ घ्यायचे आणि गोरगरिब पेशंट कडून सुद्धा अशा पद्धतीने पैसे घेतल्याशिवाय त्यांना उपचार द्यायचे नाहीत ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे अशा या पैसे खाऊ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चा परवाना रद्द करणे गरजेचे आहे तसेच त्यांच्यावर मनुष्यधाचा गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे.  वास्तविक पाहता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल त्या महिलेकडून किंवा तिच्या नातेवाईकांकडून पिवळ्या रेशन कार्ड व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ किंवा अगदी पंतप्रधान आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देऊ शकले असते. तथापि केवळ पैशाच्या हव्यासापोटी पैशाची मागणी करत बसलेल्या या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ने वरील योजनांचा लाभ देण्याऐवजी त्या महिलेला उपचार देण्याच्या टाळून पैसे हडपण्याच्या हेतूने अशा पद्धतीने उपचार करण्यात दिरंगाई केली. त्या महिलेला सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत दवाखान्याच्या दारात बसून राहावं लागलं त्याच ठिकाणी तिला रक्तस्राव सुरू झाला. तिची मानसिक खच्चीकरण झाले आणि अशा  परिस्थितीत तिला जीवाला मुकावे लागले ही बाब अत्यंत खेदाची आहे या गोष्टीवर सर्वपक्षीय आंदोलन उभे राहणे गरजेचे आहे.

संविधानाने सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत त्यात सर्वात महत्वाचा जगण्याचा अधिकारच यामुळे नाकारला गेला आहे. सदर महिला ही एका आमदार साहेबाच्या पीए ची पत्नी होती. तिच्या साठी मंत्रालयातुन तिला ऍडमिट करून घ्या म्हणून ही फोन आला होता.  तरीही तिला ऍडमिट करून घेतले गेले नाही. याउलट तिला ससून हॉस्पिटलला न्या असे सांगितले. त्यामुळे नाईलास्तव तिला दुसरीकडे न्यावे लागले त्यामुळे उपचारासाठी विलंब झाला व महिलेला प्राणास मुकावे लागले. प्रसूती दरम्यान त्या महिलेला दोन जुळ्या मुली झाल्या. हॉस्पिटल च्या अशा निष्काळजी पणामुळे मुलींना त्यांच्या आईला गमवावे लागले. सदर हॉस्पिटल वर कडक कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे अशी पुण्यात सर्वत्र मागणी होत आहे.

चित्रपट प्रेक्षकांमध्ये देशभक्ती रूजवणारा कलाकार वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने हरपला..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मनोज कुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी  रोजी झाला होता. मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी स्वामी असे होते. मनोज कुमार यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. दिलीप कुमार हे त्यांचे आवडते अभिनेते. त्यांच्यावर दिलीप कुमार यांचाच प्रभाव होता. त्यांनी मनोज कुमार हे नाव धारण करण्यामागेही दिलीप कुमार हेच होते. शबनम या चित्रपटात दिलीप कुमार यांनी साकारलेल्या  पात्राचे नाव  मनोज कुमार असे होते. या  चित्रपटात दिलीप कुमार यांनी साकारलेले मनोज कुमार हे पात्र त्यांना इतके  भावले की त्यांनी स्वतःचे नाव मनोज कुमार असेच ठेवले. १९५७ साली शहीद या चित्रपटाद्वारे मनोज कुमार यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपट खूप गाजला.या चित्रपटात त्यांनी साकारलेली भगतसिंग यांची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली.

देशभक्तीवर आधारित हा चित्रपट यशस्वी झाल्याने त्यांनी पुढे अनेक देशभक्तीपर चित्रपटांची निर्मिती केली. मनोज कुमार यांनी उपकार या देशभक्तीपर चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला जय जवान  किसान… हा नारा त्यांनी या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. हा चित्रपट खूप गाजला या चित्रपटातील गाणी लोकप्रिय झाली. मेरे देश की धरती… हे अजरामर गीत याच चित्रपटातले.  उपकार नंतर त्यांनी पुरब और पश्चिम, हरियाली और रास्ता, रोटी कपडा और मकान, क्रांती, हिमालय की गोद मे असे देशभक्तीपर चित्रपट काढले हे सर्व चित्रपट खूप गाजले. या चित्रपटाद्वारे त्यांनी प्रेक्षकांमध्ये देशभक्ती रुजविण्याचा प्रयत्न केला. मनोज कुमार यांनी आणि अनेक देशभक्तीपर चित्रपटांची निर्मिती केली म्हणून त्यांना "भारत कुमार' हे टोपण नाव पडले. त्यांनी निर्माण केलेले आणि अभिनय केलेले देशभक्तीवरील चित्रपट त्याकाळी खूप गाजले होते.  

मेरे देश की धरती, सरफरोशी की तमन्ना, एक प्यार का नगमा है, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा.. अशी अनेक अजरामर गाणी मनोज कुमार यांच्यावर चित्रित झाली आहेत. आजही स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी  त्यांच्या देशभक्तीवरील चित्रपटातील गाणी आवर्जून वाजवली जातात. शोर, पत्थर के सनम, दो बदन, मेरा नाम जोकर हे त्यांनी अभिनय केलेले चित्रपट देखील खूप लोकप्रिय ठरले. मनोज कुमार यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले. उपकार या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. २००५ साली त्यांना चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. १९९२ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविले. 

मनोज कुमार यांनी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांमध्ये देशभक्ती रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निधनाने प्रेक्षकांमध्ये देशभक्ती रुजवणारा पडद्यावरील भारत कुमार काळाच्या पडद्याआड हरपला गेला असे म्हणावे लागेल. मनोज कुमार यांच्या निधनाने हिंदी चित्रपट सृष्टीची मोठी हानी झाली आहे. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

माजी आमदार गणपत गायकवाड यांचा न्यायालयात केबल वाद प्रकरणी जबाब..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण :  २०१४ साली कोळसेवाडी पोलीस ठाण्यात झालेल्या राडा प्रकरणात भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण न्यायालयात आपला जबाब नोंदविला. पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याला गणपत गायकवाड आणि शिवसेना शहरप्रमुख निलेश शिंदे यांनी नकार दिला आहे.

माजी आमदार गणपत गायकवाड आणि निलेश शिंदे यांच्यावर केबलच्या वादातून पोलिस ठाण्यात वाद झाल्याचा आरोप आहे. मात्र, न्यायालयात दोघांनीच हा आरोप फेटाळला. 'त्या वेळी चोरी आणि सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांबाबत आम्ही पोलीसांना भेटण्यासाठी गेले होतो. मात्र कोणताही वाद घडला नाही,' असे दोघांनी न्यायालयासमोर सांगितले. या प्रकरणात गणपत गायकवाड यांनी न्यायालयात आपला जबाब नोंदविला, तर निलेश शिंदे यांनी सत्यप्रतिज्ञा पत्र सादर केले. यापूर्वी पाच साक्षीदारांनी केबलच्या वादातून पोलीस ठाण्यात गोंधळ झाल्याची साक्ष दिली होती.

कल्याण पूर्वचे माजी आमदार गणपत गायकवाड सध्या तळोजा कारागृहात आहेत. महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात ते अटकेत आहेत. आज न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले, त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यांच्या सोबत त्यांचे भाचे कुणाल पाटील आणि विकी गणात्राही न्यायालयात उपस्थित होते.

सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी पाच साक्षीदारांच्या जबाबाची माहिती गणपत गायकवाड यांना दिली. साक्षीदारांनी केबलच्या वादातून वाद झाल्याचे सांगितले होते. मात्र, गणपत गायकवाड यांनी "मी त्या वेळी आमदार होतो. आमच्या परिसरात चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. त्यामुळे आम्ही त्या संदर्भात पोलीसांकडे निवेदन द्यायला गेलो होतो, असे स्पष्टीकरण दिले. तसेच, त्यांनी हेही सांगितले की, 'आमच्या विरोधात पोलीसांनी चुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 'निलेश शिंदे यांनी देखील सत्यप्रतिज्ञा पत्र सादर करत 'त्या वेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रुपेश गायकवाड यांनी मोहिम सुरू केली होती. केबलच्या वादातून काहीच घडले नाही, असे म्हटले.

दरम्यान, माजी आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयात जेवण करण्याची अनुमती देण्यात आली होती. मात्र, सुनावणीनंतर त्यांना पुन्हा कारागृहात नेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली. काही समर्थकांनी त्यांचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस आणि समर्थकांमध्ये मोठी रेटारेटी झाली. परिणामी, न्यायालयाच्या परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

ए.आय. आधारित डिजिटल परिवर्तनासाठी महाराष्ट्र आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात भागीदारी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात सामंजस्य करार झाला. यानुसार, राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता (ए.आय.) केंद्र स्थापन होणार आहे. हा करार “डिजिटल भारत, आत्मनिर्भर महाराष्ट्र” संकल्पनेला बळकटी देईल, आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने शासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख होईल. याचा थेट लाभ नागरिकांना होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी म्हणाले.

*या सामंजस्य कराराअंतर्गत महाराष्ट्रात तीन ए.आय. उत्कृष्टता केंद्रे स्थापन केली जातील:*

मुंबई – भूगोल विश्लेषण केंद्र: या केंद्राच्या माध्यमातून उपग्रह इमेजरी आणि जी.आय.एस. चा वापर करून धोरणात्मक निर्णय प्रक्रियेस सहाय्य मिळेल.

पुणे – न्यायवैज्ञानिक संशोधन आणि ए.आय. केंद्र: गुन्हे तपास आणि न्यायवैज्ञानिक विश्लेषणासाठी ए.आय.चा वापर वाढविण्यात येईल.

नागपूर – मार्व्हेल केंद्र: कायद्यांची अंमलबजावणी, दक्षता आणि प्रशासन सुधारण्यासाठी ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

याव्यतिरिक्त, मायक्रोसॉफ्टचे कोपायलट (Copilot) तंत्रज्ञान शासनाच्या कार्यप्रणालीत लक्षणीय सुधारणा करेल. दस्तऐवज व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल आणि नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण शक्य होईल. हेल्थकेअर, जमीन अभिलेख व्यवस्थापन आणि वाहतूक व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांमध्येही सुधारणा होईल. यामुळे शासनाची सेवा अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकहितैषी बनेल.

मायक्रोसॉफ्टच्या एमएस लर्न (MS Learn) प्लॅटफॉर्मद्वारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त ए.आय. (AI) प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र मिळेल, ज्यामुळे त्यांच्या कार्यक्षमता सुधारतील. या सहकार्यामुळे महाराष्ट्रातील आयटी (IT) आणि ए.आय. (AI) क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

या पुढाकारामुळे महाराष्ट्र प्रशासनातील पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्याचा आणि डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक मोठा पाऊल टाकण्याचा मार्ग मोकळा होईल. महाराष्ट्र हे ए.आय.(AI) - आधारित सरकारी सेवा सुधारण्यासाठी देशातील अग्रणी राज्य बनेल, आणि देशभरातील नागरिकांना उत्तम सेवा मिळवून देईल. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसविण्यासाठी दि.३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण :- परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यातील दि.०१ एप्रिल २०१९  पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक करणेबाबत सूचित केले आहे. त्याकरिता परिवहन विभागाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण कार्यालयासाठी M/s REAL MAZON INDIA LTD., एजन्सीची नियुक्ती केली असून HSRP बुकिंग पोर्टल लिंक/URL <https://hsrpmhzone2.in> आहे. या लिंकवर वाहनांसंबधित आवश्यक सर्व माहिती अचूक भरावी जेणेकरुन कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही, मोटार वाहनांवर हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट (HSRP) साठी लागणारे शुल्क आणि लागणारा वेळ/दिवस निर्धारित केले आहेत.

शुल्क पुढीलप्रमाणे:-

* Two-Wheelers and Tractors - HSRP Set Rates including fitment charges excluding GST (in INR) - ₹ 450.00.

* Three-Wheelers - HSRP Set Rates including fitment charges excluding GST (in INR) - ₹ 500.00.

* Light Motor Vehicles/Passenger Cars/ Medium Commercial Vehicle/Heavy Commercial Vehicles and Trailer/Combination - HSRP Set Rates including fitment charges excluding GST (in INR) ₹ 745.00.
वेळ/दिवस कालावधी खालीलप्रमाणे:-

HSRP Appointment Booked by Applicant - Timeline - Day 0

Blank HSRP to be embossed - Timeline - 2 day prior to appointment Date.

Applicant to be able to reschedule appointment, if HSRP not affixed in the first appointment-Any date - Timeline - up to 90 days after first appointment date.

Embossed HSRP to be maintained at Affixation Centre - Timeline - Up to 90 days after first appointment.

Embossed HSRP to be destroyed -  Timeline - After 90 days from first appointment date (if not fitted to respective vehicle).

यापूर्वी परिवहन विभागाच्या सूचनेनुसार हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट (HSRP) दि.३१ मार्च २०२५ पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. आजपर्यंत जुन्या वाहनांना हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्याचे काम फारच कमी झाले असल्याने जुन्या वाहनांना हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यासाठी दि.३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, असे कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी प्रसिद्धी माध्यमांना कळविले आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची कार्यकाल संपण्याआधीच बदली..


प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांची पालघर जिल्हाधिकारी म्हणून शासनाने मंगळवारी बदली केली. डाॅ. इंदुराणी जाखड या कल्याण-डोंबिवली महापालिकेला आयएएस दर्जाच्या पहिल्या महिला आयुक्त होत्या. दीड वर्षाच्या कालावधीत डाॅ. जाखड यांनी प्रशासकीय कामात शिस्त आणण्यात, पालिकेतील कर्मचाऱ्यांचे पदोन्नत्ती, अनुकंपा, वारसा हक्क भरतीचे प्रश्न मार्गी लावण्यात महत्वाची भूमिका बजावली.
प्रशासकीय कामातील कर्तव्यात कसूरपणा करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना त्यांनी वेळीच खडेबोल सुनावले. थेट निलंबनाची कारवाई केली. सतरा महिन्याच्या कालावधीत आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी प्रशासनावर चांगली पकड बसवली होती. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यावर त्यांचा भर होता. पालिकेचा चालू वर्षीचा अर्थसंकल्प मांडताना पालिकेची तिजोरी पाहून त्यांनी फार मोठ्या विकास प्रकल्पांच्या घोषणा केल्या नव्हत्या. महापालिकेचे उत्पन्न वाढावे यासाठी त्यांचा प्राधान्यक्रम राहीला होता. राजकीय रेट्यामुळे त्यांच्या काळात अनेक महत्वाचे प्रकल्प कल्याण, डोंबिवली शहरात सुरू करण्यात आले. मात्र यातील बहुसंख्य प्रकल्पांना म्हणावा तसा वेग मिळालेला नाही.
कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डाॅ. इंदुराणी जाखड यांनी आक्रमकपणे प्रशासकीय कामकाज सुरू केले होते. त्यांच्या कार्यकाळात काही रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त होत होती. बेसुमार बेकायदा बांधकामांमुळे कल्याण, डोंबिवली शहरांना उकीरडा होऊ लागला आहे. डॉ. जाखड यांच्या कार्यकाळात मोठया प्रमाणावर बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई करण्यात आली. असे असले तरी अशा बांधकामांना पुर्णपणे आळा घालणे त्यांनाही जमले नाही. महापालिकेचे उत्पन्न वाढायला हवे यासाठी त्यांनी मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबवली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांची कल्याण डोंबिवली महापालिकेतील कामकाजावर पुर्ण पकड आहे. शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद असताना जाखड यांची या महापालिकेत आयुक्तपदी नियुक्ती झाली. प्रशासकीय सेवेची शिस्तप्रिय कार्यपध्दतीची चुणूक त्यांनी आपल्या कामकाजातून दाखविण्यास सुरूवात केली होती. महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांमधील राजकारण याविषयी त्या सतर्क होत्या. कल्याण-डोंबिवली शहरासाठी प्रथमच एक भारतीय प्रशासकीय सेवेतील महिला अधिकारी आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

पालघर जिल्ह्याचे आव्हान

पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके निवृत्त झाल्यामुळे या पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पालघर जिल्ह्यात येत्या काळात वाढवण बंदरासारखे मोठे प्रकल्प उभे रहाणार आहेत. याशिवाय मोठया उद्योग समुहांनी या भागाकडे आपले लक्ष वळविले आहे. त्यामुळे जमिन संपादनासारखे महत्वाचे विषय मार्गी लावण्याचे मोठे आव्हान या जिल्ह्यातील प्रशासकीय प्रमुखाकडे असणार आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात थेट सनदी सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती केली जावी असा आग्रह धरला जात होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाखड यांची याठिकाणी नियुक्ती करत आव्हानात्मक जबाबदारी त्यांना दिली आहे असे बोलले जात आहे.

सरकारकडून नैसर्गिक वायूच्या दरात ४ टक्के वाढ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
  
नवी दिल्ली : केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या मूल्य निर्धारण दरात (एपीएम) ४ टक्क्याने वाढ केली आहे. नैसर्गिक वायूपासून सीएनजी व पीएनजी तयार होत असल्याने त्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. एक एप्रिलपासून सरकारने नैसर्गिक वायूचे दर ६.५० वरून ६.७५ डॉलर प्रति एमएमबीटीयू वाढवले आहेत. म्हणजेच सरकारने प्रति एमएमबीटीयू दरात ०.२५ टक्क्याने वाढ केली आहे. याबाबतची अधिसूचना पेट्रोलियम खात्यातील पेट्रोलियम प्लॅनिंग आणि ऍनालिसिस विभागाने काढली आहे.

हा नैसर्गिक वायू ओएनजीसी व ऑईल इंडिया लिमिटेड उत्पादन करतात. या नैसर्गिक वायूचा वापर स्वयंपाकासाठी लागणाऱ्या व पीएनजी वाहन, खत व विजेसाठी लागणाऱ्या सीएनजी निर्मितीसाठी वापरला जातो. दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच नैसर्गिक वायूच्या मूळ दरात वाढ झाली आहे.

सरकारने एप्रिल २०२३ मध्ये नवीन नैसर्गिक वायू मूल्य निर्धारण धोरण तयार केले. यानुसार, कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय दराच्या १० टक्के दर नैसर्गिक वायूचा असेल, असे निर्धारित केले होते. तेल खात्यातील पेट्रोलियम प्लॅनिंग आणि ऍनालिसिस विभागाने सांगितले की, १ ते ३० एप्रिल २०२५ मध्ये नैसर्गिक वायूचा दर ७.२६ डॉलर प्रति एमएमबीटीयू राहील, असे जाहीर केले. मात्र या दरांवर नियंत्रण आणल्याने नैसर्गिक वायूचे दर ६.५० वरून ६.७५ डॉलर प्रति एमएमबीटीयू वाढवला आहे. हे दर नियंत्रण एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ पर्यंत राहणार आहे. पुढील एप्रिल २०२६ मध्ये नैसर्गिक वायूच्या दरात ०.२५ डॉलर प्रति एमएमबीटीयूने वाढणार आहे.

नैसर्गिक वायूच्या हा मूळ दराने शहर गॅस वितरण कंपन्यांना वितरीत केला जातो. त्यातून या कंपन्या सीएनजी व पीएनजी तयार करतात. घरगुती वायू उत्पादनाचा ७० टक्के भाग हा एपीएम वायूतून येतो. शहरातील गॅस वितरण कंपन्या आपली ६० टक्के गॅसचे वितरण या एपीएम गॅसच्या माध्यमातून करतात. आता या कंपन्या आपल्या दरात वाढ करतील. त्यामुळे ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

राज्यात ई-बाईक टॅक्सी ला परवानगी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : राज्य परिवहन विभागाकडून मांडण्यात आलेल्या ई-बाईक टॅक्सी सुरु करण्याच्या प्रस्तावाला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परवानगी देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महाराष्ट्रात फक्त ई-बाईक टॅक्सीलाच परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रसार माध्यमांना सागितलं आहे.

"परिवहन विभागाच्या माध्यमातून ई-बाईक टॅक्सीचा प्रस्ताव मंत्रिमडळाच्या मान्यतेसाठी ठेवला होता. सर्व मंत्र्यांनी महाराष्ट्रात ई-बाईक टॅक्सीला परवानगी दिली आहे. आत्तापर्यंत एकट्या प्रवाशांची गैरसोय होत होती. रिक्षा-टॅक्सीसाठी एका प्रवाशालाही तिप्पट भाडं द्यावं लागत होतं. आता ई-बाईक टॅक्सीच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांची ही गैरसोय दूर होणार आहे”, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

या प्रवासासाठी १५ किमी अंतराची मर्यादा ठेवण्यात आली आहे. ५० बाईक एकत्रपणे घेणाऱ्या संस्थेला अशा प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली जाईल. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही चांगली नियमावली बनवली आहे. दोन प्रवाशांमधील पार्टिशन, पावसाळ्यात प्रवासी भिजू नये यासाठी पूर्ण कव्हर असणाऱ्याच ई-बाईकला आम्ही परवानगी देणार आहोत. ई-बाईकला प्रोत्साहन देण्यासाठी हे धोरण राज्य सरकारने ठरवलं आहे, असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे.

महापालिका शिक्षण विभागाच्या “गुढीपाडवा-शाळा प्रवेश वाढवा” या अभिनव उपक्रमास उत्तम प्रतिसाद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी महापालिका शाळांचा संपूर्णतः कायापालट करण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यानुसार शाळा दुरुस्ती आणि प्रामुख्याने शाळांची पटसंख्या वाढविणे या बाबींचा अंतर्भाव आहे. शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी बालवाड्यांचे बळकटीकरण करणे आणि महापालिका शाळा सर्व सुविधा युक्त तसेच दर्जेदार करणे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे, त्याअनुषंगाने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महापालिकेच्या विविध शाळांमध्ये तब्बल ४०३ मुलांनी शाळा प्रवेश घेतला.
महापालिकेच्या कल्याण पश्चिमेतील उंबर्डे तसेच डोंबिवलीतील पाथर्ली येथील शाळेमध्ये महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या शुभहस्ते शाळेत नव्याने प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची पटनोंदणी उत्साहात करण्यात आली, या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक शाळाबाह्य मुलांच्या शाळा प्रवेशासाठी शिक्षण विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, शाळांसाठी मोठ्या प्रमाणात निधीही दिला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड  यांनी  दिली. यावेळी सजग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या  प्रयत्नातून शाळेने उभारलेल्या अत्याधुनिक अशा संगणक कक्षाचे व सुसज्ज प्रयोग शाळेचे उद्घाटन करण्यात आले.
या समयी माजी पालिका सदस्य जयवंत भोईर, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील इतर मान्यवर शिक्षण विभागाच्या कार्यक्रम अधिकारी अर्चना जाधव, उप अभियंता गजानन पाटील, शिक्षकवर्ग व विद्यार्थी  उपस्थित होते.

शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील गलिच्छ परिस्थितीला अखेर पूर्णविराम!

जोगेश्वरी (पूर्व), प्रभाग क्र. ७३ मधील गांधीनगर येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील शौचालयाच्या टाकीमधून घाणीचे पाणी वारंवार बाहेर येत असल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली होती. याचा त्रास शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच स्थानिक रहिवाशांना होत होता.


या समस्येकडे संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेत अमित दशरथ पेडणेकर (युवासेना उपसचिव) यांनी तातडीने पालिकेकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर प्रशासनाने दखल घेतली आणि संबंधित ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. नागरिकांनी या सकारात्मक बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन पेडणेकर यांनी केले आहे.


या तक्रारीमुळे स्थानिक समस्या सोडविण्यासाठी प्रभावी नेतृत्व किती महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट झाले आहे. भविष्यातही नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर राहू, असे अमित पेडणेकर यांनी सांगितले.